Saturday, November 29, 2014

जाग .......एका रविवारची

मी माझ्या घराच्या खिडकीशी बसलेय. सकाळचे साडेपाच वाजलेत. रविवार आहे. खर तर मला इतक्या लवकर उठायची काही गरज नाही पण आदतसे मजबूर . रोजची  उठण्याची हीच वेळ असते, त्यामुळे आपोआप  जाग येतेच. पण आज रविवार आहे. सगळं घर गाढ झोपेत आहे. सश्याच्या गतीने पळू पाहणा-या रविवारला बंद पापण्याआड पकडून पहात अंगावरच्या रजईत लपेटून  घेताहेत. पण मी जागी आहे. नुसतीच जागी नाही तर मस्त चहाचा कप घेऊन खिडकीशी बसले आहे.
बाहेरही सगळं शांत आहे. अंधाराचं गडदपण मंद होत चाललय.थंडीची झुळूक अंगावर बारीक काटा फुलवतेय खरी,पण तीही हवीहवीशी वाटतेय. समोरच्या घरातल्या आजी नव्वदीच्या उंबरठ्याशी आलेल्या , ओटयाशी  वाकून काहीतरी करताहेत ते मला माझ्या खिडकीतून दिसतंय. चहा करताहेत त्या.आता थोड्याच वेळात आपला वाफाळता कप घेऊन त्या बाहेर बाल्कनीत येतील. अंगाची जुडी करून सकाळची ही वेळ चहाच्या एकेका घोटाबरोबर अंगात मुरवत खुर्चीत बसून रहातील.
शेजारचं फाटक वाजलं. आता हळूच फाटक उघडलं जाईल. परत हळूच कडी घातली जाईल. शेजारच्या वहिनी फिरायला बाहेर पडतील. फिरायचं निमित्त असतं खर तर . त्या दूध आणायला बाहेर पडतील.पण सतत या दबावाखाली असतील की आपल्या फाटक उघडण्यामुळे कोणाची झोपमोड तर झाली नाही ना?
अजूनही अंधाराला उजाळा मिळालेला नाही. दूर कुठेतरी एखादी रिक्षा शांततेला उसवू पाहतेय.पण अजूनही घराघरातले दिवे झोपलेत. बाहेर नारळाच्या झावळ्या थंडीला अंगावर खेळू देताहेत. निस्तबद्धतेने. आजोबाने अंगाशी झटणा-या नातवाला न्याहाळावं तशा .
पक्षी उठलेत. पावसाळ्यात आपल्या सवंगड्याना साद घालणारे छोटे छोटे पक्षी आता गायब झालेत त्यामुळे फक्त कावाळ्याचा आवाज आणि मधेच कुठे तरी टीटयांवचा स्वर ऐकू येतोय. आता अंधाराला माघार घ्यावीच लागणार आहे कारण पूर्वेला दिशा उजळायला लागली आहे. झावाळयाही त्याचं समंजसपणे दिवसाला सामोर जाण्याच्या तयारीत आहेत. शेगड्या पेटवून चहाचं आधाण ठेवल्याचेही आवाज यायला लागलेत. रस्ता जागा झालाय. फिरायला जाणा-यांची चाहूल यायला लागलीय. मंद धुक्यात तरल पहाटेला कुशीत घेऊन तिचा निरोप घेऊ पहाणारा अंधार दिसेनासा झालाय आणि महानगरी आठवड्याचा शेवटचा दिवस मुठीत पकडायला जागी होतेय , येणा-या आठवड्याच्या deadlines calculate करत.   

1 comment:

रोहित भोइर said...

"जाग .......एका रविवारची"
खर तर नावातच खुप काही दडलेलं आहे …….
तुम्ही जे लिहील आहे ते खूप आपलेपणा सारख वाटत …
ह्या सगळ्या आता काल्पनिक गोष्टी वाटण्यासारख झाल आहे ………
कारण प्रत्येकजण स्वतःच्या विश्वात एवढा गुंतला आहे कि त्याला आपल्या आजू बाजूला लय चाल्लाल आहे याची जाणीव करून घ्यायची इच्छाच उरलेली नाही ………….
आणि तुम्ही पक्षांच जे बोलले ते अगदी खर आहे …… कारण पहिले गजर हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असे ………….
खुप सुंदर माझे बालपणीचे दिवस आठवले आणि त्यासोबत माझे "आजोबा "