Friday, October 3, 2008

नवरात्र

पितरपाठ सरता सरता आमच्या शाळेत स्टाफरुमच्या शेजारच्या जिन्याखालच्या खोलीची साफसफाई सुरु होई आणि आम्हाला शाळेतल्या शारदोत्सवाचे वेध लागत. घटस्थापनेच्या दिवशी छान नटून थटून शाळेत जावं तर समोरच्या दृश्यानं मन प्रसन्न होई. शाळेच्या प्रवेशदाराजवळ हिरवेगार रसरशीत केळीचे खुंट बांधलेले असत. प्रवेशदाराच्याचजवळच्या व्हरांड्यात सनई - चौघडावाले येऊन सज्ज असत. संपूर्ण ग्राऊंड पाणी मारून, रांगोळी घालून सजलेले असे. सगळं वातावरणच मंगलमय, आल्हाददायक असे. शाळेच्या मुख्याध्यापिका शारदादेवीची पूजा करत, आरती होई. बाई शारदेची, पर्यायाने विद्येची उपासना कशी करावी हे कळकळीने सांगत. मग खिरापत घेऊन आपापल्या वर्गात जाण्याऐवजी आम्ही रांगेने आमच्या चित्रकलेच्या वर्गात जमत असू. (हा वर्ग खूपच मोठा असल्यामुळे आमच्या शाळेचे सगळे कार्यक्रम इथेच होत असत.) जेरेशास्त्र्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी! वर्षानुवर्षे शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत जेरेशास्त्र्यांचं प्रवचन असे. समोर बसलेल्या मुलींना समजेल अशा सोप्या रीतीनं जेरेशास्त्री प्रवचन करीत. लहानपणी त्यांची धीरगंभीर, तेज:पुंज मूर्ती मनात इतकी ठसली होती की, पुढे कित्येक वर्षं गोष्टीच्या पुस्तकात "विद्वान ब्राह्मण" असा उल्लेख आला की, माझ्या डोळ्यासमोर हमखास जेरेशास्त्र्यांची मूर्ती येत असे. दुस-या दिवसापासून नवरात्रीचे दिवस क्रीडा, भाषण, गायन, नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांनी गजबजून जाई.
कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचं नवरात्र सुरु होई. अंबाबाईची रोज षोडषोपचारे विविध प्रकारची पूजा बांधली जाई. आजही बांधली जाते. या पूजेने सजलेली, विलक्षण तेजाने उजळून निघालेली देवीची मूर्ती पाहण्यासाठी देवालयाचा परिसर गजबजून जाई. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून बायाबापड्या दर्शनाला येत. मंदिराच्या परिसरातच एकमेकींना हळदीकुंकू लावत. नवीन लग्न झालेल्या पोरीबाळींची चेष्टा मस्करी करत. घरच्या धन्याला, लेकराबाळांना उदंड आयुष्याचं दान आईकडे मागत. आंबाबाईची मूर्ती डोळ्यात साठावत माघारी परतत. जाणकार लोक देवी जिथे प्रगट झाली त्या स्वयंभू स्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय रहात नसत. रात्री अंबाबाईसमोर नामवंत गायक, वादक आपली "सेवा" रुजू करत आणि करवीरवासी रसिक त्यात न्हाऊन चिंब होत.
पाचव्या माळेला म्हणजे ललितापंचमीला त्र्यंबुली यात्रा किंवा टेंबलाबाईची जत्रा असे. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी. बहिणीच त्या, भांडल्या एके दिवशी कशावरून तरी. टेंबलाई रुसली आणि गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. काही दिवसांच्या अबोल्यानंतर अंबाबाईला चैन पडेना. ती निघाली बहिणीची समजूत काढायला. ललितापंचमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी वाजत गाजत टेंबलाईच्या टेकडीवर जाते. दुपारी बारा वाजता टेंबलाईच्या देवळाच्या प्रांगणात दोघी बहिणी भेटतात. त्यावेळी कोहळा फ़ोडला जातो. त्याचा एखादातरी तुकडा मिळावा यासाठी भाविकांची झुंबड उडते.
राजघराण्याच्या खाजगी भवानीमाता मंदिरात हे नवरात्र सुरु होतं. भवानीमाता शिवछत्रपतींचं कुलदैवत. त्यांच्या वंशजांची एक गादी कोल्हापुरात असल्यामुळे या नवरात्राला एक वेगळच खानदानी क्षात्रतेजाचं वलय आहे. इथेही गर्दी असते; पण अंबाबाईच्या देवळाच्या मानाने कमी. देवळामधली राजगादी, शाहूमहाराजांचा भव्य पुतळा, त्यांनी मारलेला आणि पेंढा भरून ठेवलेला गवा रेडा या सगळ्यामुळे मंदिरात एक अदबशीर शांतता असे. या देवीलाही रोज वेगवेगळ्या प्रकारे सजवले जाई. दरबारी गायक, वादक देवीपुढे सेवा रुजू करत. देवळात आलेल्या बायाबापड्या देवीनंतर महाराजांच्या गादीपुढे, शाहूमहाराजांच्या पुतळ्यापुढेमाथा टेकतच; पण या लोकांच्या राजाने प्रजेच्या मनात इतकं आदराचं स्थान मिळवलं होतं की, त्याने मारलेल्या गव्याचीही हळदीकुंकवाने त्या पूजा करीत. ही रणरागिणी भवानीमाता क्षत्रियांचं दैवत असल्यामुळे नऊ दिवस देवीपुढच्या चौकात तलवारीच्या एका फटक्यात बकरं मारलं जाई.
या मोठ्या उत्सवाबरोबरच आणखी एक उत्सव सुरु होई तो आम्हा मुलींचा. कोल्हापुरी भाषेत हादगा म्हणजे भोंडला. मुलगी साधारण पाच वर्षांची झाली की हादगा मांडला जाई तो ती सोळा वर्षांची होईपर्यंत. म्हणजे हादगा हा सण कुमारिकांचा मानला जाई. हस्त नक्षत्र लागले की याची सुरवात होई आणि नक्षत्र संपले की हा बोळवला जाई. म्हणजे हादगा १५ दिवस आणि १६व्या दिवशी बोळवण! हादग्याचा एक कागद मिळे. त्यावर एकमेकांसमोर तोंड करून सोंडेची कमान करून हत्ती असत. वर अंबारी सजलेली असे. बाजूला मुली फ़ुगडी घालत असलेल्या, बायका नटून थटून पूजेला चाललेल्या असत. हा कागद घटस्थापनेच्या दिवशी घरातल्या भिंतीवर चिकटवला जाई. त्याला चुरमु-याची, भिजवलेल्या शेंगदाण्यांची, गव्हाच्या ओंब्यांची, फुलांची आणि मुख्य म्हणजे सोळा प्रकारच्या फळांची माळ घातली जाई. आमच्या लहानपणी ब-याचशा घरांना भल्या मोठ्या बागा असत आणि त्या फळाफुलांने बहरलेल्या असत. मग घटस्थापनेच्या आदल्या दिवशी, शाळा सुटल्यावर सगळ्यांच्या बागा धुंडाळायचा एक कार्यक्रमच असे. जास्तीजास्त फळं मिळवण्यासाठी आमचा आटापिटा चाले. कुठे घरातल्या काकींना "पटवून" तर कुठे कुंपणाची तार वर करून गुपचुपबागेत शिरून तर कुठे "माझ्यातला एक पेरू तुला देते, तुझ्याकडचं एक केळं मला देतीस काय?'' अशा गंभीर वाटाघाटी करून फळं जमवली जात. या सगळ्या माळांनी सजलेला कागद भिंतीवर चिकटला की धन्य धन्य होई. मग सोळा दिवस पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याभोवती फ़ेर धरून नाचताना, लोकगीतातून साकारलेली या मातीची गाणी, या मातीतली गाणी गाताना मन झपूर्झा घेत रोज वेगळी खिरापत आणि तिची संख्याही चढत्या भाजणीने. रोज नवी गाणी आणि एकेक वाढत जात असलं तरी सुरवात मात्र "ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा'' अशी गणेशाला साकडं घालूनच होई. आता विचार करताना वाटतं की, आपल्या या शेतीप्रधान देशातला हा सृजनाचाच एक उत्सव असावा. सोळाव्या दिवशी हादगा बोळवायचा असल्याने त्या दिवशी तर साखरखोब-यापासून लाडूकरंजीपर्यंत सर्व प्रकारची खिरापत तर असेच पण साटो-या- कोल्हापुरी भाषेत सारनो-या, खांडवी/खांतोळी, वाटली डाळ/मोकळं तिखट, आणि मटकी उसळ यांचा समावेश असावाच लागे. एवढे सगळे पदार्थ असल्यामुळे प्रत्येकीचा हादगा वेगवेगळ्या दिवशी बोळवला जाई. मात्र हादग्याला दिवाळीचे दिवे दिसता कामा नये असा अलिखित दंडक असे "नाहीतर आंधळं व्हायला हुतय बाई'' याभितीनं भराभर हादगा बोळवण्यासाठी मुली आपापल्या आयांच्यामागे लागत. आता लक्षात येत ते हे की, पूर्वी सगळे फराळाचे प्रकार घरीच आणि मुबलक प्रमाणात करायचे असल्यामुळे त्या गडबडीत हादग्याचं प्रकरण नको म्हणून कुणीतरी हे आंधळेपणाचं पिल्लू सोडलेलं असावं.
हादगा संपला की चार दिवस हुरहूर वाटे पण लहान वयात दिवाळीच्या किल्ल्याचं, रांगोळीचं, फराळचं आणि मुख्य म्हणजे सटीसामाशी मिळणा-या नव्या कपड्यांचं आकर्षण त्यावर मात करी आणि आम्ही दिवाळीचे बेत करण्यात रंगून जात असू.
आजही नवरात्र असंच साजरं होत असत. काही किरकोळ फ़रक झालेही असतील, कारण कोल्हापूर सोडूनही ३५ वर्षं झाली. पण मला खात्री आहे आजच्या मुलींनाही हे उत्सव तितकेच आपले वाटत असतील. कारण वरचं आवरण बदललं तरी आतला गाभा भारतीय मनाचा आहे, तसाच लख्ख आणि निखळ!

Monday, September 1, 2008

कल्पित आणि सत्य

रोज सकाळी ६.२० पर्यंत आम्ही दोघे फ़िरण्यासाठी घराबाहेर पडतो. ठराविक मार्गानेच फिरायला जातो. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खोदकामामुळे रस्ता बदलावा लागला तरच दुसरा रस्ता पकडतो. अन्यथा आखीव रेखीव कॉलनीतून बाहेर पडून पुढच्या महामार्गावरच्या रहदारीवर एक डोळा ठवून चालण्याची कसरत आता आम्हाला जमू आणि आवडूही लागली आहे.
पूर्वी आमच्या कॉलनीच्या एका बाजूला सडक आणि दुस-या बाजूला शेतांचे लहान - मोठे तुकडे पसरलेले होते. आम्ही त्या शेतांमधून जाणा-या रस्त्यावरून फिरणं पसंत करत असू. आमच्याप्रमाणेच त्या रस्त्यावरून फिरण्यासाठी लोक मुद्दामहून यायचे, अगदी महामार्गाच्या पलिकडच्या कॉलनीतूनही. झाडांच्या सळसळत्या फांद्यांखालून जाताना, कधी काळ्याभोर शेतात स-या पाडलेल्या पाहताना, कधी वितभर रोपट्यांमधून खुरपणी - भांगलणी चाललेली पाहतानातर कधी एखाद्या शेतामधून उसाचे तुरे डोलताना पाहताना पन्नास पावलांपलिकडचा कर्णकटू आवाजांचा धबधबा विसरायला होतो म्हणायचे. सकाळच्या रामप्रहरी इथून जाताना त्यांच्या मनाच्या गाभ्यात एक हिरवा चाफा उमलायचा त्याचा सुगंध त्यांना दिवसभर प्रसन्न ठेवायचा.
कालान्तराने शरीराने शहरात पण मनात आपलं " गाव " जपणा-या त्या माणसाचा एकछत्री अंमल संपला आणि वावराच्या प्रत्येक तुकड्याभोवती तारेचं कुंपण आलं. नव्या पिढीचं काळ्या आईत काही आतडं गुंतलं नव्हतं, त्यामुळे पटापट त्या जागांवर वेगवेगळ्या सोसायट्यांचे फलक लागले. कदाचित आमच्या सोसायटीचा जन्मही असाच झाला असावा. काळाची ती गरज होती. त्याप्रमाणे सर्व घडत होतं.
हळूहळू एकेका वावरातली काळीभोर माती सिमेंटखाली झाकली जाऊ लागली. खडी, सिमेंट यांच्या ढिगांनी, कॉंक्रीट मिक्सरच्या घरघराटाने कॉंक्रीटची घमेली एका हातातून दुस-या हातात आणि तिथून पुढे तिस-या चौथ्या, पाचव्या आणि वरवर जाणा-या पुढच्यांच्या हातात जाताना उठणा-या आरोळ्यांनी, होणा-या ओरड्याने , शांत बेटासारखं आपलं अस्तित्व टिकवून धरणारा आमचा भाग मुख्य महामार्गाशी अलगद जोडला गेला. हे होत असताना छोट्या छोट्या बंगल्यांपासून थोडं हात राखून का होईना पण तुरळक झोपड्या उभ्या राहिल्या. अनिवार्यपणे .. या झोपड्यांतले आईवडील समोरच चाललेल्या बांधकामात गुंतलेले असत, देवानं पदरी दिलेलं दान देवाच्याच भरवंशावर सोडून. रोज सकाळी फिरायला जाताना त्या कच्च्याबच्च्यातली कोणी गोधडीत गुरफटून झोपलेली दिसत तर कोणी आपल्या अम्माच्या मागे मागे लुडबुडताना दिसत.
त्या दिवशीही नेहमीची रपेट आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला, फूटपाथला टेकून एक स्कूटर दिसली. स्कूटरस्वार एक पाय फूटपाथवर आणि दुसरा रस्त्यावर टेकवून पुढे झुकला होता आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन - चार वर्षांच्या मुलीचे गालगुच्चे घेत होता. मुलीच्या डोक्याचं शिप्तर, अंगावरचा फाटका, मळकट फ्रॉक बघून ती जवळच्या झोपडीतली असणार हे कळत होतं. मुलगी बाळसेदार आणि लोभस होती. एखाद्या ब-या घरात जन्मली असती तर "सोनुली" "छकुली" "साजिरी" म्हणून मिरवली असती.
