Friday, November 14, 2014

मल्हारबरोबर वाढताना

मल्हार तीन वर्षाचा होईपर्यंत माझं तसं बरं चाललं होतं. म्हणजे मी आजी आणि तो माझा नातू इतक स्पष्ट आमचं नातं होतं. मी त्याला काऊ चिउच्या गोष्टी सांगाव्यात भरवावं, जोजवावं. त्यानेही आपल्या बाळमुठीत माझं बोट पकडून मला त्र्यैलोक्याच साम्राज्य द्यावं. कसं मस्त चाललं होतं आमचं.पण मग तो वाढताना जाणवलं ते वेगळंच
 माझ्या पिढीच्या अनेक आज्याप्रमाणे  मीही ठरवलं होतं की जे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत डोळसपणे करू शकलो नाही ते नातवाच्या बाबतीत करायचं. म्हणजे आपल्या संसाराच्या धबडग्यात आपण मुलं वाढवतो असं आपल्याला वाटतं, पण ती खरं तर आपल्याला बघत आपणच वाढतात. तसं आजी झाल्यावर होत नाही. नातवंडाबरोबर घालवलेला क्षण न क्षण आनंददायी असतोच पण तो आपलीही वाढ करत असतो अस आता मला सतत वाटत असतं .
मल्हार लहान असताना मी सतत त्याच्याशी बोलत असायची. वेगवेगळी गाणी गुणगुणत असायची. तोही टकामका बघत ऐकायचा असं वाटायचं  पण त्यापेक्षाही त्या गाण्यांचे सूर,त्यांचा अर्थ त्याच्या आत आत कुठेतरी अधिक स्पष्ट रीतीने उमटतोय असं जाणवत रहायचं. दोन दिवसापूर्वीची गोष्ट. गाण  ऐकायचं असं मल्हार म्हणाला म्हणून एक कासेट लावली. तल्लीनतेने बसून त्याने पूर्ण ऐकली. परत दुस-या दिवशी " कालच्या आजीचं गाणं लाव म्हणून त्याने काढली ती कासेट किशोरी अमोणकरांची होती.
  जेव्हा मल्हार इतक्या लहान वयात मराठी भाषा समृ ध्दपणाने वापरतो तेव्हा खूप आनंद होतो.म्हणजे त्या दिवशी तो मावशीला तुझ्या घरी येतोय म्हणून सांगत होता. वर म्हणाला की" तूच फार दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला ये अशी गयावया करत होतीस ना म्हणून येतो." मध्ये तर सतत त्याला " कुहू" चावल्यासारखा कविताच करायचा. मराठी यमक जुळवून काहीतरी म्हणायचा आणि वर मला सांगायचा, " अरे, कविता झाली की रे."मल्हारच्या लेखी स्त्री पुरुष सगळेच " अरे " असतात.
 तो अगदी २ वर्षाचा असल्यापासून आम्ही दोघंही जवळच्या बागेत सकाळी जात असतो.तिथेही त्याला गवतावरचे दवबिंदू दाखव हिरव्या कोवळ्या गवताची , वाळलेल्या गवताशी रंगसंगती दाखव  रंगीबेरंगी फुलं , आकाशातले रंग , पक्षांची माळ दाखव  असे आमचे उद्योग  चालायचे.गम्मत म्हणजे  तो जेव्हा स्वानंदीबरोबर  कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा आपले कपडे स्वत; पसंत करतो आणि ते खरच छान असतात. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट अशी की आमच्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तो ज्या एकतानतेने झोके घेतो ते बघत रहाण्यासारखं असतं .
आजी झाल्यावर मला असं वाटतं की मूल थोडं मोठं झालं की त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं जायला पाहिजे. मी आई असतानाही माझ्या मुलांवर ती लहान असताना कोणत्याच बाबतीत दडपशाही  केली असं मला स्वत:ला वाटत नाही. कारण तशी तर माझ्यावरही माझ्या आईवडिलांनी केली नाही. पण मला वाटतं तेव्हा नकळत का होईना माझा दृष्टीकोन पालकत्वाच्या superiorityचा होता. म्हणजे ह्यांना काय समजतंय , ह्यांना शहाणं करून जगात रहाण्यायोग्य करणं, त्यासाठी त्यांची सर्वतोपरीने "काळजी " घेणं हे आई म्हणून माझं परम कर्तव्य आहे असा एक भाव होता. त्यामुळे त्यांच्यापरतं मला ( आजही ) दुसरं जग प्रिय नसलं तरीही आजी झाल्यावर एक फरक झाला तो हा की त्या बालजीवाचं म्हणणं " चिमखडे चमकदार  बोल " या सदरात न  घेता त्यावरही विचार केला जावा.ह्याचं एक उदाहरण म्हणजे संध्याछाया पडल्यानंतर सकल जोडप्यांचा वेळ जाण्यासाठी उगीचच वाद घालणं हा एक आवडीचा उद्योग असतो.( गरजूंनी आजूबाजूला  चौकशी करावी).कारण होतं काय की इतकी वर्षं एकत्र काढल्यानंतर नवरा बायकोला आणि बायको नव-याला संपूर्ण कंगो-यानिशी ओळखत असते.त्यामुळे एकमेकांच्या बोलण्यातला between the lines अर्थ ते चांगलेच जाणून असतात. पण मल्हार ३ वर्षांचा असताना एकदा ( बहुधा तोः तोच प्रयोग परत परत पाहून वैतागून ) मला म्हणाला, " कुकुली तू आणि आबा सारखे का भांडता? " त्या क्षणी मला फार फार वाईट वाटलं आणि त्यापेक्षाही जाणवलं ते हे की अरे, हे बाळ  आता मोठं झालं की . त्यानंतरआम्ही वेळ घालवायचे अन्य मार्ग शोधले.हे सांगणे नलगे.हे आई असताना कदाचित वेगळं घडलं असतं . त्यामुळे माझ्यासमोर केवळ मल्हारच वाढत नाही मीही वाढतेय. आणि ते निश्चितच आनंददायी आहे.एका अटळ सत्याकडे जाण्याच्या वाटेवर अंगावरची एकेक पुटं गळून पडावी आणि आत आत काहीतरी कोमल उमलत जावं पाकळी पाकळीनं तसं वाटतंय . 

No comments: