Monday, September 5, 2022

संवाद गणेशाशी

बा गजानना ,किती दूरवर आणलंस तू, 
की एक निरागस रिंगण पुरं करवलंस तू ? कदाचित दुसराच पर्याय खरा असावा बुद्धी मंता
पण मग एक  नकळती हुरहूर का बरं ? 
लहानपणी तुझ्या आगमनाचा अर्थ फक्त सुगंध असायचा ,
उदबत्तीचा , फुलांचा ,उदाचा ,कापराचा आणि
खमंग गूळचुनाचाही !
पण मग बदलत गेलं रे पुढे सगळं , 
या सगळ्यांना दडपणाच्या किनारी ने वेढलं
तुझ्या येण्याच्या आनंदावर तुझं" नीट " झालं" पाहिजे"नी मात केली बघ.
रागावला असतास कारे तू थोडं डावं उजवं झालं असतं तर ,दयाघना ?

"आनंदकंद मज घरी पाहुणा यापरते दूजे सुख ते काय
आंधळ्याच्या गाई देव राखी म्हणूनि करवूनि घेशी ही जाण होय !


आता परत ते सुगंध जाणवताहेत नाकाला
- लंबोदरा ,एकदंता तुझा चेहरा  अधिकच मिश्किल  असतो झालेला
मातेभोवती गोल फिरून पृथ्वीप्रदक्षिणेची पैज जिंकल्यावर झाला होता तसा !
होय रे बाप्पा तसाच खोडकर .
तुझं सांगणं झिरपत जातं माझ्यात
आणि वहात रहातं  डोळ्यातून !
मृणालिनी

No comments: