Friday, December 5, 2014

आमचा प्रवास........ टुकटुक गाव ते नॉर्थ पोल व्हाया कोथरूड

वेळ दुपारचे साडे चार. खर तर अत्यंत सुस्तावलेली वेळ असं कोणीही म्हणेल पण त्या दिवशी मात्र आमची फारच गडबड उडाली होती. कारण आम्हाला प्रवासाला निघायचं होतं आणि तेही ताबडतोब. त्यामुळे खांद्यावर एक पर्स अडकवून मी स्कुटरच्या मागच्या सीटवर बसले आणि मल्हारने स्कूटर भरधाव सोडली. खर तर कॉटवरची उशी थोडीशी कडेला आल्याने मला तोल संभाळण तसं अवघडच जात होतं, पण पुढच्या सीटवरचा स्वार मात्र फारच खुशीत आला होता. हातात आडवी धरलेली फणी उर्फ  स्कूटरच  हेंडेल आडवं, उभं, तिरकं धरून गाडी दामटवण्यात तो रंगून गेला होता. शिवाय तोंडाने चित्रविचित्र आवाज काढून वातावरण निर्मितीही चांगली साधली जात होती.पण सरळ प्रवास झाला तर त्यात काय मजा ? एकदम वेगळाच आवाज काढू स्कूटर थांबलीच.
"काय झालं? " माझा चिंतातूर प्रश्न.
 " अरे, काय नाही रे, पेट्रोल संपल. काटा लालकडे आलाय. आता काय करायचं? " नाही म्हटलं तरी स्वाराला जरा चिंता वाटलीच.
" बघा, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला निघताना पेट्रोल बघा म्हणून. " सवयीप्रमाणे मीही सुनावून घेतलं. नातू झाला म्हणून काय झालं, तोही भावी ' पुरुष'च.
"थांबा हो. घाबरू नका. आत्ता पेट्रोल आणतो." स्वार आपल्या पुरुषत्वाला जागून मला धीर देते झाले. पटकन खाली उतरून हातातलं  हेंडेल उंचावून त्यांनी खणायला सुरवात केली आणि बघता बघता अर्जुनाने बाण मारल्यावर जमिनीतून पाण्याचं कारंज उसळून भीष्माच्या तोंडात पडावं तशी पेट्रोलची धार रस्त्यातून  उसळून गाडीच्या टाकीत पडू लागली. धन्य झाले मी, कारण असा " अरब "आमच्या घराण्यात जन्माला आला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. कारण आमच्या टुकटुक गावातून निघून आम्ही कोथरूडला पोचण्यातच बराच वेळ गेला होता. त्यामुळे आम्ही आमची गाडी चायनाकडे वळवली. कारण तिकडच्या पांडाना आम्हाला बांबू द्यायचे होते बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला पांडा सापडले. ते कॉटखालच्या सामानाच्या टबमध्ये ( खर म्हणजे ते त्याच घर होतं. ) दाटीदाटीनं  बसले होते. मी बेबिजना  पानं आणि बिग पांडाजना  बांबु दिले. एका बाजूला झुकल्यामुळे दुखणा-य कमरेवरून हात फिरवताना मनात एक अंधुकशी आशा होती की आता परत कोथरुडमार्गे टुकटुक गावी जायचं. पण ५ वर्षांच्या सहवासानेही मी नातवाला ओळखलं नव्हतं हेच खरं. कारण आता आम्हाला अमेरिकेला जाऊन लायब्ररीचं पुस्तक परत करायचं होतं मग पुढे ( कि वर ?) नॉर्थ पोलला जाऊन पोलर बेअरला मासे द्यायचे होते.  निघताना माझ्या मोबाईलच्या  तळहाताएवढ्या पाऊचमध्ये एका कप्प्यात बांबू आणि दुस-यात मासे घातले होते ते मी विसरलेच होते. तिथून निघताना मला पुढच्या बाजूने पोलर बेअरची माहिती उडत उडत ऐकू येत होती. पण त्यातलं आता एवढच आठवतंय की  येताना एक पोलर बेअर आणायचा आहे आणि खोलीएवढा फ्रीज घ्यायला बाबाला सांगायचं आहे.त्यात तो ठेवायचा आहे. मला चिंता एवढीच की  माझ्या पाउचमध्ये पोलर बेअर मावला नाही तर मला कोल्हापूरला जाऊन एक मोठ्ठी पिशवी  विकत घ्यायला लागून परत व्हाया कोथरूड नॉर्थ पोलला यावं लागेल की काय ?      .     /   

Saturday, November 29, 2014

जाग .......एका रविवारची

मी माझ्या घराच्या खिडकीशी बसलेय. सकाळचे साडेपाच वाजलेत. रविवार आहे. खर तर मला इतक्या लवकर उठायची काही गरज नाही पण आदतसे मजबूर . रोजची  उठण्याची हीच वेळ असते, त्यामुळे आपोआप  जाग येतेच. पण आज रविवार आहे. सगळं घर गाढ झोपेत आहे. सश्याच्या गतीने पळू पाहणा-या रविवारला बंद पापण्याआड पकडून पहात अंगावरच्या रजईत लपेटून  घेताहेत. पण मी जागी आहे. नुसतीच जागी नाही तर मस्त चहाचा कप घेऊन खिडकीशी बसले आहे.
बाहेरही सगळं शांत आहे. अंधाराचं गडदपण मंद होत चाललय.थंडीची झुळूक अंगावर बारीक काटा फुलवतेय खरी,पण तीही हवीहवीशी वाटतेय. समोरच्या घरातल्या आजी नव्वदीच्या उंबरठ्याशी आलेल्या , ओटयाशी  वाकून काहीतरी करताहेत ते मला माझ्या खिडकीतून दिसतंय. चहा करताहेत त्या.आता थोड्याच वेळात आपला वाफाळता कप घेऊन त्या बाहेर बाल्कनीत येतील. अंगाची जुडी करून सकाळची ही वेळ चहाच्या एकेका घोटाबरोबर अंगात मुरवत खुर्चीत बसून रहातील.
शेजारचं फाटक वाजलं. आता हळूच फाटक उघडलं जाईल. परत हळूच कडी घातली जाईल. शेजारच्या वहिनी फिरायला बाहेर पडतील. फिरायचं निमित्त असतं खर तर . त्या दूध आणायला बाहेर पडतील.पण सतत या दबावाखाली असतील की आपल्या फाटक उघडण्यामुळे कोणाची झोपमोड तर झाली नाही ना?
अजूनही अंधाराला उजाळा मिळालेला नाही. दूर कुठेतरी एखादी रिक्षा शांततेला उसवू पाहतेय.पण अजूनही घराघरातले दिवे झोपलेत. बाहेर नारळाच्या झावळ्या थंडीला अंगावर खेळू देताहेत. निस्तबद्धतेने. आजोबाने अंगाशी झटणा-या नातवाला न्याहाळावं तशा .
पक्षी उठलेत. पावसाळ्यात आपल्या सवंगड्याना साद घालणारे छोटे छोटे पक्षी आता गायब झालेत त्यामुळे फक्त कावाळ्याचा आवाज आणि मधेच कुठे तरी टीटयांवचा स्वर ऐकू येतोय. आता अंधाराला माघार घ्यावीच लागणार आहे कारण पूर्वेला दिशा उजळायला लागली आहे. झावाळयाही त्याचं समंजसपणे दिवसाला सामोर जाण्याच्या तयारीत आहेत. शेगड्या पेटवून चहाचं आधाण ठेवल्याचेही आवाज यायला लागलेत. रस्ता जागा झालाय. फिरायला जाणा-यांची चाहूल यायला लागलीय. मंद धुक्यात तरल पहाटेला कुशीत घेऊन तिचा निरोप घेऊ पहाणारा अंधार दिसेनासा झालाय आणि महानगरी आठवड्याचा शेवटचा दिवस मुठीत पकडायला जागी होतेय , येणा-या आठवड्याच्या deadlines calculate करत.   

Saturday, November 22, 2014

देवाबद्दलची माझी संकल्पना

काय असत की, एका ठराविक वयानंतर  माणसाला आपल्या वेगवेगळ्या संकल्पना तपासून पाहण्याचा नाद लागतो. लहानपणी हे असले विचार मनात येणं अशक्यच. पराकोटीच्या हुशार किंवा अलौकिक व्यक्तिंबाबतच  असली वैचारिक चर्चा संभवते. आणि आपण तर सर्व सामान्य. तरुण वयात आपली जी काही बरी वाईट मत असतात ती ठाम तयार झालेली असतात.शिवाय भवसागराच्या लाटा नाका तोंडात जाऊन जाऊन दमछाक होत असते . त्या लाटा परतावण्यातच  निम्मी शक्ती खर्च होत असते.पण वय वाढल्यावर ( अग बयो , म्हण की म्हातारपणी ) वेळच वेळ. जी काही मदतनीसाची भूमिका असते ती पार पाडल्यानंतर वेळच वेळ. अशा वेळी मनात उन पावसाचा लपंडाव चालू असतो. तो कधी सुखद असतो तर कधी त्याला कातरतेची किनार असते. अर्थात ती क्षणभरच. कारण गेलेले दिवस परत येत नाहीत हे आता मनाने स्वीकारलेलच असतं.
लहानपणाची हीच तर गम्मत असते. निरागसपणा अजून मनात भरलेला असतो. सगळं जग ( म्हणजे आजूबाजूचे शेजारी , शाळेतल्या मैत्रिणी आणि शिक्षक ह्यापरत वेगळं जग असतं कुठे लहानपणी ?) चमत्कारानेच भारलेल असतं या वयात. अर्थात आता "असे" असंच म्हणावं लागेल. कारण आताची मुलं शास्त्रीय युगातली असल्यामुळे ज्या गोष्टी आम्ही डोळे मिटून मान्य करत होतो त्या गोष्टीतल्या तृटी  सहजपणे शोधून त्यावरची उपाययोजनाही ते आपल्याला अशा सहजतेने सुचवतात की वाल्मिकी आणि व्यासांनी ह्यांच्या पायाशी बसून story telling चे धडे घ्यावेत.
पण आमच्या लहानपणी सगळ्या जगाची तीन भागात वाटणी झालेली होती. पैकी देव हे चांगले असल्याने ते आकाशात, माणूस अर्थात पृथ्वीवर आणि राक्षस ( ज्यांचं काढताच लपायची सगळ्यात सेफ जागा म्हणजे आईच्या पदराखाली ) हे पाताळात. बरं देवही तेहेतीस कोटी .वेगवेगळी शक्ती असल्याने वेगवेगळ्या संकटात त्यांचा धावा केला जायचा. म्हणजे परीक्षेत अडचण तर देवी सरस्वती. बुद्धी तर अर्थातच देवा श्रीगणेशा. शक्तीसाठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आणि भूत प्रेत समंधादीसाठी रामरक्षा आणि भीमरूपी यांचा  डबल  डोस असायचा शिवाय या सगळ्या देवांची वस्ती गाईच्या पोटात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दिसेल त्या गाईला हात लावून आम्ही मैत्रिणी पुण्याचा अखंड संचय करून ठेवत असू. कारण देवांच्या वस्तीत स्वर्ग आणि नरक अशीही एक विभागणी असायची. स्वर्गात गेलं तर प्रश्नच नाही. आपण फक्त कल्पवृक्षाखाली बसायचं आणि अमृत पीत रहायचं. कारण त्या अप्सरांच्या नाचात वगैरे आम्हाला रस नव्हता. पण नरकात जाऊन पापणीच्या केसाने मीठ गोळा करायच किंवा कढईत उकळत्या तेलात पडायचं म्हणजे अंमळ कठीणच होतं. असो. गेले ते दिवस आणि उरल्या त्या त्यांच्या निरागस आठवणी. चेह-यावर स्मितरेषा उमटवणा-या .
घरातलं बुद्धिवादी वातावरण, वाचनाने दिलेली व्यापक दृष्टी यामुळे देवाबद्दलची संकल्पना बदलायला लागली. देव मूर्तीत नसून माणसात आहे, याचं भान येऊ लागलं. पण तरीही संत वाचनातला भक्तभाव मनाला लुभावत होताच. संतांसाठी देवाने रूप धारण करावं, जनाई ला दळू कांडू लागावं, नरहर सोनाराला कमरपटटया साठी माप देताना कधी शंकर तर कधी विठ्ठलाचं रूप दाखवाव आणि सर्व देव एकच आहेत हे पटवावं. दामाजीपंतासाठी बादशहापुढे " तुमच्या महाराचा मी महार" म्हणावं , एकनाथा घरी पाणक्या श्रीखंड्या बनून पाणी भरावं यातला romanticism मनाला स्पर्शून जात होताच.  पण काही मिळवण्यासाठी उपास कर, कुठलतरी स्त्रोत ५० वेळा वाच किंवा अमुक देवळाला अनवाणी पायाने प्रदक्षिणा घाल हे फारच हास्यास्पद वाटायचं. आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग आले. पुढे अंध:कार असावा वाट दिसेनाशी झाली. त्यावेळी " परमेश्वरा" अशी आर्त हाकही ओठी आली पण ती ठेच लागल्यावर " आई ग...' ओठी आलं तितक्याच सहजतेची होती. जखमा धुवून पुसून आपणच मलमपट्टी करायची आहे हे माहीतच होतं.
वयानुसार भाबडेपणा अधिकाधिक कमी होत गेला. पण त्याचबरोबर तरुण वयात देव देव करणा-यांबद्दल जे कुत्सित उपहासाने बोललं जात होतं ते बंद झालं. आपल्याच आयुष्यात अगदी तरुण वयात आपणही काही  जीवघेण्या प्रसंगात देवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण केलं होतं, हे आठवू लागलं. म्हाता-या सासूला बर वाटावं म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे केल्या होत्या. क्वचित प्रसंगी मनाला न पटणा-या गोष्टी शिष्टाचार म्हणूनही केल्या होत्या त्या व्यक्तीच्या दुख-या मनाला आधार मिळावा मानूनही केल्या होत्या हे सगळं आठवलं मग लक्षात आलं,. मनुष्य काही गोष्टी जनरेटयामुळे करतो, मनुष्याला अशा वेळी नेहमीच त्याविरुध्द दंड थोपटता येतातच असं नाही. जोवर त्या समाजाला घातक नसतात तोवर तिकडे कानाडोळा करणच श्रेयस्कर अस् वाटायला लागलं. एकप्रकारची क्षमाशीलता सहानुभूतीची अनुभूती मनात यायला लागली. देवाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न तरी यापेक्षा वेगळा काय असणार, नाही का?  आणि देवत्व म्हणजे तरी काय ? मनाची शुध्दता, आणि वृत्तीची निरागसता. हो ना?    

Friday, November 14, 2014

मल्हारबरोबर वाढताना

मल्हार तीन वर्षाचा होईपर्यंत माझं तसं बरं चाललं होतं. म्हणजे मी आजी आणि तो माझा नातू इतक स्पष्ट आमचं नातं होतं. मी त्याला काऊ चिउच्या गोष्टी सांगाव्यात भरवावं, जोजवावं. त्यानेही आपल्या बाळमुठीत माझं बोट पकडून मला त्र्यैलोक्याच साम्राज्य द्यावं. कसं मस्त चाललं होतं आमचं.पण मग तो वाढताना जाणवलं ते वेगळंच
 माझ्या पिढीच्या अनेक आज्याप्रमाणे  मीही ठरवलं होतं की जे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत डोळसपणे करू शकलो नाही ते नातवाच्या बाबतीत करायचं. म्हणजे आपल्या संसाराच्या धबडग्यात आपण मुलं वाढवतो असं आपल्याला वाटतं, पण ती खरं तर आपल्याला बघत आपणच वाढतात. तसं आजी झाल्यावर होत नाही. नातवंडाबरोबर घालवलेला क्षण न क्षण आनंददायी असतोच पण तो आपलीही वाढ करत असतो अस आता मला सतत वाटत असतं .
मल्हार लहान असताना मी सतत त्याच्याशी बोलत असायची. वेगवेगळी गाणी गुणगुणत असायची. तोही टकामका बघत ऐकायचा असं वाटायचं  पण त्यापेक्षाही त्या गाण्यांचे सूर,त्यांचा अर्थ त्याच्या आत आत कुठेतरी अधिक स्पष्ट रीतीने उमटतोय असं जाणवत रहायचं. दोन दिवसापूर्वीची गोष्ट. गाण  ऐकायचं असं मल्हार म्हणाला म्हणून एक कासेट लावली. तल्लीनतेने बसून त्याने पूर्ण ऐकली. परत दुस-या दिवशी " कालच्या आजीचं गाणं लाव म्हणून त्याने काढली ती कासेट किशोरी अमोणकरांची होती.
  जेव्हा मल्हार इतक्या लहान वयात मराठी भाषा समृ ध्दपणाने वापरतो तेव्हा खूप आनंद होतो.म्हणजे त्या दिवशी तो मावशीला तुझ्या घरी येतोय म्हणून सांगत होता. वर म्हणाला की" तूच फार दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला ये अशी गयावया करत होतीस ना म्हणून येतो." मध्ये तर सतत त्याला " कुहू" चावल्यासारखा कविताच करायचा. मराठी यमक जुळवून काहीतरी म्हणायचा आणि वर मला सांगायचा, " अरे, कविता झाली की रे."मल्हारच्या लेखी स्त्री पुरुष सगळेच " अरे " असतात.
 तो अगदी २ वर्षाचा असल्यापासून आम्ही दोघंही जवळच्या बागेत सकाळी जात असतो.तिथेही त्याला गवतावरचे दवबिंदू दाखव हिरव्या कोवळ्या गवताची , वाळलेल्या गवताशी रंगसंगती दाखव  रंगीबेरंगी फुलं , आकाशातले रंग , पक्षांची माळ दाखव  असे आमचे उद्योग  चालायचे.गम्मत म्हणजे  तो जेव्हा स्वानंदीबरोबर  कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा आपले कपडे स्वत; पसंत करतो आणि ते खरच छान असतात. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट अशी की आमच्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तो ज्या एकतानतेने झोके घेतो ते बघत रहाण्यासारखं असतं .
आजी झाल्यावर मला असं वाटतं की मूल थोडं मोठं झालं की त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं जायला पाहिजे. मी आई असतानाही माझ्या मुलांवर ती लहान असताना कोणत्याच बाबतीत दडपशाही  केली असं मला स्वत:ला वाटत नाही. कारण तशी तर माझ्यावरही माझ्या आईवडिलांनी केली नाही. पण मला वाटतं तेव्हा नकळत का होईना माझा दृष्टीकोन पालकत्वाच्या superiorityचा होता. म्हणजे ह्यांना काय समजतंय , ह्यांना शहाणं करून जगात रहाण्यायोग्य करणं, त्यासाठी त्यांची सर्वतोपरीने "काळजी " घेणं हे आई म्हणून माझं परम कर्तव्य आहे असा एक भाव होता. त्यामुळे त्यांच्यापरतं मला ( आजही ) दुसरं जग प्रिय नसलं तरीही आजी झाल्यावर एक फरक झाला तो हा की त्या बालजीवाचं म्हणणं " चिमखडे चमकदार  बोल " या सदरात न  घेता त्यावरही विचार केला जावा.ह्याचं एक उदाहरण म्हणजे संध्याछाया पडल्यानंतर सकल जोडप्यांचा वेळ जाण्यासाठी उगीचच वाद घालणं हा एक आवडीचा उद्योग असतो.( गरजूंनी आजूबाजूला  चौकशी करावी).कारण होतं काय की इतकी वर्षं एकत्र काढल्यानंतर नवरा बायकोला आणि बायको नव-याला संपूर्ण कंगो-यानिशी ओळखत असते.त्यामुळे एकमेकांच्या बोलण्यातला between the lines अर्थ ते चांगलेच जाणून असतात. पण मल्हार ३ वर्षांचा असताना एकदा ( बहुधा तोः तोच प्रयोग परत परत पाहून वैतागून ) मला म्हणाला, " कुकुली तू आणि आबा सारखे का भांडता? " त्या क्षणी मला फार फार वाईट वाटलं आणि त्यापेक्षाही जाणवलं ते हे की अरे, हे बाळ  आता मोठं झालं की . त्यानंतरआम्ही वेळ घालवायचे अन्य मार्ग शोधले.हे सांगणे नलगे.हे आई असताना कदाचित वेगळं घडलं असतं . त्यामुळे माझ्यासमोर केवळ मल्हारच वाढत नाही मीही वाढतेय. आणि ते निश्चितच आनंददायी आहे.एका अटळ सत्याकडे जाण्याच्या वाटेवर अंगावरची एकेक पुटं गळून पडावी आणि आत आत काहीतरी कोमल उमलत जावं पाकळी पाकळीनं तसं वाटतंय . 

Saturday, November 1, 2014

मल्हारची पहिली परदेशवारी

साधारण 2 महीन्यापूर्वी मल्हार ( वय वर्षे ५) म्हणाला, आम्ही तिघे गावाला जाणार आहोत. मला वाटलं नेहमीप्रमाणे कुठेतरी फिरायला जाणार असतील. मग आपणच उचंबळून म्हणाला, " अमेरिकेला." काहीतरी गम्मत करतोय असं वाटून मीही गमतीत ," चला बाई यावेळी आम्हीपण येणार" असं म्हणून त्याला चिडवलं. तर रात्री निकेतने सांगितलं की  त्याला आणि स्वानंदीला  त्यांच्या कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावं लागणार आहे आणि मल्हार एकटा  राहणार नाही त्यामुळे त्यालाही घेऊन जायचं आहे.मग दोन महिने मल्हारला त्याच्या नकळत न्याहाळण ही एक मेजवानीच होती.
पहिली चुणूक जेवायच्यावेळी दिसली. मल्हारला जेवताना टी व्ही. बघायला आवडतं. जेवताना मुलांनी टी.व्ही  बघू नये हा योग्य दंडक कोणत्याच लहान नातवंडाच्या आजीकडून ( अर्थात काही सन्माननीय अपवाद  वगळता ) पाळला जात नाही. याचं कारण वयपरत्वे त्यांची थकलेली गात्रं . मल्हार  जेवताना १दिवस टी . व्ही  बघतो  १ दिवस बागेत झोपाळ्यावर बसतो. १ दिवस पुस्तक वाचतो . (म्हणजे मी वाचून दाखवते. ) तर एक दिवस फर्मान निघालं, " कुकुली , आता रोज टी .व्ही च बघायचा." म्हटलं , का रे बाबा? तर म्हणे, अग, आता मी अमेरिकेत जाणार ना, तर मला इंग्लीश कळायला नको का?  मनात आलं, लहान असो की मोठा, प्रत्येकाला त्याची त्याची टेन्शन्स असतात. मग पुढचा महिना आमच्या घरी इंग्लीश विम्ग्लीशच चालू होतं.आम्ही पूर्वी बुध्दिबळ  खेळत होतो, पण आता मला त्याच्याबरोबर चेस खेळावं लागायचं. राजा, राणी हत्ती घोडे प्यादी जावून् त्यांची  इंग्लीश नावं पाठ करता करता मला सारखाच चेक मेट पत्करायला लागू लागला. " कुकुली, give वरणभात no चपाती " किंवा "i take आंबापोळी to eat. hungry." अशी चमकदार वाक्यही तो मधून मधून पेरू लागला.प्रत्यक्षात तो मराठीत आणि माझ्या भावाची नात अमेरिकन इंग्लीशमध्ये एकमेकांशी   व्यवस्थित "बडबडले". ह्याने तर अमेरिकन मुलांना " खेळायला येता का ? " असं  विचारून पळवूनच लावलं .
ह्याची पुढची पायरी म्हणजे ज्ञानाचा अखंड स्त्रोत. आधीही आमच्या या  " ज्ञानाने" अगदी धिरड्याचे पीठ गुठळ्या  न होऊ देता कसे ढवळावे याच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकापासून कुठल्याशा काळातले डायनोसोरच्या "भीषण" नावापर्यंत माहिती देऊन आम्हाला भंडावून सोडलं होतच. त्यातच आता अमेरीका वारीची भर पडली. " कुकुली, तिथे पोचायला दोन दिवस लागतात. बसलं की लगेच पोचत नाही ". ही  वर जोर. बहुधा ऐकलेली माहिती परत घोकल्यामुळे लक्षात राहते याचा तो वस्तुपाठच असावा. " आणि दोन दिवस आपण पारोशी असतो." असंही तो तोंड वेडंवाकड करून सांगायला लागला. प्रत्यक्ष निघण्याच्या दिवशी साधारण सेनापती बापट मार्गावर त्याला भूक लागल्यामुळे त्याने त्याच्या वेगळ्या डब्यातली पोळीची गुंडाळी संपवली .पुणे मुंबई . हायवेचे दिवे बघून त्याला मुंबई आल्याचा आनंद झाला. त्यामुळे त्याच्या बाबाला  भीती वाटली की  लोणावळा येता येता हा बहुधा अमेरिका आली म्हणून गाडीतून उतरणार.पण पुढचा प्रवास अगदी सुरळीत झाला. ज्याची भीती वाटत होती त्या विमानातल्या " शी "सकट. फक्त अमेरीकेबद्दलच त्याचं पाहिलं मत असं  की  " हे लोक पाणी इतकं  गार करून पितात की  त्याची चव जाते. "
अमेरिकेत काय बघायचं ते  त्याचं भारतातच पक्कं  ठरलं  होतं. त्यामुळे पोलर बेअर . पेंग्विन ,वगैरे भारतातल्या प्राणिसंग्रहात न  दिसणारे प्राणी बघायला मिळाल्याचं सांगताना त्याचे लकाकणारे डोळे बघायचा आनंद वेगळाच होता. आणि पू , टिगर ह्यांना त्याने मारलेली मिठी आणि संतांनी विठोबाला दिलेलं आलिंगन यात फार काही अंतर असेल असं  मला वाटत नाही. फक्त ज्या डायानोसोरना बघायला तो उत्साहाने गेला तो भीमकाय डायनोसोर त्याच्यासमोर येऊन ओरडला आणि आपल्या तोंडातला  सरडा त्याने त्याच्या अंगावर टाकला, तेव्हा त्याच्याच भाषेत सांगायचं तर त्याची चड्डी " हिरवी निळी काळी पिवळी" व्हायला आली होती. पण तेवढ्यात त्याला त्या प्राण्याच्या आतल्या माणसाचे पाय दिसल्यामुळे पुढील समरप्रसंग टळला.डायनोसोरच खर फोसिल हातात धरायला मिळाल्यामुळे आमचा हा भावी पेलेंटोलोजीस्ट  धन्य धन्य जाहला.
२० दिवसानंतर पहाटे गाडीतून उतरून आपल्या घराकडे बघताना त्याच्या चेह-यावर जे भाव होते ते बघून मीच उचंबळून आले. माझा हा जन्माने अमेरिकन नागरिक मनाने भारतीयच आहे याचा फार फार आनंद झाला. जसा ५वर्षांपूर्वी त्याचे आईवडील त्या मोहमयी दुनियेला दूर सारून आपल्या माणसांच्या ओढीने हातात त्याचं ९ महिन्याचं मुटकुळ घेऊनपरत  भारतात  आले होते तेव्हा झाला होता तसाच.               

Wednesday, October 22, 2014

भाषा कोल्हापुरी

परवा आम्ही मैत्रिणी जमून एका मैत्रिणीकडे गेलो होतो. सगळ्या ६५च्या घरातल्या.एकाच शाळेतल्या. आणि मुख्य म्हणजे कोल्हापूरच्या.मैत्रिणीचा मुलगा सैन्यात कर्नल.त्याला शौर्य पदक मिळालं म्हणून आम्ही तिच्याकडे जमलो होतो, त्याचं अभिनंदन करायला. पण दुर्दैवाने तिथे गेल्यापासूनच माझी तब्येत बिघडली . मी मुलाला फोन करून बोलावून घेतलं आणि घरी परतले.संध्याकाळपासून मैत्रिणींचे  एक एक फोन यायला सुरवात झाली.
पहिला फोन, " काय हाय का अजून ? काय कुठ गेल्ता वर तोंड करून चावायला? काळजी घ्या वय झालय आपलं. डॉकटर कड जावून या.काय?"
दुसरा फोन, " असं कसं काय झालं ग ? आता श्यानपना करू नका, ते डॉकटरला शिक्षणाला लइ खर्च आलाय म्हणे तेव्हा जरा त्याला मदत करा पैसे फेडायला म्हणे."
तिसरा फोन, " हं कुठवर आलाय ?  आता बास. डॉकटर काय देतोय ते घ्यायचं आणि गप कोप-यात कुत्र्यासारखं पडून -हायच ."
हा कोलापुरी प्रेमाचा झटका आणि चटका पण. सरळ म्हणून बोलायचंच नाही. या माझ्या गेल्या ५० वर्षांच्या मैत्रिणी.
काही ठिकाणी बरेच दिवस आपल्या आवडत्या मैत्रिणी भेटल्या नाहीत की  माणसं प्रेमानं विचारतात, " का ग , कुठे होतीस इतके दिवस? बरी आहेस ना? " आमच्या मैत्रिणी विचारणार, " काय कुठं बेल घालत हिंडत हुता? " प्रेम तेच. काळजी तीच. पण अंदाज निराला.
कोल्हापूर. राकट, रांगड. मिरचीच्या ठेच्यासारख झणझणीत. प्रत्येक गावाचे काही विशिष्ट शब्द असतात. भाषेचा एक लहेजा असतो. परवा बागेत बसले होते. बाकावर माझ्याच वयाची एक बाई बसली होती. तिचा नातू आजी पाणी दे म्हणून आला. त्याला पाणी पाजून ती प्रेमाने म्हणाली, " शिस्तीत खेळा जावा.  ( म्हणजे नीट खेळ जा. आणि कडंन जावा म्हणजे रस्त्यात नीटबघून जा  ) ' मला उचंबळूनच आलं. म्हटलं तुमी ( लक्षात घ्या, तुमी, तुम्ही नव्हे,) कोलापुरच्या  काय?  तर बाईपण एकदम चमकली. तुमाला कस कळलं? तर म्हटलं तुमी जावा म्हटला की  नाही त्यावरून. मग एकमेकींची चौकशी करता करता आम्ही आमच्या शाळेत पोचलो  आणि लहानपणीच्या फुलपाखरी पंखांनी आमची संध्याकाळ रंगीन करून टाकली.बोलता बोलता  बाई हसली आणि म्हणाली, " भाषेवरून कळतयच हो गाव. मी परवा रिक्षावाल्याला म्हटलं, एवडा पत्ता शोधून द्या बाबा. केव्हापासून हुडकायला लागलोय. तसा तो हसला आणि म्हणाला, काय बाई, कोलापुराच्या काय तुमी? इकड पुण्यात शोधतोय म्हणतात नव्हे?'.कोल्हापूर कर्नाटकाच्याजवळ असल्याने कानडी हेल आणि शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सगळे आदरार्थी बहुवचन. तू जा असं नाहीच. तुमी जावा. माझ कोल्हापुरी बोलणं सुधारायचा आईचा सतत निष्फळ प्रयत्न असायचा. जावा म्हटलं की लगेच ती वैतागून म्हणायची जावा की नणंदा? जा म्हणावं. पण माझं म्हणणं असायचं की  कशाला बदलायचं?परक्या नागरी लोकात असतच आपल्याला शुध्द औपचारीक बोलायचं. मग अंतरातल्या  माणसांसमोर अंतरीचीच  भाषा ओठी येऊ द्यावी ना? कसं मोकळं मोकळं वाटतं . खर ना?.    

धनत्रयोदिशी२०१४

आज धनत्रयोदशी साल २०१४ . सन १९४९ ते १९५५च्या धनत्रयोदशा (?) काही मला आठवत नाहीत. कारण तेव्हा माझं वय ५च्या आत होतं.पण नंतर  मात्र आठवतात ते वेगवेगळे वास. गोड, तिखट, भाजलेले तळलेले. ते कसे निर्माण होतात त्याच्याशी माझ्या बाल मनाला काहीच देणं घेणं नसायचं कारण त्यापेक्षाही महत्त्वाची कामं असायची. ती म्हणजे  जवळच्या ग्राउडमधून  उलथन्याने खणून खणून अंगणासाठी माती आणायची ती थोपटून थोपटून गुळगुळीत करायची आणि मग त्यावर सुरेख रांगोळी काढायची. प्रत्यक्षात मात्र यातलं प्रत्येक काम मी भावाकडून करून घेत असे. वडलांना नाव सांगेन असा दम देऊन ज्याची मला आता फारच लाज वाटते. पण आता माझ्या ६६व्या आणि त्याच्या ७४व्या वर्षी त्याचा काय उपयोग? पण अशा डयांबीसपणाची  मला ६व्या दिवाळीतच चांगलीच शिक्षा मिळाली होती. म्हणजे झालं काय की  क्वचितच दिसणारं मुंगुस रस्त्यावरून जात होतं आणि ते बघायला बापुंनी मला वरच्या माडीवरून हाक मारली. उरलेली रांगोळी पूर्ण करायचा हुकुम सोडून मी जिन्याकडे धावले आणि पायरीवरून पाय घसरला आणि अशी आपटले की  दात ओठात घुसला आणि त्याची खूण अजून माझ्या  ओठावर आहे.अर्थात याचा भावाने फायदा असा घेतला कि तुला ही  बाप्पाने शिक्षा दिलेली आहे आणि हे असंच चालू ठेवलास तर बघ पुढे काय काय होईल ते असं सांगून त्याने वेठबिगारीतून कायमची मान सोडवून घेतली आणि तो केवळ अपघात होता हे मला पटेपर्यंत तो कॉलेजात गेला होता. असो.पण हे आठवायचं कारण म्हणजे मी आज ५० ,५५ वर्षानंतर  दारात रांगोळी काढली.
आज धनत्रयोदशी , साल २०१४. आकाशदिव्या तले दिवे, ,  दिव्यांच्या माला ,चमचमणा-या, डोळे मिचकावून गुंगी आणणा-या माला सगळ्या घरांवर लटकलयात अगदी माझ्यासुध्दा .
दूर क्षितिजावर एकच दिवा नव्हे पणती मिणमिणतेय. आकाशदिव्यामधली, तुळशीच्या रोपाजवळची, घराच्या पाय-यावरची..पणतीतल्या तेलाच्या साथीने मंद तेवणा-या त्या ज्योतीभोवतीच गूढ  तरल वातावरण नजरबंदी करत असत आणि आत आत कुठतरी शांत गारवा झिरपत असतो.   राग येतोय त्या विजेच्या माळाचा? अजिबात नाही. त्रास होतोय फटाक्यांच्या लडीचा ? कधी कधी. मग आज मन हुरहुरताय का? अंगणात सारवलेल्या शेणाचा वास का येतोय /? पहाटेच्या वेळी आपल्या वाट्याचे लवंगी फटाके उडवणं-या मित्र मैत्रिणीचे उजळलेले  चेहरे का तरळताहेत डोळ्यासमोर?  कोण सांगू शकेल कारण ?
कदाचित दिव्यांच्या लखलखाटात आपल्या तळहाताएवढया यंत्रावर लिहिणा-या ब्लोगरला सांगता येईल.
कारण  कदाचित त्याच्याही ब्लोगची सुरवात अशीच असेल, "आज धनात्रायोदिशी साल २११४...'  

Friday, March 28, 2014

करके देखो अच्छा लागता है !

आयुष्य किती सोपं आहे असं वाटतंय आज. नेहमीसारखीच सकाळ. नेहमीचाच दिनक्रम. वेगळं असं काहीच नाही. पण तरीही आज मन प्रसन्न आहे. हलकं हलकं वाटतंय. कारण आज मी माझ्या मनाचं ऐकलय.
नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडले.आमच्या सोसायटीला लागून जो रस्ता जातो तो गोलाकार फिरून परत सोसायटीपाशीच येतो.खूप माणसं त्या रस्त्यावरून सकाळच्या वेळी चकरा मारत असतात.मीही दोन चकरा पूर्ण करून चालले होते.समोर रस्ता झाडणा-या मावशी रस्ता झाडत होत्या. धूळ नाकात जाऊ नये म्हणून मी ओढणी नाकाला लावून पटापट पाय उचलत होते.एवढ्यात मावशींनी मला हटकलं, " ताई, एक सांगायचं होतं. " मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे फक्त एक नजर टाकली .थोड्या अजीजीने त्या  म्हणाल्या, " ताई, तुमच्या बागेतला कचरा तुमच्या बागेतच जिरवा की.आता कॉर्पोरेशनचे लोक पानं घेत नाहीत .मग आम्ही कुठं टाकायचा सांगा बरं?" मीही तिला म्हटलं, " मावशी अहो, या आधीही मी साठवत होते हो कचरा, पण आमच्या बागेत ना वाळवी फार आहे. वाळवीच औषधही घातलय. पण परत परत होते. काय करणार? पण मी बघते हं ." अर्थात मी हे करणार नव्हतेच. कारण दोनदा माझे प्रयोग फसले होते.
पण घरातली कामं उरकता उरकता माझं मन त्या मावशींच्या  शब्दांचा विचार करत होतं. आणि मग काम आटोपून आंघोळीला जाण्यापूर्वी मी बागेत गेले.कुंड्यातल्या झाडांना पाणी घातल्यानंतर बाग झाडून सगळी आंब्याची पानं मी वाफ्यातल्या रोपांच्या मुळाशी पसरून दिली. खरं तर  शेजारच्यांनी दोन्ही घरांच्या सीमेवर हे झाड लावलं आहे आणि "फुले का पडती शेजारी" न्यायाने सगळी पानं आमच्या अंगणात आणि आंबे त्यांच्या  दारात अशी परिस्थिती आहे. पण  तरीही मला आज  शेजा-यांना मनोमन शिव्या घालाव्याशा  वाटल्या नाहीत.. सगळी पानं टाकल्यानंतर मी बागेकडे पाहिलं तर ती चक्क माझ्याकडे बघून डोळे मिचकावून हसली.तेव्हापासून माझा दिवस मस्त चालला आहे.
काही दिवसांपूर्वी टी . व्ही वर एक जाहिरात लागायची. एका लहान मुलीला  दुर्धर आजार झालेला असतो आणि तिला सतत रक्ताची गरज लागत असते. कोणी ना कोणी रक्त देत असतं. पण त्या मुलीला मात्र कोणी  रक्त दिलं हे माहित नसल्याने ती भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानत असते. तिच्या निरागसपणामुळे हेलावलेला एक तरुण तिच्यासाठी रक्तदान करतो तेव्हा त्याच्या चेह-यावरचं हसू आपल्याला हेच सांगत असतं, " करके देखो अच्छा लागता है !"
 आयुष्याच्या धकाधकीत आपण इतके बेभानपणे गरगरतोय की साध्या साध्या गोष्टी ज्या करायला फारच थोडे कष्ट आपल्याला पडणार आहेत त्या करायलाही आपण अनुत्सुक असतो. पण थोडी स्वत:ला रोजच्या घाण्यातून ढील दिली तर जो आनंद मिळतो तो अनमोल असतो असंच आज वाटतंय मला.करनेके बाद जर इतना अच्छा लागणार असेल तर देर किस बातकी जो  दिलसे करना है वो करके देखो अच्छा  नाही तर बहुतही अच्छा लगेगा !  

Saturday, March 22, 2014

आजोळ

आजोबा आजी हे शब्दच इतके मऊ  आहेत की ते उच्चारताच मन  लहान होऊन जात. आजी आजोबा , मग ते बाबाचे आई वडील असोत किंवा आईचे. ते नातवंडावर माया आणि फक्त मायाच करणार. बाबाचे आईवडील जवळचअसतात. त्यामुळे त्यांचा सहवास रोजचाच असतो. पण आईचे आई वडील दुसरीकडे रहातात त्यामुळे त्यांच्या मनातलं प्रेम कोंडून राहिलेलं असतं त्यामुळे नातवंड आली की ती माया उधळून दिली जाते.कारण लेक कधीतरी माहेरी येणार. थोडेच दिवस राहणार आणि आपल्या घरी परतणार . त्यामुळे आपल्याकडे आहे तितके दिवस मजा करायची हाच बेत आजोळच्या माणसांनी ठरवलेला असतो.त्यामुळे कोणालाही विचारलं तर आम्ही आजोळी कशी मजा केली हे सांगताना १० वर्षांच्या चिंटूपासून ते ६० वर्षांच्या चिंतोपंतां पर्यंत सगळ्यांचे डोळे आजोळच्या आठवणींनी लकाकत  असतात.
माझं आजोळ कोकणात. आम्ही रहात होतो देशावर. ६० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं फारशी नव्हती आणि लोकही आतासारखे उठसूट गावाला जात नसत. त्यामुळे मी आजोळी फारतर चार पाचदा गेले असेन.पण आजही तो लाल डब्याचा घाटातला प्रवास आठवला की माझ्या पोटात कससच व्हायला लागतं. गाडी लागलेली असूनही माहेरच्या हवेने सुखावल्याने परकरी पोर झालेली माझी आई वाटेत दिसलेल्या प्रत्येक माणसाशी आसुसून बोलत असायची आणि ती माणसंही "  गो इंदू कधी आयलस? बरा असा मा? "अशी सुरवात करून बोलत रहात. गळून गेलेली ५-६ वर्षांची  मी आईचा ओचा ओढत घरी चलण्याविषयी  लकडा लावत असे.. रस्ता तरी डांबरी नाही, तरी निदान मातीचा असावा. तर तोही रेतीचा. समुद्रकिना-यावरची वाळू. पाय टाकला की भसकन पोटरीपर्यंत पाय  आत जायचा.दुतर्फा माडाची झाडं. पण त्यावेळी ते सौंदर्य वगैरे कळायचं नाही. कधी एकदा घरात जाऊन पाणी पितो असं झालेलं असायचं. घराला फाटक वगैरे नसायचं पण एक भला मोठा  वासा आडवा घातलेला असायचा.तो ओलांडून बरंच चाललं की घराची पडवी यायची. तिथल्या कट्ट्यावर मी बसकण मारायची आणि सूर काढायची. " गे वोगी रव. रडतास कित्याक? " विचारत आजी पुढे यायची. माझा सूर आणखी चढायचा. आणि एक आवाज यायचा, " कोण रडतासा तां?" की माझा आवाज बंद. आई हाताला धरून मागील दारी न्यायची, हात पाय धुवून आम्ही परत बाहेर येईतो त्या दमदार आवाजाने  पुढच्या मांगरातल्या  माणसाला बोलावून माडावर चढवलेलं असायचं.  मी तोंड उघडं ठेवून माकडासारख झाडावर चढणा-या त्या माणसाकडे बघत असायची आणि शहाळ तोंडाला लावून निम्मं पाणी अंगावर सांडत पाणी पीत असायची. तो दमदार आवाजाचा माणूस म्हणजे माझे मामा  आणि माझी आई हसत  काहीतरी बोलत असायचे.
दुस-या दिवसापासून माझी आईला भूणभूण  सुरु व्हायची घरी जाऊ या म्हणून. कारण तिथे खेळायला कोणीच नसायचं. सगळीकडे शांतता. घरं लांब लांब . माणूस दिसायचा नाही. सकाळी आजोबा म्हणजे नाना देवासाठी फुलं काढत, पण त्यांनी कधी ये फुलं काढू या असं म्हटल्याचं आठवत नाही. आजी तिच्या कामात. आंघोळीला पाणी तापव.सकाळच्या न्याहारीला पेजेचे तांदूळ उकडत लाव असं तिचं  काहीबाही चालू असायचं. मामा वेळेवर ( समुद्रकिना-यावर) त्यांची सुरुची बाग होती तिकडे जायचं आणि येताना ' बाजार " ( मासे) आणायचे म्हणून  निघायचे.आई कामाला येणा-या इम्दुकडून पोट चोळून घेत गजली करत असायची. माझं रडकं तोंड बघून आई " जा जरा जनग्याकडे" म्हणून बाहेर हाकलायची.मग माझ्यात उत्साह संचारायचा.
जनाग्या आमच्या घराच्या मागच्या बाजूला जरा दूर रहायची तिच्या झोपडीच्या बाहेर विड्यांच्या पानांचा वेल  असायचा. मी आले की तिच्या प्रेमाला भरतं यायचं. इम्दुचा शहरात रवनारा चेडू म्हणून तिला माझं फारच अप्रूप होतं. त्याचा फायदा घेऊन मीही तिच्याकडून लाड करून घ्यायची. तिच्याकडेच मला जास्त मोकळं वाटायचं . एकदा मला आठवतं मी माझ्या शहरात रहाण्याच्या जोरावर तिच्याकडून गार वाटावं म्हणून कानात तेल घालण्याऐवाजी पाणी घालून घेतलं होतं आणि माझे वडील असंच घालतात म्हणून थाप मारली होती. ती बिचारी " नुको  आवशीक कळला तर रागवात तुका 'असं  कळवळून सांगत होती आणि मी अधिकाधिक खुश होत होते. रात्री कान ठणकायला लागल्यानंतर माझ्याबरोबर तिचाही उध्दार झाला तो वेगळाच.
दुस-यांदा मी गेले तेव्हा सातवीत होते. प्रवास, गाडीचा आणि घरापर्यंतचा जरी तोच असला तरी आजूबाजूला बघण्याची नजर आली होती. त्यामुळे बाजारातून येताना बोंडू, काजी, करवंद यांची रंगसंगती लक्ष वेधून घेत होती. बाळा सोनाराशी बोलत आई थांबली तरी त्यांच्या गप्पा ऐकताना मजा वाटत होती. घरी आल्यावर  दारातच बांधलेल्या गुरांकडे बघावसं वाटत होतं. घरी आल्या आल्या आमच्या इम्दुने "काय हा पसारा" म्हणत घर झाडायला हातात खराटा  घेतल्यावर कामवाल्या इम्दुने " काय गे घरातला काम कमी पडला म्हणून हय आयल्याबरोबर झाडूक लागलास की काय' म्हटल्यावर त्यांची गंमत  कळून हसू आलं होतं. हळू हळू मला माझं आजोळ कळू लागलं होतं.
माझ्या भावंडाच्या आजोळच्या आठवणी वेगळ्या आहेत. ते माझ्यापेक्षा १६-१७ वर्षांनी मोठे असल्यामुळे आणि त्यांचं काही शिक्षण तिथेच झाल्याने शिवाय ते मुलगे असल्याने एकटेही जाऊ शकत असल्याने त्यांना तिथला  सहवास अधिक आहे. ते तिथल्या समुद्रात पोहलेत. घराभोवतालची बाग त्यांनी लाटेने पाणी उपसून शिंपली आहे. ( लाट म्हणजे विहिरीवर एक जाड बांबू आडवा टाकलेला असतो.एका उभ्या वाशाच्या टोकाला काहीलीसारखी  एक मोठी कढई लावलेली असते. आडव्या बांबूवर चालत जाऊन कढईत पाणी भरून वाशाच्या मदतीने पाणी काढतात आणि बागेत सोडतात )  त्यांचं मोठी आई, नानांशी संवाद आहेत(होते ). माझं तसं नव्हतं. मला तिथली भाषा, त्यांचं वागणं अगम्य वाटायचं   पण तिथली झाडं मन मोहून टाकायची..( जरी रात्री दोन माड एकमेकांना घासून आवाज करत तेव्हा त्या कंदिलाच्या उजेडात माझी बोबडी वळत होती तरीही) तिथल्या वातावरणात पानांचा एक वेगळाच वास भरून राहिलेला असायचा. तिथल्या गरम पाण्याला धुराचा एक वेगळाच वास असायचा. तिथल्या गाजेला वेगळीच साद होती. तिथल्या टपो-या मोगा-याला  वेगळाच सुगंध  असायचा.
मी माझ्या मुलांच्या आजोळी जायची तेव्हा त्यांचे मामा मामी, भावंड दारात उभी राहून वाट बघत असायची. आरडा ओरडा दंगा यांनी घर गजबजून जायचं. माझ्या नणदेची मुलं जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हाही हीच परिस्थिती असायची. आणि आता माझा नातू रोज त्याच्या आजोळी जातो तरीही  परिस्थिती बदललेली नाही. माझ्या नव-याला आवडणारे पदार्थ त्याला खायला घालायला  त्याची त्याच गावात रहाणारी आजी धावत पळत घेऊन यायची. हे काही मी अनुभवलं नाही. पण तरीही मला माझ्या आजोळची वेगळीच ओढ लागते. एखाद्या इंग्लीश सिनेमातल्या हिरोसारखा माझा राकट मामा अबोलपणे माझे विहिरीत पडलेले कपडे काढायला उतरलेला आठवतो. नाना च्या देवघरातल्या फुलांचा सुगंध माझ्या नाकाला जाणवतो. कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली माझी मोठी आई आठवते. तिच्याबरोबर माडाच्या झावळयांचे हीर काढता काढता गप्पा मारत बिडीचे झुरके मारणारी पणग्या आठवते. माझे लाड पुरवणारी जनग्या आठवते. आजोळ आजोळ म्हणजे तरी काय असतं? एक उबदार पांघरूण असतं. बालपण जपणारं !  

Saturday, March 15, 2014

सत्याचा विजय असो!

 रविवारची सकाळ
प्रसन्न .....थोडीशी सुस्तावलेली ...आळसटलेली
सोफ्यावर दोन चार वर्तमानपत्र विस्कटून पडलेली
बातम्या-- अग्रलेख-- चटपटे  , गंभीर लेख --शब्दकोडी  पांघरून -  ,
इमेल्स ,टारगेट , डेडलाईन   हे शब्द पुसून टाकणारी सकाळ !
Relax---
चहाच्या तिस-या ( की चौथ्या  पाचवा सहावाही असेल)
 कपाच आधण चढवून ती ओटयाशी उभी , गुणगुणत
रविवार सकाळ पसरत असते कणाकणाने
फक्त अकरा  वाजेपर्यंत


अकरा वाजतात
वातावरणात चैतन्य  उत्सुकता
आजचा विषय काय असेल
राजकारण --- करप्शन----काळा पैसा ----
सत्यमेव जयते  गीत सुरु होतं
जनसामान्यांनी जनांसाठी गायलेलं
ती शेगडी बंद करून ओटयापासून  दूर होते
लसूण सोलायला घेऊन बाहेर येते
चिकन करायला लागेलच लसूण
उत्साहाचं कारंज बनून तो येतो
नमस्कार आदाब खुशामादिन करता करता विषयाला हात घालतो
बोलता बोलता आकडे मांडतो , मध्येच गंभीर होतो
कधी डोळ्यात तरळलेलं  पाणी हळुवारपणे टिपतो
कधी जादूची झप्पी कधी खोल सुस्कारा
रडू आवरणारे प्रेक्षकांचे चेहरे
टी  व्हीसमोरचं वातावरणही बदलतं
हवेत आलेला ताण तिच्या श्वासात शिरतो की तिच्या श्वासातला हवेत
न   बघितलेल्या पिडीतांचे श्वास तिला हवेत जाणवायला लागतात
पोलीस स्टेशनमधली जबानी-डॉकटरांची तपासणी-- वकिलांची उलटतपासणी
कळ लागल्यानंतर  तिच्या लक्षात येतं की आपली नखं आपल्या हातात घुसली आहेत
तोंडात कडवट चव जमा होते
मागच्या वर्षीही हाच विषय होता तेव्हा तिनेही एसेमेस केला होता
चार दिवस  उदात्त वाटत होत
आज मात्र  ते उघडे वाघडे प्रश्न ऐकताना तिचं अंग आक्रसू लागलं
खुर्चीत बसल्या बसल्या ती पाय मांड्या आवळून थरथर थांबवू पाहते
थांबवा हे सगळं. वर्णनातून होणारे हे बलात्कार थांबवा प्लीज !
आतून येणारे उमाळे  दाबता दाबता आवाज होतोच
तिचा नवरा चमकून बघतो
ती कळवळून त्याला खूण करते
टी  व्ही बंद करता करता तो म्हणतोच, "अग , कार्यक्रम लढणा-या स्त्रियांचा आहे. भारीच बुवा सेन्सिटिव्ह तू "
अचानक टी  व्ही बंद झाल्याने नुकतीच मिसरूड फुटलेल्या मुलाच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह असतं
तिच्या डोळयाला मात्र धारा  लागलेल्या असतात.
      

Sunday, March 2, 2014

शब्द

शब्द असतात पहाटवेळी कोवळ्या गवतावर चमकणा-या दवासारखे
नाहीतर शब्द असतात त्सुनामीने झालेल्या भकास उजाड गावासारखे  !

मानले तर शब्द असतात वेळू बनातल्या बासरीचे सूर
नाहीतर शब्द बनतात अलगुजातून फिरणारा वारा बेसूर  !

शब्द मुके होतात ओथंबलेल्या  घननीळ मनामुळे
शब्द मुके होतात रित्या पालथ्या घड्यामुळेही  !

म्हणूनच
शब्द असावेत फुले मंद सुगंधी
शब्द नसावेत नकली माणिक मोती
शब्द तोडू  देत खोट्या ताठर भिंती
शब्द फुलवू  देत मना- मनांची नाती  !

नाती

कपड्यांचं कपाट  --------गच्च भरलेलं, ओथंबलेलं , फुटून बाहेर येऊ घातलेलं
कपडे लागतात तसेही ----- बाहेरचे, घरातले, हळदीकुंकवाचे आणि " सवाई"चेही 
कपडे असतात वेगवेगळे ----धुवून सुरकुत्या काढून घडी घातलेले कॉटनचे  
                                             चमकत्या रंगाचे  नायालोनचे
                                             परंपरागत खादीचे 
                                            केवडा घालून जपलेले रेशमाचेही ! 
पण मग कधीतरी 
                          कॉटनचे धागे विरतात 
                           नायलोनची चमक ओसरते 
                           खादीचा रंग उडतो  
                          रेशमालाही कसर लागते. 
मग मात्र 
                        कॉटनला रफू करावं लागतं
                         रेशमाला मागून पुढून ऊन द्यावं लागतं 
                        रंग उडल्या खादीचं काय करायचं हा प्रश्न असतोच 
                        नायलोनला  मात्र एक गरम इस्त्री पुरते.  
नात्यांचंही  तसंच असतं
                                    त्यांनाही अधून मधून कोवळ  ऊन द्यावं लागतं 
                                   विरलेले धागे जोडावे लागतात 
                                   कधी कधी ठिगळ लावून झाकावेही लागतात !                                
                                       
कपाटाचं  एक बरं असतं  ते बापडं लाकडी असतं 
मन मात्र आसुसतं  
                           कॉटनच्या उबेसाठी 
                          मऊसूत सोनसळी रेशामासाठी 
                          आणि रंग उडाल्या खादीसाठीही  !

Saturday, March 1, 2014

निरोप

उन्हे   आली उताराला , लांबल्या सावल्या अता
वाट  आता सरत आली निरोप द्यावा जिवलगा !
अनोळखी , अज्ञात आपण भेटलो  बहरलो इथे
पांघरोनी चंद्रमौळी चांदणेही, शांतलो   फुललो इथे !
जाणशी मम भाव राया, जाणते मीही तुला
भांडलो तम्डलो  तरीही, शोधते मी तुलाअन तू ही मला !
पण
पण लांबल्या सावल्या आता; येई सूर कानी बावरा
हात हाती घेता तुझा मी, जीव होई घाबरा !
हुरहुरे मन थरथरे तन ,जीव ना मला हा सावरे
हात सुटता वाटे मला की , तू कुठे अन मी कुठे!
शब्द ओले भाव माझे जाणसी तू  साजणा
 तूच मी अन मीही तू ,जाण या  अंतरीच्या  खुणा !