Tuesday, August 4, 2020

भांडी

आपल्याला कधी काळी स्वयंपाकघरातल्या भांडयाबद्दल इतकं प्रेम वाटेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. खरं तर स्वयंपाकघरात मी काम करेन ,चांगले चुंगले पदार्थ करून खायला घालेन हे मला सशाच्या शिंगाइतकंचअसंभव वाटत होतं. ४६ वर्षांपूर्वी लग्नानंतर कोरी पाटी घेऊन मी गृहप्रवेश केला आणि केवळ आईचं नाव खराब होऊ नये म्हणून सासूबाईंच्या हाताखाली उमेदवारी सुरु केली.तीही एक डोळा कथा कादंबरीच्या पुस्तकावर डोळा ठेवून. आमची आई म्हणायची , पाण्यात पडलं की पोहता येतं, पण तोवर खूप पाणी नाका तोंडात जातं हेही खरं. पण त्याची गंमत परत कधी तरी. त्याचा परिणाम असा झाला की लोकांना चक्क आवडायला लागलं मी केलेलं. अर्थात एवढं घुसळल्यावर इतकं लोणी तर येणारच ना?
पण अजूनही मला स्वयंपाकघर हे आपलं कार्यक्षेत्र  वाटत नव्हतं. मुलं म्हणाली आई बेसनाचा लाडू हवा, लाडू तयार. नवरा म्हणाला मिसळ केली नाही बरेच दिवसात, घाला मटकी भिजत असा मामला होता सगळा. नाहीतर एकेक बायका बघावं तेव्हा आज काय बुंदी पाडल्या उद्या काय दहीवडे केले असे एकमेकाशी काहीही संबंध नसलेले पदार्थ करत असतात. करोत बापड्या.त्यामुळे स्वयंपाकघराशी काही माझी नाळ जुळली नव्हती. आमची भूमिका आपली मदतनिसाची.त्यामुळे भांडयाबद्दल  काय ममत्व असणार ? रुखवतातली सोडल्यास भांडी सासूबाई आजेसासुबाईची  होती. त्यामुळे काडी काडी जमवून संसार केला असंही नव्हतं.मग भांड याबद्दल जिव्हाळा कसा बरं वाटणार ?पुढे सून आल्यावरही तिला सांगितलंकी बाई यातलं काय मोडीत टाकायचं तर टाक आणि तुझ्या आवडीची भांडी घे. त्यामुळे आता तीन पिढयांची  भांडी घरात सुखनैव नांदता हेत..मधेच कुठेतरी मी घेतलेली ग्लास , मिसळणाचा  डबा  असे फुटकळ जिन्नस लुडबुडतात.
आपल्यात स्त्रीसुलभ भावनांची उणीव तरी आहे किंवा आपण अलिप्ततेने संसार केला या विचारांचा फुगा दोन दिवसांपूर्वी फुटला.म्हणजे काय झालं , मी सकाळी चहा करायला ओट्याकडे उभी राहिले आणि ओट्यावर पितळेचा एक चकचकीत चमचा दिसला.  बघितलं तर ते करंजीच्या कडा  कापायचं  कातण होतं . पाठीमागून आवाज आला ," आई आपल्याकडे होतं ना असं ? ते हरवलं तर आजी किती दिवस बेचैन होती. मी आणलं चोरबाजारातून.. "खरच असंच होतं ते कातण. फक्त चमचा जरा खोलगट होता. त्या कातान्यावरून हात फिरवताना डोळे जरा चुरचुरलेच माझे.
तशी सासूबाईंच्या वेलची काही दुधाची पातेली काही वेळण्या सांडशी आहेत घरात.दुधाच्या वेळण्या आमटीवर झाकलेल्या चालायच्या नाहीत त्यांना आणि सांडशी ही.त्यावेळी पोरवयात हे सव्यापसव्य करताना वैताग यायचा, पण आता ती भांडी हाताळताना त्या आठवणींचे कणच हातात येतात. आपल्या डोक्यावर किती सुंदर छत्र होतं त्याची  जाणीव होते.आमच्याकडे कोकणातली एक विळी पण आहे. आडाळो  म्हणतात त्याला कोकणीत. धारपण  कोकणी माणसासारखीच आहे.  नवी नवरी असताना खूप वेळा शाहिस्तेखान होण्याची पाळी आली होती माझ्यावर तिच्यामुळे. दोन वर्षांपूर्वी ती विळी  ठेवत असताना निसटली. फरशीवर ती आदळू नये म्हणून मी ती पकडली तर कुठे? पात्याला. आता आजेसासूबाईंनी " चुकीला माफी नाही " म्हणून असा हात कापला कि हाताला तीन टाके घालावे लागले. मला मात्र त्यांनी मारलेला तो फटकाच वाटला. " गे सुने दिसणा नाय कि काय तुका ? लक्ष खंय होता ? "
आता मला जाणवतंय कि या भांद्यांनी  माझा अलिप्तपणा हळू हळू मोडीत काढलाय. मला त्यांच्यात सामावून घेतलाय. किती आठवणी आहेत त्यांच्या !नेहमीपेक्षा  वेगळा  एक डाव प्रश्नचिन्हासारखा  आहे, तो आम्ही फक्त ताकालाच वापरतो. प्रत्येक भांद्याच एकेका पदार्थाशी नातं जुळलेलं आहे. ते मी आता नीटच समजून घेतलाय. आता मी भांदयाशी  बोलतेसुध्दा. म्हणजे धुतलेल्या ताटल्या गळायला तिरक्या करुन  ठेवताना पडायला लागल्या तर मी त्यांना दटावतेही, "पडू नका, काम वाढवू नका ग बायांनो." पालथ्या वाटयाची   उतरंड रचताना तर प्रत्येक वातीला सांगावं लागतं , " शाबास !"कधी कधी पातेली ठेवताना त्यावरचं नवर्याचं नाव आईंच दिसतं आणि तरुणपणी त्याच्याबरोबर घातलेला वाद आठवतो , " भांड्यावर  तुझं नाव का  आईंच का नाही ? " हसू येतं  मला. हळुवारपणे मी भांडी ठेवते.४६  वर्षांच्या सहवासाने त्यांचं अचेनत्व आता निमालेल असतं.       

No comments: