Wednesday, February 7, 2024

डेकोरेशन

डेकोरेशन
आज फारा दिवसांनी हॉलचं डेकोरेशन बदललं. म्हणजे काय तर मनीप्लांटच्या नाजूक डहाळ्या असलेले नाजूकसाजूक पॉटस् इकडून तिकडे हलवले. चिण्णुकल्या मनीप्लांटना उलंउलसं पाणी घातलं. तरी एक कप्पा रिकामा उरलाच. मग ड्रावरमधल्या पिशव्या उचकल्या. तर त्यात मॉर्टी जिराफ एका बाजूला मान वळवून आणि सिंह ( बहुधा त्याचं नाव  अँँलेक्स असावं ) मागच्या दोन पायावर आणि पुढचे दोन पाय हातासारखे उभारून उभा दिसला. पटकन त्या दोघाना उचललं, ओढणीनं पुसलं. आणि त्या कप्प्यात ठेवून दिलं. किती आनंद दिला होता त्यांनी आम्हा दोघांना. आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझा नातू.( आता तो मिसरूड फुटायच्या वयात आहे ) तो बालवाडीतून आला, कपडे बदलले की मी जेवायचं ताट वाढेपर्यंत आजोबांची ड्यूटी खुर्च्या जोडून पडदे सोडून हॉलचा सिनेमा हॉल करायचा. मग आम्ही दोघे टीव्हीवर लहान मुलांच्या सीडीज बघायला मोकळे.त्यातली एक मादागास्कर. त्यातले दोन जिवलग मित्र मॉर्टी आणि अँलेक्स. त्या दोघांची जोडी बघितल्यावर मला तो सगळा माहोल तर आठवलाच पण सगळ्या बालमैत्रिणी आठवल्या. त्यांच्याबरोबर घालवलेले सुखद क्षण आठवले.मन अगदी अळुमाळू झालं. उचललं दोघांना आणि ठेवलं त्या कप्प्यात. आता कप्पा भरल्यासारखा वाटला.त्या दोघांमुळेपण आणि आठवणींनीसुध्दा !
आणि हॉलचं डेकोरेशन म्हणजे तरी काय ?आपल्या डोळ्यांना ,मनाला सुखवणारी सजावट.तशी ती झालीच  की !



Sunday, September 11, 2022

दुसरेपण

दुसरेपण 
 पुस्तक वाचता वाचता का कोण जाणे कुंदाताई आठवल्या. खरं तर पुस्तकातल्या व्यक्तीरेखेशी त्यांचं काहीच साधर्म्य नव्हतं. तरीही त्या आठवल्या. आमच्या घरासमोरच रहायच्या त्या. मोठं घर होतं त्यांचं. दारापुढे बाग मागे भलंमोठं परसू. आमच्या गावात परडं म्हणतं त्याला. अण्णा ,त्यांचे यजमान, गावात शाळेत हेडमास्तर होते. घरचा जमीनजुमला होता. एकंदरीत सुखवस्तु ,किंबहुना सधन घर होतं ते. कुंदाताईंची नात माझ्याबरोबरीची ,दोन वर्षांनी लहान होती माझ्यापेक्षा. तरीही मी त्यांना कुंदाताई म्हणतअसे. नातीमुळे त्यांच्या घरी माझा मुक्त संचार असे. 
कुंदाताईंना दोन सुना. मोठा मुलगा अण्णांच्या पहिल्या बायकोचा होता. ती कुंदाताईंची बहीणच होती. ती वारल्यानंतर अण्णांनी कुंदाताईंशी लग्न केलं., मुलाला आई हवी म्हणून. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी अशी लग्न सर्रास होत असत. म्हणजे बायको गेली की " मुलासाठी " किंवा पहिलीला मूल झालं नाही की" वंशवृद्धीसाठी "किंवा बायको गेली की " स्वतः साठी ",विवाह होत असत आणि त्यात कोणाला काही गैर वाटत नसे.
 अण्णांच्या आणि कुंदाताईंच्या वयात ब-यापैकी अंतर होतं .हे आत्ता जाणवतय तेव्हा लहानपणी काही कळण्याचं वय नव्हतं.
तसा कुंदाताईंचा सगळ्या घरावर वचक होता. इतर सर्व बायकांप्रमाणे त्याही घरासाठी करायच्या ,करवून घ्यायच्या पण तरीही त्या वेगळ्या होत्या. चापूनचोपून नेसलेल्यालुगडयाला हिंगाचा वास नव्हता की हळदीचा डाग..रोज संध्याकाळी अण्णा यायच्या सुमाराला तोंड धुवून पावडर लावून त्या तयार होत .अंबाड्यात बागेतलं फूलही माळलेलं असे.  गल्लीतल्या इतर बायका हे सगळं अभावानेच करत.गंमत म्हणजे त्यांच्या घरी खूप मासिकं असत वाचायला. कुंदाताई लायब्ररीच्या मेंबर होत्या. आमचं घरही पुस्तकांनी, ,मराठी ,इंग्रजी, खचाखच भरलेलं असे. मासिकं पाक्षिकं, साप्ताहिकंही असत पण इंग्रजी. मालूताईंकडे मात्र जी मासिकं असत ती  मला आमच्या घरी मिळण्याची सुतराम शक्यता नसे. त्यामुळे जाणिवा उमलण्याच्या त्या वयात त्यांच्या घरी माझ्या फे-या फार वाढल्या होत्या. आपण मासिक चाळतो आहोत हे दाखवत हवा तो मजकूर वाचायचं कसब मला बेमालूम जमायला लागलं होतं. पुढे आम्ही घर बदललं. गावाबाहेर लांब रहायला गेलो आणि कुंदाताई नावाचं कोणी माझ्या आयुष्यात होतं हेही धूसर होत गेलं.
आता गतायुष्याचे चौकोन जोडताना लहानपणी बघितलेल्या कुंदाताई , काळ्या नव-याला सामोरं जाणा-या कलाकार विमलाक्का, सवतीची मुलं मूकपणे संभाळणा-या सातवळेकरवहिनी  आमच्या काकींना फक्त नारळ आणि एक रुपयावर करून घेतलय हे सस्मित ऐकणा-या सौंदर्यवती जातककाकी आठवल्या आणि वाटून गेलं की त्या ख-याच होत्या की त्यांच्याच सावल्या ? स्वतःला त्या माहेरीच सोडून आलेल्या होत्या की आपण कोणालातरी सोडून आलोय याचीही त्यांना जाणीव नव्हती ? समवयस्क जोडीदाराचं स्वप्न त्यांनी कधी बघितलं तरी असेल का ? तेव्हा हे कळत नव्हतं, आणि या वयात कळतं तर पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा वारंवार पुसताना सांगावं लागतं , "वयोमानानुसार पाणी येतं डोळ्यात अकारणच."
मृणालिनी






Monday, September 5, 2022

संवाद गणेशाशी

बा गजानना ,किती दूरवर आणलंस तू, 
की एक निरागस रिंगण पुरं करवलंस तू ? कदाचित दुसराच पर्याय खरा असावा बुद्धी मंता
पण मग एक  नकळती हुरहूर का बरं ? 
लहानपणी तुझ्या आगमनाचा अर्थ फक्त सुगंध असायचा ,
उदबत्तीचा , फुलांचा ,उदाचा ,कापराचा आणि
खमंग गूळचुनाचाही !
पण मग बदलत गेलं रे पुढे सगळं , 
या सगळ्यांना दडपणाच्या किनारी ने वेढलं
तुझ्या येण्याच्या आनंदावर तुझं" नीट " झालं" पाहिजे"नी मात केली बघ.
रागावला असतास कारे तू थोडं डावं उजवं झालं असतं तर ,दयाघना ?

"आनंदकंद मज घरी पाहुणा यापरते दूजे सुख ते काय
आंधळ्याच्या गाई देव राखी म्हणूनि करवूनि घेशी ही जाण होय !


आता परत ते सुगंध जाणवताहेत नाकाला
- लंबोदरा ,एकदंता तुझा चेहरा  अधिकच मिश्किल  असतो झालेला
मातेभोवती गोल फिरून पृथ्वीप्रदक्षिणेची पैज जिंकल्यावर झाला होता तसा !
होय रे बाप्पा तसाच खोडकर .
तुझं सांगणं झिरपत जातं माझ्यात
आणि वहात रहातं  डोळ्यातून !
मृणालिनी

Tuesday, August 25, 2020

रुणझुणत्या पाखरा

 पुण्याहून कोल्हापूरला जाताना पेठ नाका ओलांडला की उजव्या हाताला एक टेकाड लागतं .४०  ,४५ , वर्षांपूर्वी ते एक छोटं टेकाड होतं, आता त्याने चांगल बाळसं धरलय.तर तेव्हा त्यावर एक छोटुकलं देऊळ होतं. त्यावरची भगवी पताका फडफडताना दिसली की कोल्हापूर जवळ आलं, माझ्या माहेरची हद्द सुरु झाली म्हणून माझं मन फुलून  यायचं . पुढे रस्त्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट जणू काही माझ्या घरातलीच आहे, असं  वाटायला लागायचं . टेकाड मागे टाकून जरा पुढे गेलं की डाव्या बाजूला दोन रस्ते घरंगळत शेतात घुसायचे. तिथे लालचुटुक मिरच्या उन खात रस्त्यावर लोळत असायच्या. जरा पुढे गेलं की उफणलेल्या धान्याची रास  उन खात असायची. दोन्ही बाजूला उसाची शेतं डोलत असायची.त्यांचा हिरवा रंग डोळ्यांना गारवा द्यायचा. बैलगाडीतून कडबा घेऊन चाललेले केरुनाना ,पांडूमामा,दुधाची किटली मोटारसायकलला लावून वेगाने जाताना तंबाखूची पिचकारी टाकणारा संपत, फताड्या शिंगांच्या म्हशीवर बसून म्हशी हाकणारा बबन्या , रस्त्यात आडवं आलेलं मेंढ्याचं  खांड हुर्र , हुर्र  करून हाकणारा विरुबाबा सगळे सगळे मला माझे सोयरे वाटायला लागायचे .  

सासर आणि माहेर यात बारा तासांचं अंतर. मुलांच्या शाळा एप्रिलमध्ये संपायच्या .मुलांचे वडील साखर कारखान्यात कामाला. तेव्हा हंगाम सुरु असेल तर तो संपेपर्यत थांबायला लागायचं. कारण एवढ्या लांब मुलांना घेऊन मी अबला कशी जाणार? असा प्रश्न वडीलधा-यांना पडायचा.माझ्या मनातलं पाखरू तर जानेवारीपासूनच रुण झुणायाला लागायचं. आणि माहेरच्या वाटेने ओढ घेऊ लागायचं. पण मी एकटीने  इतक्या लांबचा प्रवास करायचा म्हणजे सशाच्या शिंगाइतकंच दुर्लभ. पण एकदा हंगाम जूनपर्यंत चालणार होता ,तेव्हां माझी झालेली दयनीय अवस्था बघू घराच्यानीच  मला तिकीट काढून दिलं.सबंध प्रवासभर मी म्हणजे भेटीलागी जीवा लागलीसे आस या उन्मनी अवस्थेत. जम्बो आईस्क्रीमची फ्याक्तरी दिसल्यावर तर डोळ्यातून घळाघळा अश्रू. मुल कावरीबावरी. ते सगळ बघून समोरच्या म्हातारीने तर गहीवरच घातला. " पोरी, आपल्या हातात काय न्हाई लेकी, त्थाची विच्छा. "तेव्हा गडबडीनं तिला खरी परिस्थिती सांगितली. तर म्हातारी आपले मिश्री लावलेले काळे दात दाखवत मनापासून हसली आणि माझा अलाबला करत मनापासून म्हणाली, दोन लेकरं झाल्यावरबी  म्हयेराचा एवडा सोस बरा न्हवं लेकी. " आता तिला काय सांगू कि माझ्या माहेराचीच नव्हे तर अख्या कोल्हापूरचीच ओढ मला लागलेली असते. शिष्टाचाराचे कोरडे नमस्कार मागे टाकून प्रेमाच्या कडकडीत मिठीला, " किती दिवसांनी भेटलीस ग नाल्ल्याक" असा गावरान झटका घ्यायला माहेरीच यावं लागतं आणि तेही बिनओळखीच्या ,अनोळखी नव्हे हं  , बिनवळखीच्या बाईलाही लेकी म्हणाना-या आणि तिच्या चेहर्यावरून मायेने हात फिरवणा-या मावशी, काकी आणि मामीच्या  कोल्हापुरात.

