Sunday, December 31, 2006

धमाका

समोरच्या स्क्रीनवरची रक्तबंबाळ माणसं,
थिजलेल्या चेहयाच्या सुन्न नजरा,
खिडक्यांवरचा लाल रंग,
काळजाला कुरडत जातो,
वारंवार वेगवेगळ्या चानल्सवर
आलटून पालटून येणारी
तीच दृश्य पाहताना
कानात घुमतो तुझा थरथरता स्वर---
" आई, मी सुखरुप आहे---
माझ्या मागेच उडाला धमाका
पण आई ग
मी सुखरुप आहे---"
त्याच वेळी ही जाणीवही कुरडते,
दोन मिनिटांच्या फ़रकाने
केवढी उलथापालथ झाली असती
कदाचित ! कदाचित ! क दा चि त !
स्क्रिनवरची अक्षरं धूसर होतात
डोळ्यातल्या पाण्याने
पण कळत नाही
ते पाणी
अमानुष विखारी थैमानाच्या निष्पाप बळींसाठी असतं
की नियतीच्या कृपेच्या आभाराचं देखील ?

Friday, December 29, 2006

सुप्रभात ?

सकाळची शांत वेळ, हवेत मस्त गारवा, अगदी हवा हवासा !आकाशातला मंद प्रकाश सभोवतालच्या अंधाराला छेद देऊ पहाणारा. मोकळी हवा छातीत भरून तुम्ही चालायला सुरवात करता आणि रस्त्याच्या कडेच्या बंगल्यातून झुडपा आडून तुम्हाला खसफ़स ऐकू येते. चमकून तुम्ही पहाता तर झुडपावर उमललेल्या कळ्या तोडण्याच काम इमाने इतबारे चाललेलं असतं. हातातली पिशवी बर्यापैकी फ़ुगलेली असते, त्या अर्थी हाताचा मालक या कामासाठी चाम्गलाच लवकर उठलेला असावा.
आपल्यापैकी सकाळी फ़िरायला जाणार्या बहुतेकजणांना दिसणारं हे नेहमीचच द्रुश्य आहे.सकाळची ही वेळ आपल्याला खर तर देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी वेळ असते, पण काही लोक घरातल्या मूर्तीला सुगंधाच्या ढिगार्याखाली गुदमरून टाकण्यातच धन्यता मानतात.
या फ़ूलवेड्या [फ़ूलतोड्या ? ] माणसाना आपण काही सांगायला गेलो तर त्यांचं प्रमुख उत्तर असतं की, " काय झालं, देवासाठी चार [ ? ] फ़ुलं तोडली तर ? " एकीन तर मला ठणकावून साम्गितलं , " अहो, आमच्या गणपतीला रोज लाल फ़ूल लागतंच. " आता बोला आहे काही उत्तर ? सगळ्यात कहर म्हणजे माझ्या फ़िरण्याच्या वाटेवर मला एक माणूस नेहमी दिसतो. हातातल्या पिशवीबरोबर दुसर्या हातात बारीक काठी घेऊन चालणारा. प्रथम मला वाटलं की भटक्या कुत्र्यासाठीची ती व्यवस्था असावी, पण नंतर दिसलं की झाडावरची हाताला न येणारी फ़ुलं काढायला तिचा उपयोग होतो.एवढं कमी असतं म्हणून हे गृहस्थ दगड मारून फ़ुलं " पाडण्याचा " उद्योग करत असतात.
खरंच माणसं असं का वागतात ? फ़ुलवाल्याकडे फ़ुलाचा एक पुडा लावणं इतकं महाग असतं का? दुसयाने लावलेली, वाढवलेली फ़ुलं तोडताना एक क्षणभर सुध्दा त्याच्या मनात अपरधीपणाची भावना का येत नाही ? खरच माणसं अशी का वागतात ? की त्यांनी लहानपणी कधी साने गुरुजी वाचलेलेच नसतात ?फ़ुलाच्या गंधाने , त्याच्या कोमलतेने त्यांच्या अंगावर सुखद शहारा उमटलेला नसतो ? खरच माणसं अशी का वागतात ? का ?