"चढ पटकन" असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच मुलगी टुणकन उडी मारून स्कूटरवर चढली आणि हँडलवर हात ठेवून उभी राहिली. "हं , दाब " असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच तिने बटन दाबलं आणि पीप, पीप चा आवाज ऐकताच खुषीने मान डोलावत हसली. दुस-या क्षणाला स्कूटरस्वाराने स्कूटरला वेग दिला. सगळा दोन मिनिटांचा मामला. एक नजर त्या जोडीकडे टाकून मी पुढे सरकले. आणि स्कूटरस्वाराचं चित्र मेंदूवर उमटल्याने दचकून थबकले. चुरगळलेले कपडे, टापसलेला चेहरा, त्यावर दाढीमिशांचं जंगल. पाऊल पुढे टाकवेना. डोळ्यापुढे भीषण चित्रं यायला लागली. आणि त्या पोरीचा निष्पाप चेहरा. काहीच न सुचून मी नव-याकडे पाहिलं. त्याचाही चेहरा गंभीर दिसत होता. अरे देवा, म्हणजे मला जे वाटतय तेच त्यालाही वाटातय की काय ? आता मात्र मला धीर धरवेना.
त्या मुलीच्या आईच्या बेपर्वा वागण्याबद्दल तिला झापावं म्हणून मी वळले तर नव-याने हाताला धरून अडवलं आणि लांबवर बोट दाखवून म्हणाला, "तो बघ आला.'' तो स्कूटरस्वार दिसताच डोक्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. सैलावलेल्या मनाने तिकडे पहात राहिले. नवराही तणावरहित आवाजात म्हणाला, "बरं झालं आला ते. मी तेवढ्यात स्कूटरचा नंबरही बघून घेतला होता.'' एवढं होईतो स्कूटर जवळ आली. मुलगी उतरली आणि त्याचवेळी झोपडीच्या बाजूने एक दीडेक वर्षाचं पोर, अंगात फक्त सदरा आणि कमरेला करदोटा अडकवलेलं, मातीच्या ढेकळातून वाट काढत हात उभारून स्कूटरकडे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो स्कूटरस्वार त्याच्याकडे पाहून हसत होता.
" हुश्श! " म्हणून चालायला लागतानाच एक विचार मनात विजेसारखा घुसला. कुठून कुठे आलो आपण. काळ्या मातीबरोबरच बापाचं वात्सल्यही सिमेंटखाली गाडलं आपण !

Thursday, July 10, 2008

मन

कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ....... असं म्हणता म्हणता मागच्या आठवड्यातला एक समारंभ नजरेसमोर येतोय. कदाचित सांगता सांगता मन जाग्यावर येईल.
कोल्हापूरजवळ सादळेमादळेनजिक "निसर्ग " म्हणून एक ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसवलेलं. हिरव्यागार वनराजीनं वेढलेलं. शुध्द हवेचं. रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायला कंटाळला असाल तर मस्तपैकी बैलगाडीत बसून जेवा ना! म्हणजे बैठक घोंगडं अंथरलेली आणि पाठ टेकायला दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकं टेकवलेली. जेवण मस्तपैकी गावरान ( अर्थात "दोन्ही" प्रकारचं) एका भिंतीवर पितळेचा सगळा जुन्या पध्दतीचा संसार मांडलेला ( जो रात्री पोत्यात भरून ठेवला जातो) आणि भिंतीवर खाली घरकामात रंगलेल्या बायका रंगवलेल्या .. कुणी दळतेय तर कुणी भाकरी थापतेय. रोजच्या कुकरच्या शिटीपासून आणि फ्रिजच्या भाजीपासून दूर घेऊन जाणारं वातावरण ताजतवानं करतं आपल्याला!
आता थोडे कामाचे विचार येऊ लागलेत मनात. पण इतक्यात नाही उठायचं . अजून थोड्या गप्पा. कोल्हापूरपासून २० - २५ मिनिटांच्या अंतरावर काडसिध्देश्वराचा मठ आहे, कण्हेरी या ठिकाणी. या ठिकाणी एक खेडं वसवलं आहे मठाच्या वतीने . पण या खेड्यात माणसं रहात नाहीत, राहतात पुतळे, आणि ते घडवणारे कर्नाटकातले कारागीर, ज्यांनी शिल्पकलेचा ५ वर्षाचा अभ्यास केला आहे. एका वेसवजा कमानीतून २५ रुपयांचं तिकीट काढून तुम्ही आत शिरता आणि छोट्या छोट्या घरांच्या खेड्यातच प्रवेश करता. खेडं खोलगटात वसलेलं आहे आणि त्याची रचना पूर्वीच्या खेड्याप्रमाणे केली आहे. बारा बलुतेदार आपापल्या घरात बसून आपापले व्यवसाय करताहेत आणि हे पुतळे आहेत याची पूर्वकल्पना असूनही आपण दरवेळी एखाद्या पुतळ्याला माणूस समजून फ़सतो. इथे आपल्याला गवंडी, सुतार, लोहार, चांभार, सोनार, तेली बुरुड, कोरवी, नालबंद, न्हावी, कासार, कोळी, शिंपी, तराळ भेटतातच पण वतनदार, वैद्य, पंचांग सांगणारा ब्राह्मण चावडीवर वाद मिटवणारे पंच, कीर्तन करणारे प्रवचनकार इतकंच नव्हे तर जीव तोडून भुंकणारी कुत्रीही भेटतात. पाटावर शेवया कराणा-या बायका दिसतात तशी गोधडी शिवणारी आजीही दिसते. बैलगाडीत बसून सासरी चाललेल्या मुलीचे अश्रू पुसायला आपले हात पुढे होतात आणि त्याच वेळी तिच्या गाडीमागून खांद्यावर सामानाचं गाठोडं घेऊन निघालेला बाप आणि घराच्या अंगणातून निरोप देणारी आई बघून घशाशी आलेला आवंढा परतवायला त्रास होतो. प्रत्येक पुतळा म्हणजे मूर्तीमंत शिल्प. कासारणीकडे बांगड्या भरणारी लेकुरवाळी बाळाला पाजतेय तर बाळ हात लांब करून तिच्या मंगळसूत्राशी खेळतय. तिच्या पायातली साखळी जमिनीवर लोळतेय. दागदागिने, पेहराव, चेहरे घरातलं सामानसुमान, ते ठेवण्याची पद्धत यांचा इतका बारकाईने विचार केला आहे की "वा! सुंदर! अप्रतीम!" याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही.
खेड्यापासून थोडं लांब शेतं आहेत. मधल्या पायवाटेनं गेलं की सुरवातीला पाणवठा, पुढे कुरणात गाई, म्हशी, बक-या चरत आहेत तर डाव्या बाजूला एका शेतात नांगरणी चालली आहे तर दुस-या शेतात कुळवणी चालली आहे. कुठे शेतकरीदादा मोटेनं शेताला पाणी पाजतोय तर कुठे खळ्यावर मळणी, उफणणीची धामधूम चालली आहे. हे सगळं इतकं खरं आणि वास्तव की म्हशीच्या डोक्यावरच्या कावळ्यासकट आणि पाठीवरच्या पोरासह, शेताच्या बांधावरच्या म्हातारबाबासह प्रत्येक शिल्प आपली दाद घेऊन जातं. म्हणजे पुतळे बघून त्यांना लाला म्हणायचं की गनपा, मालक म्हणायचं की हनम्या हे आपण समजू शकतो. एकदा तरी ह्या खेड्याला भेट द्यावी आणि परत आलं की आपल्या माणसांना घेऊन परत जायचं अशी खूण मनाशी बांधावी असं वाटायला लावलेलं हे खेडं!
मन म्हटल्यावर ल क्षात आलं की खरचं मनाला कधी कधी असं स्वैर सोडून दिल्यावरच ते ताळ्यावर येतं. म्हणून म्हटलं कधी कधी मन तुमचं ऐकेनासं झालं की त्याला खेचू नका, असंच मोकळं सोडून द्या, भटकू दे त्याला हवं तसं थोड्या वेळानं आपोआपच ते परत येतं आपल्या जागी. कानात वारं शिरल्यावर हुंदडून परत आईला ढुसण्या देणा-या वासरागत!