Sunday, August 9, 2020

पुस्तक आणि कव्हर

परवा टी . व्हीवर  एक जाहिरात बघितली. त्यामध्ये एका माणसाला एका खेडेवजा गावातली जागा आपल्या कारखान्यासाठी पसंत पडते , पण इथे आपल्याला कामासाठी लागणारा निष्णात अधिकारीवर्ग मिळेल की नाही यासाठी तो साशंक असतो. त्याच वेळी एक पांढरे शुभ्र कपडे घातलेली स्मार्ट मुलगी येऊन म्हणते , "Dont judge a book by its cover."अर्थात ती साबणाची जाहिरात असते हे सांगायला नकोच.
नंदिनीच्याबाबतीत माझं असंच झालं. आमचा आठजणीचा ग्रुप आहे. मधून मधून कुठेतरी भेटतो, बाहेर जातो, मजा करतो. आता सगळ्या सत्तरीच्या बाया. .त्यात आता जबाबदारी कसलीच नाही. त्यामुळे सतत काही ना काही चालू असतं.कुठे जायचं असलं की एका विशिष्ट ठिकाणी आम्ही जमतो आणि रिक्षाने पुढे जातो. सगळ्या जमल्या की  मग नंदिता आणि सुमन घरंगळत येताना दिसतात. एकमेकीशी गप्पा मारत पाऊल टाकू की नको असा विचार करत त्या चालत असतात. एरवीही नंदिताच बोलणं हळूच. ती एकटीच असते. नवरा सोळा वर्षापूर्वी गेला. मुली अमेरिकेत. त्यामुळे तिची काळजी घेणं आपलं परम कर्तव्य आहे असं आमच्यापैकी प्रत्येकीलाच वाटायचं . मग रोज तिला आम्ही नाना प्रश्न विचारात असू. स्वयंपाक काय केला इथपासून पैशाच्या  व्यवहारापर्यंत सगळं सगळं आम्ही तिला सांगत असू. एखाद्या दिवशी आली नाही तर फोन करत असू. नंतर तिची आणि माझी जरा जास्त घसट वाढली . मग अधिक घरगुती गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की नवरा असताना तिच्या एका मुलीचं लग्न झालं पण दुसरीचं मात्र नवरा गेल्यानंतर ठरलं .मुलगी अमेरिकेत. तिथलाच भारतीय मुलगा . लग्न आमच्या गावीच करायचं होतं . कार्यालय  ठरलं तयारी झाली.आणि नवरादेवाकडून असं कळवण्यात आलं की , काही कारणामुळे त्याला कंपनी भारतात यायला रजा देऊ शकत नाही. ही इकडे एकटी कारण मोठी मुलगीही अमेरिकेत. तिने एकटीने कार्यालायाचं बुकिंग रद्द करण्यापासून सगळी कामं निपटली. एकटी अमेरिकेला गेली. तिथे मोठ्या मुलीच्या मदतीने धाकटीचं लग्न लावून दिलं. हे कळल्यावर मला वाटलं , आकर्षक कव्हर  नसलं तरी आतली कथा आकर्षक असू शकते.
आमची दुसरी एक मैत्रीण आहे. प्रचंड हुशार. संत वचनं तोंडपाठ. सगळ्यांना अत्यंत प्रेमाने सल्ले देते. वयानेही  मोठी असल्याने सगळे तिला मानही देतात. ती एकदा फोनवर मला म्हणाली , मला भयंकर भीती वाटते पुढे काय होईल याची. मला नवल वाटलं, इतक संतसाहित्याचं  वाचन . सगळ्यांना तत्त्वज्ञान  सांगतात आणि यांची अशी का बरं अवस्था ?  पण मग जाणवलं की माणूस बाहेर जसा असतो तसाच आतही असेल असं नाही. माणूस वाचण्याची मला आवड आहे. मला माणसं वाचता येतात असा अभिमान होता. पण या दोन पुस्तकांनी तो धुळीला मिळवला . पण आता खूण गाठ बांधली आहे की  कव्हर वरून  पुस्तकाचं परीक्षण करायला जायचं नाही. त्यासाठी त्याच्या अंतरंगात डोकावायचं , चाळायचं नाही वरवर, मन लावून वाचायचं, संदर्भ बघायचे  आणि मगच परीक्षण करायचं. कारण आधी कधी पुस्तकाची कव्हर्स फसवी असतात, कितीही आकर्षक आणि अनाकर्षक असली तरीही.     

Tuesday, August 4, 2020

भांडी

आपल्याला कधी काळी स्वयंपाकघरातल्या भांडयाबद्दल इतकं प्रेम वाटेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. खरं तर स्वयंपाकघरात मी काम करेन ,चांगले चुंगले पदार्थ करून खायला घालेन हे मला सशाच्या शिंगाइतकंचअसंभव वाटत होतं. ४६ वर्षांपूर्वी लग्नानंतर कोरी पाटी घेऊन मी गृहप्रवेश केला आणि केवळ आईचं नाव खराब होऊ नये म्हणून सासूबाईंच्या हाताखाली उमेदवारी सुरु केली.तीही एक डोळा कथा कादंबरीच्या पुस्तकावर डोळा ठेवून. आमची आई म्हणायची , पाण्यात पडलं की पोहता येतं, पण तोवर खूप पाणी नाका तोंडात जातं हेही खरं. पण त्याची गंमत परत कधी तरी. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना चक्क आवडायला लागलं मी केलेलं. अर्थात एवढं घुसळल्यावर इतकं लोणी तर येणारच ना?
पण अजूनही मला स्वयंपाकघर हे आपलं कार्यक्षेत्र  वाटत नव्हतं. मुलं म्हणाली आई बेसनाचा लाडू हवा, लाडू तयार. नवरा म्हणाला मिसळ केली नाही बरेच दिवसात, घाला मटकी भिजत असा मामला होता सगळा. नाहीतर एकेक बायका बघावं तेव्हा आज काय बुंदी पाडल्या उद्या काय दहीवडे केले असे एकमेकाशी काहीही संबंध नसलेले पदार्थ करत असतात. करोत बापड्या.त्यामुळे स्वयंपाकघराशी काही माझी नाळ जुळली नव्हती. आमची भूमिका आपली मदतनिसाची.त्यामुळे भांडयाबद्दल  काय ममत्व असणार ? रुखवतातली सोडल्यास भांडी सासूबाई आजेसासुबाईची  होती. त्यामुळे काडी काडी जमवून संसार केला असंही नव्हतं.मग भांड याबद्दल जिव्हाळा कसा बरं वाटणार ?पुढे सून आल्यावरही तिला सांगितलंकी बाई यातलं काय मोडीत टाकायचं तर टाक आणि तुझ्या आवडीची भांडी घे. त्यामुळे आता तीन पिढयांची  भांडी घरात सुखनैव नांदता हेत..मधेच कुठेतरी मी घेतलेली ग्लास , मिसळणाचा  डबा  असे फुटकळ जिन्नस लुडबुडतात.
आपल्यात स्त्रीसुलभ भावनांची उणीव तरी आहे किंवा आपण अलिप्ततेने संसार केला या विचारांचा फुगा दोन दिवसांपूर्वी फुटला.म्हणजे काय झालं , मी सकाळी चहा करायला ओट्याकडे उभी राहिले आणि ओट्यावर पितळेचा एक चकचकीत चमचा दिसला.  बघितलं तर ते करंजीच्या कडा  कापायचं  कातण होतं . पाठीमागून आवाज आला ," आई आपल्याकडे होतं ना असं ? ते हरवलं तर आजी किती दिवस बेचैन होती. मी आणलं चोरबाजारातून.. "खरच असंच होतं ते कातण. फक्त चमचा जरा खोलगट होता. त्या कातान्यावरून हात फिरवताना डोळे जरा चुरचुरलेच माझे.
तशी सासूबाईंच्या वेलची काही दुधाची पातेली काही वेळण्या सांडशी आहेत घरात.दुधाच्या वेळण्या आमटीवर झाकलेल्या चालायच्या नाहीत त्यांना आणि सांडशी ही.त्यावेळी पोरवयात हे सव्यापसव्य करताना वैताग यायचा, पण आता ती भांडी हाताळताना त्या आठवणींचे कणच हातात येतात. आपल्या डोक्यावर किती सुंदर छत्र होतं त्याची  जाणीव होते.आमच्याकडे कोकणातली एक विळी पण आहे. आडाळो  म्हणतात त्याला कोकणीत. धारपण  कोकणी माणसासारखीच आहे.  नवी नवरी असताना खूप वेळा शाहिस्तेखान होण्याची पाळी आली होती माझ्यावर तिच्यामुळे. दोन वर्षांपूर्वी ती विळी  ठेवत असताना निसटली. फरशीवर ती आदळू नये म्हणून मी ती पकडली तर कुठे? पात्याला. आता आजेसासूबाईंनी " चुकीला माफी नाही " म्हणून असा हात कापला कि हाताला तीन टाके घालावे लागले. मला मात्र त्यांनी मारलेला तो फटकाच वाटला. " गे सुने दिसणा नाय कि काय तुका ? लक्ष खंय होता ? "
आता मला जाणवतंय कि या भांद्यांनी  माझा अलिप्तपणा हळू हळू मोडीत काढलाय. मला त्यांच्यात सामावून घेतलाय. किती आठवणी आहेत त्यांच्या !नेहमीपेक्षा  वेगळा  एक डाव प्रश्नचिन्हासारखा  आहे, तो आम्ही फक्त ताकालाच वापरतो. प्रत्येक भांद्याच एकेका पदार्थाशी नातं जुळलेलं आहे. ते मी आता नीटच समजून घेतलाय. आता मी भांदयाशी  बोलतेसुध्दा. म्हणजे धुतलेल्या ताटल्या गळायला तिरक्या करुन  ठेवताना पडायला लागल्या तर मी त्यांना दटावतेही, "पडू नका, काम वाढवू नका ग बायांनो." पालथ्या वाटयाची   उतरंड रचताना तर प्रत्येक वातीला सांगावं लागतं , " शाबास !"कधी कधी पातेली ठेवताना त्यावरचं नवर्याचं नाव आईंच दिसतं आणि तरुणपणी त्याच्याबरोबर घातलेला वाद आठवतो , " भांड्यावर  तुझं नाव का  आईंच का नाही ? " हसू येतं  मला. हळुवारपणे मी भांडी ठेवते.४६  वर्षांच्या सहवासाने त्यांचं अचेनत्व आता निमालेल असतं.       

Wednesday, April 1, 2020

फक्त आठ मिनिटांचा व्हिडिओ

" आई इकडे बघ " असं म्हणून लेकीने मोबाईलचा  व्हिडिओ मोड सुरु केलाआणी  स्क्रीनवर वाळलेल्या गवताची पायवाट, आजूबाजूला अस्ताव्यस्त वाढलेली वड  चिंचेची झाडं , काटेरी झुडपं दिसायला लागली .आमची गुलाब , जाई जुई  मोगरा कुंदा ची रोपटी पोटात घेऊन , "झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उमलाया  म्हणत.
साखर कारखाना बंद पडला तेव्हा पोटासाठी गाव सोडलं त्याला खूपच दिवस झाले होते. तेव्हा दहावीत असलेली मुलं आता करती सवरती झाली होती. मग इतक्या वर्षांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी जागवाव्यात असं .वाटल्यामुळे सगळी हरिगावला जमली होती. स्क्रीनवर मागचा चौक दिसत होता. , म्हणजे ही  मागच्या दारातून आत शिरली वाटतं. म्हणजे मनाबाई जिथे भांडी घासायची ती जागा कुठे गेली ? पण मोबाइल आता मुळच्या  पिवळ्या पण आता ३१ पावसाळे अंगावर घेऊन काळ्या रंगाचे धब्बे आणि कोळीष्टक ,धूळ यांनी माखलेल्या  भिंतीवरून  फिरत होता.
" अग , या कोप-यात आपला बंब  होता नाही ?काशिनाथ संध्याकाळी घरी जाताना पाण्याने भरायचा आणि खाली वीस, गोवरी, लाकडं भरून जायचा .सकाळी आला की  बंब पेटवायचा" . माझं स्मरणरंजन सुरु झालं. " हो ग. आणि धूर झाला की  ब्लोअर फिरवायचा." लेकीचा दुजोरा .
मोबाईल धुळकट पायरीवरून मागच्या पडवीत शिरला . अजून कठडा शाबूत दिसतोय .. यावरच चढून एकदा मी शेजारणीला हाक मारली होती, माझा विळ्याने कापलेला रक्तबंबाळ  हात दाखवून दवाखान्यात नेण्यासाठी एरवी लेकीच्याच उपयोगाचा होता तो, त्यावर चढून पेरूच्या झाडापर्यंत पोचण्यासाठी , मैत्रिणीशी गुजगोष्टी करायला दोन घरांच्या  मधल्या भिंतीवर चढण्यासाठी .त्यालालागून एक भली मोठी संदुक होती लाकडी. त्यात मोटार दुरुस्तीचे पाने , पोलिश पेपर, वायर्स आणखी काय काय राम जाणे होतं. ती माझ्या नव-याची अमानत होती. संदुकीला लागून एक मोठं कपाट  होतं. त्यात चुन्याची निवळी , भाजलेल्या जखमेवर लावायची पावडरचा पत्र्याचा डबा, वर्षभरासाठी केलेल्या लिंबाच्या सरबताचे काचेचे रंगीत बुधले,गव्हापासून रव्यापर्यंतच्या लाकडी चाळण्या उदरात घेऊन उभं होतं आणि त्याच्या पायाशी एक मोठं जातं.  पण ओढायला एकदम हलकं. त्याची पुसटशी खूणही धुळीने पुसून टाकली होती. कोप-यातली लाकडी संदूक , सायकल , माठ , पाणी काढायचा दुंगा आपणच ३१ वर्षांपूर्वी कोणाकोणाला देऊन टाकलं होतं त्यामुळे क्यामे-याने फिरवलेल्या नजरेला त्यांच्या खुणा कशा दिसणार होत्या?
" आई  हा आपला ओटा  बघ ," स्वयंपाकघरातून हाक आली.
" हो ग , पण उजवीकडचा कट्टा कुठं दिसत नाही ग." कितीही नाही म्हटलं तरी आवाज कातर होऊ पहातच होता . त्याला दडपून म्हटलं; " आणि इथे आपला पाटा वरवंटा होता बघ , नंतर तो ओट्यावर ठेवला. "आपल्याला लक्षात येत नाही , पण कितीतरी गोष्टी आपल्या मनात दडून बसलेल्या असतात .
देवघरातला देव्हारा , दत्ताची मोठी तसवीर ,पूजेला येणा-या गुरुजींच्या हवाली केली होती निघताना . पण तिथली तीन ताळी , देवघराची अख्खी एक भिंत व्यापणारी  लाकडी मांडणी कोणी नेली? वरच्या फळीवर सात आठ पितळी  चकचकीत डबे होते आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते लाडू चिवडा चकली वड्या  यांनी भरलेले असत. मधल्या कप्प्यात गुरुजींचा कद घडी करून ठेवलेला. कारण ते कारखान्यातून येत ,धोतर बदलून कद नेसत आणि देवांची पूजा करत. पुढे तांदळाचे , डाळीचे मोठा मोठे डबे आणि खालच्या कप्प्यात चीनी मातीच्या उंचच उंच बरण्या. त्यात वर्षाची चिंच ....बागेतच झाड होतं, हळद... बागेतच लावलेली, आणि मीठ... हे मात्र एम. गोकुळदासच्या दुकानातून आणलेलं , भरून ठेवलेलं असायचं . ते मोठे डबे , बरण्या वेगवेगळ्या घरातलं सामान बनून राहिल्या होत्या आम्ही गाव सोडतानाच . पण तीन तीनदा हात जोडत डोळे मिटून देवापुढे नतमस्तक होणारे सासरे , " ऐकलात , देवासमोर आठ पाना वाढलीसत . बरोबर असा काय बघतात ?" असं कंबर दाबत विचारणा-या , घामेजलेल्या , सोवळं नेसलेल्या सासूबाईचे मला का भास होताहेत बरं त्या जागी ?
पुढच्या जेवणाच्या खोलीतलं टेबल , खुर्च्या , स्टूल , बादली आम्ही गाव सोडताना बरोबरच घेतलं होतं. पण आजमितीला त्यातल्या खुर्च्याच काय त्या साथ देताहेत.
इतक  होईस्तोवर बाईसाहेब पोचल्या की बेडरूममध्ये. या मोबाईलला भिंतीवरची धूळ नि माती दाखवण्यातच काय मजा येतेय बाई ?  भिंतीवरची दिनदार्शिका , त्यावर काही विशिष्ट दिवसासमोरच काढलेल्या चांदण्या , भिंतीला टेकून असलेलं टेबल, त्यावरची बाळाची दुधाची बाटली , कपाटाला तारेत अडकवालेली बिलं , काहीच कसं दिसत नाही ?
" हा मधला प्यासेज , हा आजोबांच्या खोलीपुढचा बाहेर उघडणारा दरवाजा. बघते आहेस ना आई ? "लेकीचं उसनं अवसानही सरतयस वाटतंय , आवाज बदललाय तिचा.
" हो ग , आणि आजोबांच्या खोलीला बसवलेली जाळीपण आहे बघ अजून." माझीही तिला साथ. पण तोपर्यत लेक  गेटकडे पोचालीसुध्दा . तिला समोरचा रस्ता , तिच्या बालमित्राचं घर दाखवायची घाई झाली होती. दूरवर जाणारा रस्ता आजही झाडीने आच्छादलेला दिसत होता , पण ती सूनियोजित लावलेली आंबा , जांभूळ, नीलमोहोर अशी झाडं नव्हती तर वा-याबरोबर कशीतरी उडून आलेल्या बीजातून अंकुरलेली वेडीवाकडी वाढलेली झाड  होती . चिंचेची, बाभळीची आणि कसली कसलीतरी. स्क्रीनवर तो उदास वाटणारा रस्ता मिनिटभर दिसला आणि त्याने डोळे मिटले. ते काही क्षणाचं शुटींग आमच्या बत्तीस वर्षांच्या संसाराचे रंग घेऊन आलं होतं!         

Sunday, January 21, 2018

दाणे

दाणे 
आमच्या मैत्रिणी म्हणजे अफलातून आहेत. आता सत्तरी आली तरी डोक्यातून काहीतरी विचित्र कल्पना निघत असतात. त्या दिवशी असंच झालं . कोशिम्बिरीत दाण्याचं कूट  घालावं  की खोबरं असा विषय चालला होता तरविजी म्हणाली की  दाणे या विषयाची किती माहिती तुम्हाला आहे ते बघू या. म्हणजे लागला की  नाही डोक्याला भुंगा.                                                                                                                                     
दाणे  म्हटलं तर विचार करायला  हवा की  शें गदाणे की ज्वारीचे दाणे की बाजरीचे दाणे ? बरं शेंगदाणे म्हटलं तर कच्चे दाणे की  भाजलेले दाणे ? आता कच्चे दाणे म्हटलं तरी दडपे पोह्यात किंवा कांदे पोह्यात तेलात तळून घातलेले दाणे की  चाकवतात किंवा अळूच्या फतफत्यात भिजवून घातलेले दाणे  ? बरं भाजलेले दाणे म्हणावं तर चिवड यातून  वेचून खाल्लेल्या खमंग दाण्याची चव जिभेवर घोळणार आणि त्याचा वेळी असे दाणे वेचून खाल्ल्याबद्दल आईने पाठीत दिलेला रपाटा  आठवून तीच जीभ दाताखाली येणार.आणि पाठ हुळहुळणार ते वेगळंच. मीठ घालून उकडलेल्या शेंगा फोडताना पिचीक्कन मिठाचं पाणी डोळ्यात जातं आणि डोळे चुरचुरतात ,' पण त्या दाण्यांची थोडी खारट , थोडी मातकट चव म्हणजे मस्तच !पण काहींना लोखंडाच्या कढईत खमंग भाजलेले दाणे खाणं म्हणजे परमानंद वाटतो. किंवा कच्चे दाणे  आणि गूळ वाटीत घेवून गोष्टीचं पुस्तक वाचता वाचता खाल्लेल्या दाणे गुळाची चव लोणावळा दाणे चिकीपेक्षाही भारी वाटते. शिवाय दाण्याचे दोन भाग करून आत गूळ  भरून भावलीच्या लग्नात बनवलेले लाडू तर उच्च कोटीचेच  असतात. या सगळ्या दाणे प्रकाराला आपल्या बालपणीचा स्वाद असतो आणि निरागस आनंदाचं वेष्टन ! नाहीतर मग असतातच मोठेपणी "  दाण्याचं  कूट अंमळ  कमीच झालं होतं हो ! "किंवा " आग ' उद्याचं उपासाचं  लक्षात आहे ना? नाहीतर वेंधळ्यासारखी खिचडी करायच्या ऐन वखताला घेशील दाणे भाजायला . " किंवा " अहो , उद्या अगदी साधा बेत करा बरं का . गरम गरम भाकरी , लोणी दाण्याची चटणी मिरचीचा खर्डा आणि साइचं दही." असेही दाने  भेटीला येतात .कि  मग घ्या विरजण लावायला , लसून सोलायला, खलबत्त्यात दाणे कुटायला आणि पाठवा पिंट्याला  गिरणीत ज्वारी दळून आणायला . अशी ऑरडर सोडणा-या पुरूषांच बरं असतं .त्यांना काय मित्र जमवून बेसन पिठात घोळवून तळलेले शेंगदाणे ग्लासातल्या सोनेरी पेयाबरोबर तोंडात टाकत शाम और भी  हसीन ,रंगीन करायला काय जातंय ?                                                                                                                                                 
ज्वारी बाजरी आणि गव्हाचे पण दाणेच असतात आणि कणसाचेही दाणेच असतात . पावसाळी हवेत निखा-यावर भाजलेलं कोवळ कणीस मीठ लिंबू चोळून दातात घुसवल की पावसातल कंच हिरव ओलेपण अंगाला वेढून येतं , किंवा हिवाळ्याची धुक्यात लपेटलेली गार शिरशिरी लोकरीच्या कपड्यातूनही आत शिरून अंगावर काटा फुलवते . आता मक्याच्या कणसाचे दाणे किंवा किसून त्याचा उपमा करा किंवा बटाटयाच्या संगतीनं त्याचं पेटीस  करा किंवा सूप करून डाएटची जागा भरा हे सगळे तद्दन शहरी प्रकार .
मटारच्या दाण्याबद्दलही  मला  तेच वाटतं  . शेतातले वेलीवरचे कोवळे मटार बाजारात आले की ,उपम्यात , पोह्यात शिरून त्यांची चव वाढवतात हे खरच , पण त्याबरोबरच मटार उसळ ब्रेड  ,मटार भात ,मटार करंज्या बनून आपल्या मेजावानीच  ताटही सजवतात . पण वेलावरून तोडून तोंडात टाकलेल्या मटार दाण्याची सर त्याला नाही .                                                                                                                                             
कुठल्याही वस्तूशी आपल्या आंबट गोड आठवणी जडलेल्या असतात . दाणे ते काय एवढासा शब्द . पण त्याच्या अर्थात एवढी विविधता दडलेली असेल आणि ती इतकी अनंददायक असेल असं वाटलं होतं का आपल्याला ? शिवाय अक्षरही मोत्याच्या दाण्यासारखं  असलं तरच वाचणार ना कोणीही ? 
इति दाणे पुराण समाप्त  !   

Thursday, January 11, 2018

कवडसा

कवडसा 
आज इन्स्टाग्रामवर एक फोटो पहाताना त्या फोटोत उन्हाचा एक कवडसा दिसला . उन्हाच्या पट्ट्यात चमकणारे ते धुळीचे कण पहाताना माझं मन कुलकर्ण्याच्या स्वयंपाकाघरात  गेलं .कुलकर्णी आमचे खासबागेतले , म्हणजे कोल्हापुरातले शेजारी . अण्णा  घरातले कर्ते  पुरुष . अक्का त्यांच्या पत्नी. अन्ना  मला फारसे आठवत नाहीत. कारण ते बहुधा शेतीच्या  कामासाठी गावाकडे असायचे. अक्का मुलांच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात   असायच्या.पण अण्णा घरी आले कि घरातलं वातावरण एकदम टेन्स असायचं. अण्णाना  पाणी द्या , चहा द्या. असं सारखं चालायचं .शिवाय अण्णा मुलांची झाडाझडती घ्यायचे ते वेगळंच .त्यामुळे तेवढे दिवस मी ते घर वर्ज करायची . वय तरी किती होतं माझं ? फारतर सहा सात वर्षांचं .पण मी सारखी त्यांच्या घरात पडीक असायची. त्या घरात माझ्या वयाचा रवी होता , बाळू थोडा मोठा होता .एखाद दुस_या वर्षांनी. रोहिणी उर्फ शिट्टी दोन वर्षांनी लहान . मुख्य म्हणजे मीना आणि बेबी . होत्या . त्यातली मीना माझ्या विशेष आवडीची होती . कारण आमच्या घरात तीन भाऊ होते आणि तेही माझ्यापेक्षा १७ , १५ , आणि ८ वर्षांनी मोठे . आपापल्या मित्रात दंग असलेले .आई बिचारी खोबरं खवा , खोबरं वाटा ,रस काढा आणि माशाचे वेगेवेगळे प्रकार करा यात गढलेली असायची, त्यामुळे माझी बहिणीची भूक कुलकर्णींच्या घरात भागायची . माझी पाच पेडी वेणी घालायला मला मीना  लागायची . बांगड्यांचे फुटके तुकडे आगीवर वाकवून तोरण करताना किंवा पांढरी शुभ्र रांगोळी चितारताना मीनाला गप्पा मारायला मी लागायची ..
कुलकर्ण्याच्या घराच्या आठवणी माझ्या घराइतक्याच मला चिकटलेल्या आहेत . कारण आमच्या दोघांच्या घराची भिंत सामाईक होती . आमच्या दोन्ही घरात जमीन अस्मानाचा फरक होता . आमच्या घरात स्वयंपाकघर सोडल्यास सगळीकडे लख्ख उजेड असायचा. विजेचे दिवे होते . पण हे घर फिकट उजेडात कायम गूढतेच पांघरूण पांघरून असायचं . संध्याकाळच्या  वेळी कंदिलाच्या काचा पुसून दिवाबत्ती केली की ते घर अधिकच गूढ वाटायचं  मग मी घरी पटकन सटकायची . त्यांचं स्वयंपाकघर अधिकच अंधार होतं . आपण आमच्या घरात नसलेल्या कितीतरी गोष्टी तिथे होत्या . आत शिरल्या शिरल्या उजव्या बाजूला झोपाळा होता . त्यावर गोधडीच उसं करून ठेवलेल असायचं . पांघरायला पासोडीची घडी ठेवलेली असायची. त्या सगळ्याला धुवट वास येत असायचा . उजव्या कोप-यात चूल मांडलेली असायची .तिच्या बरोब्बर वर उजेड येण्यासाठी काच बसवलेली असायची . त्या गवाक्षातून उन्हाचा कवडसा अक्कांच्या भाकरी थापायच्या परातीवर पडलेला असायचा . पितळी  परातीचा प्रकाश आणि अक्कांचा हिरव्या बांगड्यांनी  लखलखणारा गोरापान हात माझ्या स्मरणात अगदी कोरून बसला आहे .त्यांचा हात हलायचा आणि कवडशातले धुळीचे कण हलायचे . आपले बिलोरी रंग घेऊन नाचायचे . मी कितीदातरी तो कवडसा पकडायचा प्रयत्न केलेला मला लख्खच आठवतंय . स्वयम्पाकघरातल्या झोपाळ्यामागे एका घडवंचीवर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची . त्यातल्या तांदळाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असायचा .बहुधा एक कणगीही होती शेजारी . त्यात ज्वारी भरलेली असायची . शिवाय अण्णा गावाहून येताना गावाकडचा भाजीपाला , गुळाच्या ढेपा , शेंगाची पोती  ,आणायचे . हे सगळं सामान बैलगाडीतून उतरवलं जायचं , तेव्हा रवी बाळू शिट्टी ज्या अभिमानाने आत बाहेर करत असायचे , ते बघून " माझे बापू मेडिकल रीप्रेझेटेटीव्ह का झाले ? " असा एक असुयाभरा प्रश्न माझ्या बापुडवाण्या चेह-य वर उमटायचाच .
कुलकर्णी चं घर अगदी टिपिकल गावाकडच्या ब्राहमणाचं  होतं . सडा  रांगोळी , देवपूजा , वैश्वदेव , श्रावणी , नवरात्र , सोवळं ओवाळ पाळीच्या चार दिवसात बाजूला बसणं आणि आपला वारा जरी विटाशीच्या बाजूला गेला तरी " लागशील , " शिवाशील " असा चोरट्या आवाजात गजर करणं  या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आणि यातली एकही गोष्ट आमच्या घरात नसल्यामुळे लहानपणी मला या सर्वाचं प्रचंड कुतूहल होतं . माझी आई याला नाक मुरडायची. " जग खंय  चल्लासा आणि हे खंय चाल्लेसत अस म्हणायची  पण या सगळ्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं होतं जे मला मोहवत होतं . लक्ष्मीपूजना दिवशी पाण्यावर कोळशाची  पूड टाकून त्यावर पांढरीशुभ्र  लक्ष्मी चितारण असो , देव दिवाळीला शेणाची गोपूर , गोधन निर्माण करणं असो किंवा श्रावणात कहाण्या वाचण असो त्यांनी माझं बालविश्व गुढतेने भारून टाकल होतं . शिवाय त्यांच्याकडे गावाहून यल्लमाला सोडलेली  कमरेपर्यंत जाड जट असलेली कपाळावर भंडारा लावणारी बाई यायची किंवा लाल अलवण नेसणारी चोळी न घालणारी , केशवपन केलेली आजीही यायची आणि त्या गुढतेचं रिंगण अधिक गडद व्हायचं .वयाची पहिली आठ दहा वर्षं मी त्या वातावरणात एकरूप झाले होते . पण मोठं वय झाल्यावर या सगळ्यापासून मी आपोआपच वेगळी होत गेले . पण आता वाटतं लहानपणी त्यांच्या कलेने मला एक लखलखता कवडसाही दिला रंगीबेरंगी रजकणांचं नर्तन दाखवणारा ........        .. 

Wednesday, October 4, 2017

थेंब खुणावतो

गवताच्या पात्यावरच्या टपो-या थेंबान 
हळूच विचारलं , " येतेस का माळरानावर फिरायला ? " 
गुडघ्यातून उठणारी कळ जिरवत मी म्हटलं , 
" हात मेल्या  , माझं वय का आहे  उंडारायचं ?/ " 
           पानाच्या टोकावरून तोल सावरत थेंब म्हणाला  ,
          " माझ्याकडेतरी  कुठे वेळ आहे ?
          आत्ता जाईन  मी मातीत मुरून . "
मग ठरवलं  ,
        जाउयाच ओल्या वा-यात विरून.
       परतल्यावरही लावता येईल दुख-या गुडघ्यांना महानारायण तेल !

                                                                                    पाऊस नादावतो
 पावसाचाही एक नाद असतो
जीव ज्याने नादावतो.
ऐलतीरा  पैलतीरी हलकेच  सांधवतो !
     पावसाचा नाद एक
     गुज मनी जागवतो ,
     पानोपानी चिंब एक
    अलगुज कान्हा वाजवतो !
   थांब वेड्या थांब थोडा
  आवरी बेधुंद धारा.
  अवलिया तू  अनाहता रे
  सावरु दे  माझ्या मनाला ! 
  

Thursday, September 28, 2017

नै नों मे  बदरा छा ये 

 शांत वातावरणात गाण्याच्या लकेरी उमटत होत्या. नैनोमे बदरा छाये , बिजलीसी चमके हाये , ऐ सेमे सजन मोहे गारवा लगाये..... दूरवर पसरलेल्या अंधारात डोळे घुसवून कशाचा तरी ठाव घेत असलेली तिची नजर किंचीतशी गढूळली. गारवा च्या तानेला अडखळून  हातातल्या हिंदकळलेल्या ग्लासमधून तिने एक सिप घेतला. त्या तानेत  विरघळत तिने आपला आवाज त्या तानेत गुंफला. प्रेम दिवानी  हुं  मैं , परियोकी  रानी  हुं  मैं ...... तिचं शरीर स्वरांच्या हिंदोळ्यावर  भिरभिरणारं  मोरपीस बनलं . कानाशी गुदगुल्या करणारं . अतीव सुखानं तिने डोळे मिटले. पहात असलेलं स्वप्न डोळ्यातच बंदिवान  करण्यासाठी  . .....त्याच वेळी 
  त्याच वेळी दंडातून उठणारी काळ ओठातून बाहेर पडू नये म्हणून तिने दात ओठावर रोवला. " come on baby , Everybody is waiting for you. पार्टी मधेच सोडून तू निघून आलीस . मुद्दाम तुझ्यासाठी ठेवलंय  ना गाणं ? मि . माखीजा , शेट्टी, कपूर साब  all are there. so you should be by my side now to entertain them. come baby come. " दंडावरची बोटं अधिकच आक्रमक होऊन दंडात रुतली. एक नकळतशी लालसर रेघ नखांनी दंडावर उमटवत ....त्या थंड डोळ्यांनी शरीरावर उमटलेला शहारा लपवत तिने आपले डोळे त्या डोळ्यांना भिडवले . एका घोटात ग्लास रिकामा केला. त्याचा हात झटकून ती निघाली. थोड्या वेळापूर्वी पापण्यांच्या कडेशी येऊन ओठंगलेला थेंब पुसायची तसदीही न घेता ती खोलीच्या बाहेर आली .गारवा देणा-या अंधारातून डोळे दिपवणा-या रखरखाटात . स्वरांचं  गारुड मात्र तिने खोलीतच सोडून दिलं आठवणींच्या विळख्यात ........ 

Thursday, June 18, 2015

आठवणीतली माणसं अशीही

गतजीवनात फेरफटका मारताना साधारणपणे आपल्याला आपले आई - वडील , भाऊ - बहीण , मित्र - मैत्रिणी आठवतात. त्यांच्या सहवासात घालवलेले बरे वाईट क्षण आपण परत अनुभवतो., मनातल्या  मनात . पण आपल्या घरच्या मोलकरणी किंवा इतर सेवा पुरवणारे लोक  , दारावर येणारे भिकारी , बहुरूपी , फकीर यांनीही आपल्या मनाचा छोटासा का होईना कोपरा व्यापलेला असतो असं माझ्या  मनात आलं आणि मग लहानपणापासून भेटलेल्या अशा कितीतरी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या .
कोल्हापूरला माझ्या लहानपणी एक म्हातारीशी मोलकरीण होती. ती आठवण्याचं कारण मोठ गमतीदार आहे. आमच्या गल्लीत आम्ही खूप मुली होतो . मग मध्येच कधीतरी साड्या नेसायचं ठरायचं . माझी आई नेसायची नौवारी साडी. ती ७ - ८ वर्षांच्या मुलीला कशी नेसवता येणार ? मग माझ रडणं आणि आईच करवादण  असा जंगी कार्यक्रम चालायचा . त्या कार्यक्रमाला ही मोलकरीणही ( तिच नाव आठवत नाही आता मला ) हजर असली तर आईला म्हणायची , " दमा हो वैनी , उगा कावू नगासा लेकराला . मी नेशिवतो लुगड .आना  हिकडं ." मग ती काय जादू करायची नकळे . पण पोटावर नि-यांचं भलमोठ केळं  वागवत आणि नि-यांचा बोंगा संभाळत  मी मैत्रीणीत मिसळायचे . तशीच आमच्या शेजारच्या कुलकर्ण्याकडे एक जोगतीण यायची . तिचं भंडारा लावलेल कपाळ, कमरेपर्यंत आलेले जटेचे केस , मधूनच दात विचकायची सवय असलेला तिचा चेहरा मला स्पष्ट आठवतो . आता तिच्याबद्दल कणव वाटते , पण तेव्हा तिची भीती वाटायची .ती गोष्टी मात्र मस्त सांगायची .आपल्या गावरान भाषेत कथेतली पात्रं ती हुबेहूब उभी करायची .लोकसाहित्याची आवड कदाचित तिच्यामुळे माझ्यात रुजली असावी . परटीणबाई आमचे कपडे धुवायची , पण आईला बाहेरच्या जगात आजूबाजूला चाललेल्या घटनांची माहिती पुरवणं हाही तिच्या कामाचाच भाग असावा बहुधा. तसंही ६० वर्षांपूर्वी घरातच जुंपलेल्या स्त्रियांना अशा " मैत्रिणी " असणं गरजेचच नव्हत का ? परटीणबाईचे मालक दर दिवाळीला पटका बांधून बायको बरोबर ओवाळणी मागायला यायचा . भल्या पहाटे . आणि परटीणबाई पुरुष माणसांना तेल लावायची. ( जे आमच्या घराच्या कोणाही पुरुषाने कधीच लावून घेतलं नाही . ) या परटाच आमच्या मागच्याच गल्लीत दुकान होत . तिथे कपडे आणायला गेल तर कधी कधी तो कोळशाची इस्त्री पेटवत असायचा . हळू फुंकर घालून निखारे फुलवायचा . कधी राख उडायची तर कधी ठिणग्या  . तापलेली इस्त्री आधीच पाणी मारून ठेवलेल्या कपड्यांवरून चुरचुरत फिरायला  लागली की  कपड्यांच रूप पालटायच आणि एक खमंग वास दरवळायचा मस्तपैकी .
आमच्या शाळेत बापू , केशव आणि बक्षु नावाचे तीन प्यून होते . ही सगळी मंडळी कोल्हापूरच्या दरबारी खिदमतीत मुरलेली होती. त्यामुळे त्यांचं बोलणं मार्दवपूर्ण , हसणं मंद असायचं . त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम असायचं . पण बक्षु दिसायला भयंकर आणि वागायला तुसडा होता . त्यामुळे आमच्या लेखी तो " बक्षा " होता . त्याच्याशी संपर्क शक्यतो टाळला जायचा .
पुढे कॉलेजात दत्तू , गणपत आणि तयाप्पा असे ती प्यून होते . एकजात सगळे भगवा फेटा ( कोल्हापुरात याला पटका  म्हणतात.) बांधणारे पाठीवर शेमला सोडणारे आणि धोतर नेसणारे होते . ही  गोष्ट ५० वर्षांपूर्वीची आहे. तयाप्पा खूप प्रेमळ होता. तो वारला तेव्हा कॉलेजातली मुलं मुली रडली होती. त्याची मुलगी सुबक वाकळ ( गोधडी ) शिवायची . एकसारखे टाके बघत रहावेसे असत. ती माझी मैत्रीण होती. तिचं शिवण मला खूप काही शिकवून गेलं . तरुण वयात दत्तू पहिलवान होता . उंचापुरा राकट दत्तू  बघूनच पोर गपगार व्हायची . एकदा तर त्याने कॉ लेजच्या ग्राउंडवर कोण्या मुलाने शिवी दिली म्हणून आधी त्याला चांगला तुडवला आणि त्याची चड्डी काढून घरी पाठवला होता. वर दम दिला. " जा ___ -___, चड्डी न्याला तुज्या बाला पाठिव . " त्यामुळे दत्तू आमचा आधार होता. शिवाय स्पोर्टस्  डिपार्ट्मेंट्चा एक प्यून होता . तो आमच्या सामन्यांच्या आधी पायाला असा मसाज करायचा की  पायाला पंख फुटायचे. पण हे करताना नजर खाली आणि स्पर्श सात्विक . मर्यादा , सभ्यतेचा तो आदर्श होता .
लग्न झाल्यावर सासरी काशीनाथ , वाल्हा, दगडू भेटले. पण त्यातल्या दगडूने मनात घर केलं . दगडूमामा घरातलेच एक व्यक्ती होते . नव्या सुनेला सासूचा रोष सहन करावा लागू नये म्हणून ते सतत मला सुचना करत आणि तेही  शहाणपणाचा कुठलाच अभिनिवेश न बाळगता . " लहान्या बाई , बाईना ताकात  लोणी राहिलेलं आवडत नाही . लोणी निपटून काढा . लहान्या बाई दादाना ढोबली मिरचीची भाजी पीठ पेरून आवडते. "अशा त्याच्या सतत सुचना असत . स्वयंपाक, शिवणकाम , बाजारहाट , व्यापार सगळ्यात तो निष्णात होता . अदबशीर आणि मृदु . मनाबाई कलाबाई , शांताबाई सगळ्यांनी प्रेमच दिलं . माझ्या मुलांना खेळवलं दुखाण्या  खुपण्यात  रिझवल . शांताबाई तर आमच्या मुलांना न्हाऊ माखू घालणारी यशोदाच होती . ह्या सगळ्यांच्या लुगड्याचा शेव आमच्या अंगणी झुलला हे आमचं भाग्यच . ह्यांनी जात्यावर बसून ओव्या म्हटल्या , गाणी गायली . खिनभर टेकून आपल्या संसाराची चित्तरकथा सांगितली.ह्यांच्या लुगड्याला  गावाच्या काळ्या  आईचा वास होता .नागरी शिष्टाचारापेक्षा वेगळी  आपुलकी होती.
आणखी आठवतात ते दोघेजण . एक भिकारी दारी येऊन सुरात ओरडायचा , "म्हातारीला दात नाही . शिरा वाढा . " त्याला आम्ही तेव्हा हसायचो. पण आता वाटतं की  दुर्दैवाच्या फे-यात अडकलेलां तो कोणी तालेवार होता की  काय ? दुसरा एक फकीर होता. झोळीत  मोरपिसांचा मोरचेल एका हातात कटोरा आणि दुस-या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या पट्ट्या . त्या वाजवून तो सुरेख नाद करायचा.. आपण जर त्याला कधी " बाबा , माफ करो " अस म्हटलं तर म्हणायचा , " देगा उसका भला , न देगा उसकाभी भला. "
कुठे गेली ही असली माणसं ? की फक्त आठवणीतले आभास होते ते ?        

Sunday, February 1, 2015

मुक्काम तामसतीर्थ

खर  तर मला आता यशोधन बाळ  नावाच्या माणसाबद्दल लिहिलच पाहिजे . गेले दोन दिवस या ना त्या प्रसंगात त्याची आठवण येतेय. हे म्हणजे फारच झालं. फक्त दोन दिवसांची त्यांची माझी ओळख. त्यातही सहवास म्हटला तर फार तर सगळा मिळून चार सहा तासांचा. आणि तरीही हा माणूस आठवावा म्हणजे जरा अतीच होतंय. पण काही माणसं असतातच अशी. थोड्या सहवासानेही लक्षात राहणारी
म्हणजे त्याचं असं झालं ,२६ जानेवारी २०१५ हा दिवस नेमका सोमवारी आला. म्हणजे दुग्धशर्करा योग किंवा हल्लीच्या भाषेत म्हणावं तर सोनेपे सुहागां. घरात जर सोमवार ते शुक्रवार दिवसाचे १८ ,-१८ तास राबणारी मुलं असतील आणि त्यांचं मुल जर शाळेत झेंडावंदनाला गेलंच पाहिजे या वयापर्यंत पोचल नसेल तर ते या संधीचा फायदा घेणारच.त्यामुळे आपण सर्वांनी कोकणात जावं  असं मुलांनी ठरवलं आणि आम्ही ८जणं ,अर्रर्रर्र मुख्य माणूस मोजायचं राहिलच, मल्हारसह ( वय वर्ष ५ ) ताम्हिणीमार्गे लाडघरच्या दिशेने कूच करते झालो.
    कोकणाची एक रानभूल आहे. तिथली झाडी , तिथली माती , आणि तिथला सहस्त्रबाहू उभारून मंद्र स्वरात बोलावणारा समुद्र. नारळी पोफळीच हिरवगार गारुड हळूहळू रक्तात पसरायला लागत. मन अगदी आतून आतून शांत शांत व्हायला लागत आणि फेसाळत्या लाटांनी किना-यावर धडका मारणारा समुद्र दिसला की जीवाचा जिवलग सखा भेटल्यागत एक झपूर्झा सुरु होते मनात. प्रथम फक्त पावलं भिजवायची आहेत असं मनाशी ठरवून किना-या किना-याने दबकत चालायला सुरवात करावी तर लाटांच्या लडिवाळपणाने आपल्या पायाखालची वाळू कधी सरकते ते कळतच नाही. फक्त पावलं भिजवणा-या लाटा आपल्या मस्तकावर कधी तुषार उडवायला लागतात तेही उमजत नाही. मग सारा आसमंत विरून जातो. एकापाठोपाठ येणा-या लाटा , क्षितीजापर्यंत पसरलेलं पाणी,आणिक्षितिजापल्याड जाणारं क्षणोक्षणी रंग बदलणारं आणि त्याचं रंगात पाण्यालाही रंगवून टाकणारं सूर्यबिंब. हे सगळं सर्वांगाने आपल्यात साठवून ठेवणारे आपण एक बिंदू. त्या एकतानतेत ऐकू येणारी समुद्राची गाज.
    हे सगळं अनुभवायला आम्ही तामसतीर्थाला ( लाडघर ) पोचलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. बंगल्याचे  फाटक  उघडून उभे होते बंगल्याचे मालक यशोधन बाळ . शिडशिडीत अंगकाठी, ६ फुटावर उंची प्रथमदर्शनी डोळ्यात भरली. बंगल्याचं नाव होतं " गाज ". आल्या क्षणापासून गृहस्थाने आमचा ताबाच घेतला. तरुतलीच खुर्च्या मांडलेल्या असल्याने क्षणभर विसावा घेऊ असं ठरवणारे आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो. खोलीतून फ्रेश होऊन खाली आलो तर वाफाळत जेवण आमची वाट बघत होतं. आणि मग होतो तितके दिवस हाच अनुभव आला. रसना आणि क्षुधा तृप्त करणारं साधच पण रुचकर जेवण. ज्याला आपलेपणाचा वास होता. पहिल्या दिवशी आल्या आल्या यशोधन बाळाच बोलणं  ऐकून " अरे देवा , किती बोलतो हां माणूस" असं वाटलं खरं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं बोलणं " किती छान बोलतात हे " इथवर कधी येऊन पोचलं  ते कळलंच  नाही. ओळख नसताना माणसं वेगळी भासतात आणि नंतर ती सहवासाने उलगडायला लागली की  वेगळीच वाटतात. माझी सासू म्हणायची " पंक्तीत जेवल्याशिवाय आणि संगतीक रवल्याशिवाय माणसा कळणत नाय ! " यशोधन बाळांच बोलणं, मधूनच स्वत:बद्दल माहिती देणं आल्या आल्या  व्यावसायिकतेचा भाग  वाटला पण जसा जसा सहवास (तुटपुंजा का असेना.) मिळू लागला,तस तसं या माणसाचं " निखळपण " लक्षात यायला लागल. मुळात हा त्यांचा व्यवसाय नाही. मुलं मार्गी लागल्यानंतर आपल्याला आलेली पोकळी भरून काढण्यासाठी अर्पिता बाळांनी शोधलेला हा त्यांचा छंद आहे. आलेल्या अतिथीला खाऊ घालून तृप्त करणं . हे मानसिक समाधान त्यांना लाभावं म्हणून  यशोधन आपल्या सिनेमाच्या शुटीगमधून  वेळ काढून त्यांच्या मदतीला येतात. मग तिथे व्यावसायिकतेला वाव कुठून असणार ?  त्यामुळे  मग आमच्या संध्याकाळच्या   मैफिलीत आपणहून सामील होऊनचित्रपट व्यवसायातले किंवा पत्रकारीतेतले असो , किस्से साभिनय सांगताना त्यांच्या चेह-यावर एक आपुलकीचा भाव असायचा. आणि हे सगळं दुस-याच्या खासागीपाणावर (space ) अतिक्रमण होऊ न देता .त्याचं आपुलकीने त्यांनी सकाळी गरम पाण्याच्या बादल्या जिना चढून खोलीत स्वत: आणून दिल्यां. नाहीतर साधारणपणे अशा ठिकाणी " कामाची बाई आल्यानंतर  चहा आणि आंघोळीच पाणी मिळेल " असं कोरड उत्तर मिळण्याचाच अनुभव आपल्याला असतो. पण इथे म्हणजे घरच्या कार्याला नातेवाईक आलेत आणि त्यांची सरबराई चाललीय हाच भाव. त्यामुळे याशोधनानी स्वत: मासे करून आम्हाला खाऊ घातले आणि खाल्ल्यानंतर कळलं की  ते स्वत: मासे खात नाहीत. आणि याना साथ मिळाली आहे तीही समानधर्मा आहे. अर्पिता बाळानीही आमचे म्हणजे अगदी लाडच केले. एकही पदार्थ परत पानात repeat झाला नाही. घरगुती जेवण , प्रेमाने केलेलं . तेही सर्दीने डोकं जड झालेलं असताना आणि कमरेत उसण  भरलेली असताना.आजच्या व्यावहारिक जगात कदाचित याला वेडेपणा म्हणत असतील, कदाचित कशाला, निश्चितपणे. पण या वेडेपणामुळेच तिथे उतरणारे लोक त्यांचे कुटुंबीय बनतात . अर्पिता बाळाच्या शब्दात " extended family "              

Friday, January 16, 2015

शहाणपण देगा देवा

ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे विचारवंत येतात. त्यांच्या चेह-याच्या मागे तेजाच वलय वगैरे असतं. आणि आपण आदराने त्यांचं पुण्यस्मरण करतो. त्यांची शिकवण विनित भावाने वाचतो. आचरणात किती आणतो तो भाग वेगळा. पण हे विचारवंत एखाद्या दूरस्थ ता-यासारखे वाटतात मला. त्यांची ती दुर्बोध शब्दातली वचनं  मन उल्हासित करण्याऐवजी मला तरी गोंधळून टाकतात. खर सांगायचं तर मला inferiority complex देतात. कारण लहानणापासून वाचन म्हटलं तर कथा, कादंब-या आणि कविताच. आणि मोठे दोघेही बंधू म्हणजे वाईच्या विश्वकोशात आपापल्या विषयावर लेख लिहिणारे. त्यामुळे घरात कला आणि शास्त्र या दोनही विषयातले ग्रंथ भरलेले असायचे. आणि मी मात्र त्यांच्यावरची धूळ झटकण्याशिवाय  इतर कशासाठीही त्यांना हात लावत नसे. त्यामुळे शास्त्रवाला भाऊ चिडून चिडून मला फटकारायचा. " अशी पुस्तकं म्हणजे बांडगुळ "आहेत. काहीतरी वैचारीक वाच." त्यामुळे मी ती " बांडगुळ " तो समोर नसेल तेव्हा लोळत आणि समोर असेल तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन वाचत असे.
विनोदाचा भाग सोडून देऊ या , पण मला आता वयाच्या ६६व्या वर्षी असं वाटायला लागलाय की ज्ञानाचे दोन प्रकार असतात . एक माहितीचं ज्ञान आणि दुसरं जीवनाचं ज्ञान. ज्याला आपण चातुर्य किवा साध्या भाषेत शहाणपण म्हणतो ते ज्ञान. माहिती तंत्रज्ञान मानवजातीच्या विकासासाठी गरजेचं आहे याबद्दल दुमत असायचं कारण नाही , पण " शहाणपण "मानवजातीच्या मानसिक आरोग्यासाठी जरुरीचं आहे हेही तितकच खरं.
आता हा असा वैचारिक किडा मला का बरं चावला असेल ? त्याला कारण आमच्या यमु आजी. वय वर्ष ८९. एकदम उत्साहाचा झरा. ज्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी दासबोध वाचतील त्याचं तन्मयतेने दोन तीन तास रमीही मांडायला जातील.  बोलण्याची शैली अशी खुमासदार की त्यांच्या आयुष्यातल्या गंभीर प्रसंगांचही  विनोदी नाटुकल्यात रुपांतर व्हावं. तर अशा या यमु आजीचं  वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर  आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी  गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही  लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला  नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा  सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही  दुखवलं नाही. 
आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी  फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ?  घशाशी येणारा आवंढा गिळत  यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची  ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही  नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
मला माणसं वाचायला आवडतात. त्यांच्या पुस्तकाची पानं मला खूप काही समृध्द करतात. इथेही मला माझं  खुजेपण दिसतं, पण त्याने मी निराश होत नाही.मला inferiority complex  येत नाही.कारण मला माहीत असतं मी मला त्यांच्या पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करू शकते. म्हणून मला ग्रंथात जे सापडत नाही ते  माणसात सापडतं . त्यांचे अनुभव मला अधिकाधिक शहाणं करतात. आणि तसंही अंतिम तत्वापर्यंत   पोचेतो  आपण अधिकाधिक विशुध्द होणं चांगलच ना? 

Saturday, January 3, 2015

नाताळ

गोष्ट साधारण १९५९ -६० मधली. तेव्हा मी पाचवीत असेन. शाळेला नाताळची सुट्टी लागायची. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला  सगळ्या शाळाभर एकच विनोद, हल्लीच्या भाषेत पी जे फिरत असायचा. बाई किंवा सर सुट्टीचा अभ्यास द्यायचे आणि बजावून सांगायचे, " सगळा अभ्यास पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण अभ्यास "पुढच्या वर्षी "बघणार आहे मी."  कोणी शिक्षक कविता पाठ करायला सांगायचे. परत तेच डायलॉग  " कविता पाठ करायला वर्ष आहे.पुढच्या वर्षी म्हणून घेणार आहे ". अखेर आम्हालाही त्या "पुढच्या "वर्षीची इतकी सवय व्हायची की शाळा सुटल्यावर निघताना निरोपाचा धपका मैत्रिणीच्या  पाठीत मारताना जरा जास्तच जोरात मारला जायचां आणि आम्हीही एकमेकींना " आता आपली भेट पुढच्या वर्षी" असं हसत हसत सांगायचो .घरी गेल्यावर रात्री झोपताना मी आईला " मी आता पुढच्या वर्षीच उठणार" असं सांगून घाबरवून सोडलं होतं, पण भैय्याने " ए यडे  आज २४ आहे. तू काय १ तारखेपर्यंत झोपणार की  काय? " असं खवचटपणाने ( जो बहिणीशी बोलताना सगळ्याच भावांचा भाव असतो ( अरे अरे, वा वा काय जमलय वाक्य.)  विचारल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला . मग मी नेहमीप्रमाणे " ए आई , भैय्या  बघ की  कसा करतोय " असं ओरडून सूड घेतला होता.
लहानपणी आम्हाला नाताळाची सुट्टी असायची. ख्रिसमसची नाही.कारण मराठी भाषा आणि मराठी शिक्षक. पुढे ८वी ९वीत गेल्यावर त्याच स्पष्टीकरणही बाईच्या  तोंडून ऐकायला मिळालं होतं आणि तेच पुढे कितीतरी वर्षं मनात ठसलं होतं. बाई  म्हणाल्या होत्या , "या सणाला नाताळ म्हणतात कारण  त्या काळात गोरे लोक ताळतंत्र  सोडून वागतात, पण त्यांना कोणी काही म्हणत नाही. पाहिजे तेवढी दारू पिली तरी चालते. कितीही मास खाल्ल तरी चालतं." आणि हे सगळं बाई इतकं वेडवाकडं  तोंड करून सांगायच्या की  कित्येक वर्षं माझ्या डोळ्यासमोर " गोरे" लोक एका हातात दारूचा बुधला आणि दुस-या हातात चघळायला  हाडूक घेऊन रस्त्यावरून चाललेत आणि त्यांना कोणी रागावत नाही असं  चित्र येत असे. त्यात परत बाईनी चोरट्या स्वरात आम्हाला आणखी एक भयंकर सत्य(?) या सणाबद्दल सांगितलं  होतं की  ३१ तारखेला रात्री दिवे घालवतात आणि बरोबर १२ वाजता दिवे आल्यावर कोणीही कोणाचाही मुका घेतला तरी चालतो. हे आम्ही लाजरं हसू  दाबत गो-यामो-या होत ऐकलं होतं आणि त्याचं वेळी ठरवून टाकलं होतं की  काहीही झालं तरी नाताळच्या  वेळी इंग्लंडला जायचं नाही आणि असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. कारण तेव्हा कोणीही तिथल्या गो-यांना रागावत  नाही..येशू ख्रिस्ताची जन्मकथा किंवा  जीवन ,त्याचा उदात्त संदेश फार नंतर कळला पण तेव्हा नाताळ म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण  एवढच माहीत होतं. नाताळबाबाची  पोतडी आणि त्याची मध्यरात्री आपल्या घराला मिळणारी भेट ही  तर समजलेली गोष्ट होती. पण तेव्हाही नाताळबाबा ख्रिश्चनाच्यात असणार आपल्यात कशाला येणार असंच वाटत असे.आणि मोठ्या माणसांना जरी माहिती असायची तरी आपल्याही घरात मोजा टागावा आणि मुलांना त्याची मौज लुटू द्यावी हा विचारही नव्हता. कारण त्यावेळी मुलच कॉलेजला जाईपर्यंत पायात चपला घालत नव्हती तिथे नाताळ बाबासाठी  मोजा कोण कशाला आणतय.? ती गमंत आम्ही आमच्या मुलांसाठी केली आणि परत बालपण अनुभवलं, त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद बघून.!

Thursday, January 1, 2015

नववर्षाच्या शुभेच्छा

वाटलं होतं आजची सकाळ  थोडी  वेगळी असेल
किलाबिलता  सोनेरी पक्षी मखमालीवर बसलेला दिसेल
असेल त्याच्या डोईवर चमचमता तुरा
मधोमध बसवला असेल लखलखता हिरा

पेपरवाल्याने पेपर टाकला
दुधाच्या पिशव्या बास्केटमध्ये पडल्या
भाजीची फोडणी कुकरची  शिट्टी
पोळपाटाची खटखट
सुरु झाली आजही रोजचीच लगबग

 
किलकिले डोळे ताणून चष्मा शोधला
कुरकुरती हाडं गोळा करायला जरा वेळच लागला
एक घोट थायरॉईसाठी
 एक घोट पोटासाठी
कुशीवर वळा
 मान सांभाळा
 हलकेच चाला घेऊन काठी
 
स्वर्गीचा पक्षी, त्याचा सोनेरी तुरा
 गडगडत गेला लखलखता हिरा

 
 दार उघडून बाहेर येताच पडली समोर दाणकन उडी
" अरे  अरे पडेन ना झाले मी मोडकी मथाडी " ( म्हातारी )

HAPPY NEW YEAR KUKULI  HAPPY NEW YEAR
खळाळता झरा , सोनेरी किरण घेऊन आले त्याचे कोवळे  स्वर
किलाबिलता पक्षी माझ्या कवेत आला
माझी संथ सकाळ सोनेरी करत राहिला !
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:  
 

Friday, December 5, 2014

आमचा प्रवास........ टुकटुक गाव ते नॉर्थ पोल व्हाया कोथरूड

वेळ दुपारचे साडे चार. खर तर अत्यंत सुस्तावलेली वेळ असं कोणीही म्हणेल पण त्या दिवशी मात्र आमची फारच गडबड उडाली होती. कारण आम्हाला प्रवासाला निघायचं होतं आणि तेही ताबडतोब. त्यामुळे खांद्यावर एक पर्स अडकवून मी स्कुटरच्या मागच्या सीटवर बसले आणि मल्हारने स्कूटर भरधाव सोडली. खर तर कॉटवरची उशी थोडीशी कडेला आल्याने मला तोल संभाळण तसं अवघडच जात होतं, पण पुढच्या सीटवरचा स्वार मात्र फारच खुशीत आला होता. हातात आडवी धरलेली फणी उर्फ  स्कूटरच  हेंडेल आडवं, उभं, तिरकं धरून गाडी दामटवण्यात तो रंगून गेला होता. शिवाय तोंडाने चित्रविचित्र आवाज काढून वातावरण निर्मितीही चांगली साधली जात होती.पण सरळ प्रवास झाला तर त्यात काय मजा ? एकदम वेगळाच आवाज काढू स्कूटर थांबलीच.
"काय झालं? " माझा चिंतातूर प्रश्न.
 " अरे, काय नाही रे, पेट्रोल संपल. काटा लालकडे आलाय. आता काय करायचं? " नाही म्हटलं तरी स्वाराला जरा चिंता वाटलीच.
" बघा, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला निघताना पेट्रोल बघा म्हणून. " सवयीप्रमाणे मीही सुनावून घेतलं. नातू झाला म्हणून काय झालं, तोही भावी ' पुरुष'च.
"थांबा हो. घाबरू नका. आत्ता पेट्रोल आणतो." स्वार आपल्या पुरुषत्वाला जागून मला धीर देते झाले. पटकन खाली उतरून हातातलं  हेंडेल उंचावून त्यांनी खणायला सुरवात केली आणि बघता बघता अर्जुनाने बाण मारल्यावर जमिनीतून पाण्याचं कारंज उसळून भीष्माच्या तोंडात पडावं तशी पेट्रोलची धार रस्त्यातून  उसळून गाडीच्या टाकीत पडू लागली. धन्य झाले मी, कारण असा " अरब "आमच्या घराण्यात जन्माला आला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. कारण आमच्या टुकटुक गावातून निघून आम्ही कोथरूडला पोचण्यातच बराच वेळ गेला होता. त्यामुळे आम्ही आमची गाडी चायनाकडे वळवली. कारण तिकडच्या पांडाना आम्हाला बांबू द्यायचे होते बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला पांडा सापडले. ते कॉटखालच्या सामानाच्या टबमध्ये ( खर म्हणजे ते त्याच घर होतं. ) दाटीदाटीनं  बसले होते. मी बेबिजना  पानं आणि बिग पांडाजना  बांबु दिले. एका बाजूला झुकल्यामुळे दुखणा-य कमरेवरून हात फिरवताना मनात एक अंधुकशी आशा होती की आता परत कोथरुडमार्गे टुकटुक गावी जायचं. पण ५ वर्षांच्या सहवासानेही मी नातवाला ओळखलं नव्हतं हेच खरं. कारण आता आम्हाला अमेरिकेला जाऊन लायब्ररीचं पुस्तक परत करायचं होतं मग पुढे ( कि वर ?) नॉर्थ पोलला जाऊन पोलर बेअरला मासे द्यायचे होते.  निघताना माझ्या मोबाईलच्या  तळहाताएवढ्या पाऊचमध्ये एका कप्प्यात बांबू आणि दुस-यात मासे घातले होते ते मी विसरलेच होते. तिथून निघताना मला पुढच्या बाजूने पोलर बेअरची माहिती उडत उडत ऐकू येत होती. पण त्यातलं आता एवढच आठवतंय की  येताना एक पोलर बेअर आणायचा आहे आणि खोलीएवढा फ्रीज घ्यायला बाबाला सांगायचं आहे.त्यात तो ठेवायचा आहे. मला चिंता एवढीच की  माझ्या पाउचमध्ये पोलर बेअर मावला नाही तर मला कोल्हापूरला जाऊन एक मोठ्ठी पिशवी  विकत घ्यायला लागून परत व्हाया कोथरूड नॉर्थ पोलला यावं लागेल की काय ?      .     /   

Saturday, November 29, 2014

जाग .......एका रविवारची

मी माझ्या घराच्या खिडकीशी बसलेय. सकाळचे साडेपाच वाजलेत. रविवार आहे. खर तर मला इतक्या लवकर उठायची काही गरज नाही पण आदतसे मजबूर . रोजची  उठण्याची हीच वेळ असते, त्यामुळे आपोआप  जाग येतेच. पण आज रविवार आहे. सगळं घर गाढ झोपेत आहे. सश्याच्या गतीने पळू पाहणा-या रविवारला बंद पापण्याआड पकडून पहात अंगावरच्या रजईत लपेटून  घेताहेत. पण मी जागी आहे. नुसतीच जागी नाही तर मस्त चहाचा कप घेऊन खिडकीशी बसले आहे.
बाहेरही सगळं शांत आहे. अंधाराचं गडदपण मंद होत चाललय.थंडीची झुळूक अंगावर बारीक काटा फुलवतेय खरी,पण तीही हवीहवीशी वाटतेय. समोरच्या घरातल्या आजी नव्वदीच्या उंबरठ्याशी आलेल्या , ओटयाशी  वाकून काहीतरी करताहेत ते मला माझ्या खिडकीतून दिसतंय. चहा करताहेत त्या.आता थोड्याच वेळात आपला वाफाळता कप घेऊन त्या बाहेर बाल्कनीत येतील. अंगाची जुडी करून सकाळची ही वेळ चहाच्या एकेका घोटाबरोबर अंगात मुरवत खुर्चीत बसून रहातील.
शेजारचं फाटक वाजलं. आता हळूच फाटक उघडलं जाईल. परत हळूच कडी घातली जाईल. शेजारच्या वहिनी फिरायला बाहेर पडतील. फिरायचं निमित्त असतं खर तर . त्या दूध आणायला बाहेर पडतील.पण सतत या दबावाखाली असतील की आपल्या फाटक उघडण्यामुळे कोणाची झोपमोड तर झाली नाही ना?
अजूनही अंधाराला उजाळा मिळालेला नाही. दूर कुठेतरी एखादी रिक्षा शांततेला उसवू पाहतेय.पण अजूनही घराघरातले दिवे झोपलेत. बाहेर नारळाच्या झावळ्या थंडीला अंगावर खेळू देताहेत. निस्तबद्धतेने. आजोबाने अंगाशी झटणा-या नातवाला न्याहाळावं तशा .
पक्षी उठलेत. पावसाळ्यात आपल्या सवंगड्याना साद घालणारे छोटे छोटे पक्षी आता गायब झालेत त्यामुळे फक्त कावाळ्याचा आवाज आणि मधेच कुठे तरी टीटयांवचा स्वर ऐकू येतोय. आता अंधाराला माघार घ्यावीच लागणार आहे कारण पूर्वेला दिशा उजळायला लागली आहे. झावाळयाही त्याचं समंजसपणे दिवसाला सामोर जाण्याच्या तयारीत आहेत. शेगड्या पेटवून चहाचं आधाण ठेवल्याचेही आवाज यायला लागलेत. रस्ता जागा झालाय. फिरायला जाणा-यांची चाहूल यायला लागलीय. मंद धुक्यात तरल पहाटेला कुशीत घेऊन तिचा निरोप घेऊ पहाणारा अंधार दिसेनासा झालाय आणि महानगरी आठवड्याचा शेवटचा दिवस मुठीत पकडायला जागी होतेय , येणा-या आठवड्याच्या deadlines calculate करत.   

Saturday, November 22, 2014

देवाबद्दलची माझी संकल्पना

काय असत की, एका ठराविक वयानंतर  माणसाला आपल्या वेगवेगळ्या संकल्पना तपासून पाहण्याचा नाद लागतो. लहानपणी हे असले विचार मनात येणं अशक्यच. पराकोटीच्या हुशार किंवा अलौकिक व्यक्तिंबाबतच  असली वैचारिक चर्चा संभवते. आणि आपण तर सर्व सामान्य. तरुण वयात आपली जी काही बरी वाईट मत असतात ती ठाम तयार झालेली असतात.शिवाय भवसागराच्या लाटा नाका तोंडात जाऊन जाऊन दमछाक होत असते . त्या लाटा परतावण्यातच  निम्मी शक्ती खर्च होत असते.पण वय वाढल्यावर ( अग बयो , म्हण की म्हातारपणी ) वेळच वेळ. जी काही मदतनीसाची भूमिका असते ती पार पाडल्यानंतर वेळच वेळ. अशा वेळी मनात उन पावसाचा लपंडाव चालू असतो. तो कधी सुखद असतो तर कधी त्याला कातरतेची किनार असते. अर्थात ती क्षणभरच. कारण गेलेले दिवस परत येत नाहीत हे आता मनाने स्वीकारलेलच असतं.
लहानपणाची हीच तर गम्मत असते. निरागसपणा अजून मनात भरलेला असतो. सगळं जग ( म्हणजे आजूबाजूचे शेजारी , शाळेतल्या मैत्रिणी आणि शिक्षक ह्यापरत वेगळं जग असतं कुठे लहानपणी ?) चमत्कारानेच भारलेल असतं या वयात. अर्थात आता "असे" असंच म्हणावं लागेल. कारण आताची मुलं शास्त्रीय युगातली असल्यामुळे ज्या गोष्टी आम्ही डोळे मिटून मान्य करत होतो त्या गोष्टीतल्या तृटी  सहजपणे शोधून त्यावरची उपाययोजनाही ते आपल्याला अशा सहजतेने सुचवतात की वाल्मिकी आणि व्यासांनी ह्यांच्या पायाशी बसून story telling चे धडे घ्यावेत.
पण आमच्या लहानपणी सगळ्या जगाची तीन भागात वाटणी झालेली होती. पैकी देव हे चांगले असल्याने ते आकाशात, माणूस अर्थात पृथ्वीवर आणि राक्षस ( ज्यांचं काढताच लपायची सगळ्यात सेफ जागा म्हणजे आईच्या पदराखाली ) हे पाताळात. बरं देवही तेहेतीस कोटी .वेगवेगळी शक्ती असल्याने वेगवेगळ्या संकटात त्यांचा धावा केला जायचा. म्हणजे परीक्षेत अडचण तर देवी सरस्वती. बुद्धी तर अर्थातच देवा श्रीगणेशा. शक्तीसाठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आणि भूत प्रेत समंधादीसाठी रामरक्षा आणि भीमरूपी यांचा  डबल  डोस असायचा शिवाय या सगळ्या देवांची वस्ती गाईच्या पोटात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दिसेल त्या गाईला हात लावून आम्ही मैत्रिणी पुण्याचा अखंड संचय करून ठेवत असू. कारण देवांच्या वस्तीत स्वर्ग आणि नरक अशीही एक विभागणी असायची. स्वर्गात गेलं तर प्रश्नच नाही. आपण फक्त कल्पवृक्षाखाली बसायचं आणि अमृत पीत रहायचं. कारण त्या अप्सरांच्या नाचात वगैरे आम्हाला रस नव्हता. पण नरकात जाऊन पापणीच्या केसाने मीठ गोळा करायच किंवा कढईत उकळत्या तेलात पडायचं म्हणजे अंमळ कठीणच होतं. असो. गेले ते दिवस आणि उरल्या त्या त्यांच्या निरागस आठवणी. चेह-यावर स्मितरेषा उमटवणा-या .
घरातलं बुद्धिवादी वातावरण, वाचनाने दिलेली व्यापक दृष्टी यामुळे देवाबद्दलची संकल्पना बदलायला लागली. देव मूर्तीत नसून माणसात आहे, याचं भान येऊ लागलं. पण तरीही संत वाचनातला भक्तभाव मनाला लुभावत होताच. संतांसाठी देवाने रूप धारण करावं, जनाई ला दळू कांडू लागावं, नरहर सोनाराला कमरपटटया साठी माप देताना कधी शंकर तर कधी विठ्ठलाचं रूप दाखवाव आणि सर्व देव एकच आहेत हे पटवावं. दामाजीपंतासाठी बादशहापुढे " तुमच्या महाराचा मी महार" म्हणावं , एकनाथा घरी पाणक्या श्रीखंड्या बनून पाणी भरावं यातला romanticism मनाला स्पर्शून जात होताच.  पण काही मिळवण्यासाठी उपास कर, कुठलतरी स्त्रोत ५० वेळा वाच किंवा अमुक देवळाला अनवाणी पायाने प्रदक्षिणा घाल हे फारच हास्यास्पद वाटायचं. आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग आले. पुढे अंध:कार असावा वाट दिसेनाशी झाली. त्यावेळी " परमेश्वरा" अशी आर्त हाकही ओठी आली पण ती ठेच लागल्यावर " आई ग...' ओठी आलं तितक्याच सहजतेची होती. जखमा धुवून पुसून आपणच मलमपट्टी करायची आहे हे माहीतच होतं.
वयानुसार भाबडेपणा अधिकाधिक कमी होत गेला. पण त्याचबरोबर तरुण वयात देव देव करणा-यांबद्दल जे कुत्सित उपहासाने बोललं जात होतं ते बंद झालं. आपल्याच आयुष्यात अगदी तरुण वयात आपणही काही  जीवघेण्या प्रसंगात देवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण केलं होतं, हे आठवू लागलं. म्हाता-या सासूला बर वाटावं म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे केल्या होत्या. क्वचित प्रसंगी मनाला न पटणा-या गोष्टी शिष्टाचार म्हणूनही केल्या होत्या त्या व्यक्तीच्या दुख-या मनाला आधार मिळावा मानूनही केल्या होत्या हे सगळं आठवलं मग लक्षात आलं,. मनुष्य काही गोष्टी जनरेटयामुळे करतो, मनुष्याला अशा वेळी नेहमीच त्याविरुध्द दंड थोपटता येतातच असं नाही. जोवर त्या समाजाला घातक नसतात तोवर तिकडे कानाडोळा करणच श्रेयस्कर अस् वाटायला लागलं. एकप्रकारची क्षमाशीलता सहानुभूतीची अनुभूती मनात यायला लागली. देवाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न तरी यापेक्षा वेगळा काय असणार, नाही का?  आणि देवत्व म्हणजे तरी काय ? मनाची शुध्दता, आणि वृत्तीची निरागसता. हो ना?    

Friday, November 14, 2014

मल्हारबरोबर वाढताना

मल्हार तीन वर्षाचा होईपर्यंत माझं तसं बरं चाललं होतं. म्हणजे मी आजी आणि तो माझा नातू इतक स्पष्ट आमचं नातं होतं. मी त्याला काऊ चिउच्या गोष्टी सांगाव्यात भरवावं, जोजवावं. त्यानेही आपल्या बाळमुठीत माझं बोट पकडून मला त्र्यैलोक्याच साम्राज्य द्यावं. कसं मस्त चाललं होतं आमचं.पण मग तो वाढताना जाणवलं ते वेगळंच
 माझ्या पिढीच्या अनेक आज्याप्रमाणे  मीही ठरवलं होतं की जे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत डोळसपणे करू शकलो नाही ते नातवाच्या बाबतीत करायचं. म्हणजे आपल्या संसाराच्या धबडग्यात आपण मुलं वाढवतो असं आपल्याला वाटतं, पण ती खरं तर आपल्याला बघत आपणच वाढतात. तसं आजी झाल्यावर होत नाही. नातवंडाबरोबर घालवलेला क्षण न क्षण आनंददायी असतोच पण तो आपलीही वाढ करत असतो अस आता मला सतत वाटत असतं .
मल्हार लहान असताना मी सतत त्याच्याशी बोलत असायची. वेगवेगळी गाणी गुणगुणत असायची. तोही टकामका बघत ऐकायचा असं वाटायचं  पण त्यापेक्षाही त्या गाण्यांचे सूर,त्यांचा अर्थ त्याच्या आत आत कुठेतरी अधिक स्पष्ट रीतीने उमटतोय असं जाणवत रहायचं. दोन दिवसापूर्वीची गोष्ट. गाण  ऐकायचं असं मल्हार म्हणाला म्हणून एक कासेट लावली. तल्लीनतेने बसून त्याने पूर्ण ऐकली. परत दुस-या दिवशी " कालच्या आजीचं गाणं लाव म्हणून त्याने काढली ती कासेट किशोरी अमोणकरांची होती.
  जेव्हा मल्हार इतक्या लहान वयात मराठी भाषा समृ ध्दपणाने वापरतो तेव्हा खूप आनंद होतो.म्हणजे त्या दिवशी तो मावशीला तुझ्या घरी येतोय म्हणून सांगत होता. वर म्हणाला की" तूच फार दिवस भेटला नाहीस म्हणून भेटायला ये अशी गयावया करत होतीस ना म्हणून येतो." मध्ये तर सतत त्याला " कुहू" चावल्यासारखा कविताच करायचा. मराठी यमक जुळवून काहीतरी म्हणायचा आणि वर मला सांगायचा, " अरे, कविता झाली की रे."मल्हारच्या लेखी स्त्री पुरुष सगळेच " अरे " असतात.
 तो अगदी २ वर्षाचा असल्यापासून आम्ही दोघंही जवळच्या बागेत सकाळी जात असतो.तिथेही त्याला गवतावरचे दवबिंदू दाखव हिरव्या कोवळ्या गवताची , वाळलेल्या गवताशी रंगसंगती दाखव  रंगीबेरंगी फुलं , आकाशातले रंग , पक्षांची माळ दाखव  असे आमचे उद्योग  चालायचे.गम्मत म्हणजे  तो जेव्हा स्वानंदीबरोबर  कपड्याच्या दुकानात जातो तेव्हा आपले कपडे स्वत; पसंत करतो आणि ते खरच छान असतात. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट अशी की आमच्या बागेतल्या झोपाळ्यावर बसून तो ज्या एकतानतेने झोके घेतो ते बघत रहाण्यासारखं असतं .
आजी झाल्यावर मला असं वाटतं की मूल थोडं मोठं झालं की त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं जायला पाहिजे. मी आई असतानाही माझ्या मुलांवर ती लहान असताना कोणत्याच बाबतीत दडपशाही  केली असं मला स्वत:ला वाटत नाही. कारण तशी तर माझ्यावरही माझ्या आईवडिलांनी केली नाही. पण मला वाटतं तेव्हा नकळत का होईना माझा दृष्टीकोन पालकत्वाच्या superiorityचा होता. म्हणजे ह्यांना काय समजतंय , ह्यांना शहाणं करून जगात रहाण्यायोग्य करणं, त्यासाठी त्यांची सर्वतोपरीने "काळजी " घेणं हे आई म्हणून माझं परम कर्तव्य आहे असा एक भाव होता. त्यामुळे त्यांच्यापरतं मला ( आजही ) दुसरं जग प्रिय नसलं तरीही आजी झाल्यावर एक फरक झाला तो हा की त्या बालजीवाचं म्हणणं " चिमखडे चमकदार  बोल " या सदरात न  घेता त्यावरही विचार केला जावा.ह्याचं एक उदाहरण म्हणजे संध्याछाया पडल्यानंतर सकल जोडप्यांचा वेळ जाण्यासाठी उगीचच वाद घालणं हा एक आवडीचा उद्योग असतो.( गरजूंनी आजूबाजूला  चौकशी करावी).कारण होतं काय की इतकी वर्षं एकत्र काढल्यानंतर नवरा बायकोला आणि बायको नव-याला संपूर्ण कंगो-यानिशी ओळखत असते.त्यामुळे एकमेकांच्या बोलण्यातला between the lines अर्थ ते चांगलेच जाणून असतात. पण मल्हार ३ वर्षांचा असताना एकदा ( बहुधा तोः तोच प्रयोग परत परत पाहून वैतागून ) मला म्हणाला, " कुकुली तू आणि आबा सारखे का भांडता? " त्या क्षणी मला फार फार वाईट वाटलं आणि त्यापेक्षाही जाणवलं ते हे की अरे, हे बाळ  आता मोठं झालं की . त्यानंतरआम्ही वेळ घालवायचे अन्य मार्ग शोधले.हे सांगणे नलगे.हे आई असताना कदाचित वेगळं घडलं असतं . त्यामुळे माझ्यासमोर केवळ मल्हारच वाढत नाही मीही वाढतेय. आणि ते निश्चितच आनंददायी आहे.एका अटळ सत्याकडे जाण्याच्या वाटेवर अंगावरची एकेक पुटं गळून पडावी आणि आत आत काहीतरी कोमल उमलत जावं पाकळी पाकळीनं तसं वाटतंय .