Sunday, April 29, 2007

काही क्षण ... दिवेआगरचे


पोरांचं आपलं बर असतं. आदल्या रात्री ठरवतात, चला, उद्या अलाण्या फ़लाण्या ठिकाणी जावून भटकून येऊ या. मग सकाळी उठून ब्रेकफ़ास्ट घेताना [ तोही सावकाश उठून ] घोषणा, "पटकन आटपा, आपल्याला अलाण्या फ़लाण्या ठिकाणी फ़िरायला जायचं आहे. दोन तासात निघू. जमलं तर हॉल्ट करू, नाही तर रात्री उशीरा परतू. " अरे पण मेल्या, पोळ्याची बाई, कामवाली येणार उशिरा, तिला निरोप द्यायला नको ? शिवाय बाबांची पूजा आणि देवाचं वाचायलाच तासभर लागेल. कसं आटपणार ? पण या असल्या चिल्लर प्रश्नांची उत्तरं त्याने आधीच तयार ठरवलेली असतात. आम्ही कितीही आरडाओरडा केला, तरी आमचं सामान आणि ब्लडप्रेशर सावरत तो स्टिअरिंग पकडून कुठल्या गाण्याची सी डी लावायची ते बायकोबरोबर ठरवत मिष्किल हसत बसलेला असतो.
या पार्श्वभूमीवर आमची दिवेआगरची ट्रिप अगदी वेगळीच होती.आज जावू या की उद्या जाणं सोईचं होईल हे ठरवण्यातच दोन महिने गेले. मग हाच दिवस प्रयाणाला योग्य आहे अशी आमची खात्री पटली आणि आम्ही निघालो.गाडी धावत होती आणि प्रथमच जाणीव झाली की काही तरी चुकतय. काय ते समजत नाही, पण कुछतरी गडबड छे.हां, गाण्याचा ठेका चुकतोय आणि मान पुढे मागे लचकत हलण्याऐवजी आडवी डोलतेय समेवर !म्हणजे " क्रेझी किया रे " ऐवजी चक्क भजनी ठेका.... इंद्रायणी काठी. असं होणं सहाजिकच होतं कारण गाडीतली चारी डोकी ज्येष्ठ नागरिक. मी , माझा चक्रधर नवरा, त्याची बहीण आणि तिचा नवरा. गाडी जसजशी गाव सोडून घाटाच्या दिशेने पळायला लागली, तसं गाडीतला डेकही बंद झाला आणि स्रुरू झाली रंगांची उधळण करणार्‍या निसर्गाची संगत आणि त्याच्याच संगीताची साथ.
ताम्हिणी घाटात गेल्यानंतर एका वळणावर खोल दरी आहे. चारी बाजूनी उतरत उतरत डोंगराचं पाणी मधल्या खळग्यात मुरून पाचू फ़ुलवत होतं. पावसाळ्यात खळाळणारे प्रवाह फ़ेनफ़ुलं उधळत असतीलही, पण जानेवारीत मात्र तो उतार जरा रक्तदाब वाढवणाराच वाटला. अर्थात कुणाच्या रक्तदाबाच्या, कुणाच्या मधुमेहाच्या गोळ्या घ्यायच्या असल्याने ब्रेकफ़ास्ट करणं गरजेचं होतं.अल्युमिनियम फ़ॉइलमध्ये गुंडाळलेली प्रत्येकाच्या वाटणीची सॅंडविचेस एका हातात आणि थर्मासमधल्या कॉफ़ीचा वाफ़ाळता मग दुसर्‍या हातात घेऊन प्रत्येकाने आपापल्या सोईची जागा पकडली आणि भोवतालच्या हिरवाईत जो तो गुंगून गेला, एक मूक संवाद साधत !पुढच्या प्रवासात कुठे रक्तवर्ण कुंकुमासारखा पलाश भेटत राहिला तर कुठे गुलाबीसर फ़ुलांच्या डहाळ्या लगटत राहिल्या. साथीला कधी कधी लता, कधी आशा तर कधी किशोर तर कधी तलत.
दिवेआगरच्या बापटांच्या अंगणात हातपाय धुवून खुर्चीत विसावतोय न विसावतोय तोच, " कवा आलासा ? काय च्या पानी घेनार का जेवनार एकदम ? " असं विचारायला आल्यागत जोरदार को कोच को ऐकू आल आणि त्याच्यामागून मान लगालगा करत मातीतले दाणे , किडे शोधत ३ -४ कोंबड्या आणि त्यांची पिलावळ. माहेरच्या गावाला घेऊन जाणारं ते कुटुंब बघून दिवेआगर मला एकदम आपलसच वाटल. मस्तपैकी शेणाने सारवलेली जमीन बघूनही खुर्चीवर बसणं हा करंटेपणाच होता. त्यामुळे आखडलेल्या पायांना जमिनीवर पसरून भिंतीला टेकून समोरच्या कोंबड्या आणि पिले बघण्यात दंग झाले. मान किती म्हणजे किती चटा चटा हलवावी त्या बायांनी की मलाच माझ्या स्पॉंडिलिसिसची आठवण व्हावी. कोंबडेबुवा मात्र कंपाऊंडच्या भिंतीवरून मान तोर्‍यात उडवत ' कुटुंबावर" नजर ठेवून होते. रस्त्यात माणूस नाही की काणूस नाही. निरव शाम्तता. बापटांच्याकडच्या जेवणाने तृप्त होवून बाकीची मंडळी वामकुक्षी घेत असताना मी माझी खुर्ची पोफ़ळीच्या झाडाखाली हलवली. झाडांखालची जमीन ओलसर होती. आदल्या दिवशी पाणी दिलेलं असावं बहुतेक .टपकन एक पोफ़ळ खाली पडलं. उचललं आणि दर्शनाने[ केअर टेकर बाईचं इतक सुंदर नाव मी प्रथमच ऐकलं.] ठेवलेल्या टोपलीत टाकलं.आणखी दोनचार झाडांच्या बुंध्यांशी लुडबुड केल्यावर आणखी काही पोफ़ळी सापडल्या. दर्शना, अग, गेली कुठे ही असं म्हणत पुढे चालले तर शेजारच्या घराच्या परसदारी दिसली. ' काय करतेस ग ' म्हटलं तर म्हणे, ' पोफ़ळी चिरून वाळायला टाकतो ' बघू तरी कशी चिरतात ते म्हणून बसले तर मुलाणेके मामू का कोंबडं कापायचा सुरा असतो तसं पातं असलेली विळी. आता मागे सरायचं नाही असं ठरवून हात घातला. ' आजी नको हां, हात कापात.' आजीने दोन तीन पोफ़ळं चिरली आणि माघार घेतली. बाकीच्या मुली खसा खसा चिरत होत्या. अशी सालं काढलेली पोफ़ळं २ -३ महिनी ऊन खात पडतील तेव्हा कुठे त्यांची खडखडीत सुपारी होते, आणि सुपारीला भावही चांगला, ३५० रु. किलो.
संध्याकाळी दिवेआगरच्या समुद्रकिनार्‍यावर जाताना वाटेतच एका देवळाचं बांधकाम चालू होतं. राजस्थानी धाटणीचं लाल दगडाचं देऊळ सुम्दर होतं, पण मला मात्र आणखी ५ वर्षांनंतरची तिथली बजबजपुरी डोळ्यापुढे आली आणि मन खट्टू झालं. नितान्त सुंदर निसर्गाचा , अशी धार्मिक ' दुकानं ' थाटून माणूस का विध्वंस करतो ? समुद्राच्या उधाणलेल्या लाटात, एका लयीत वाजणार्‍या गाजेत , दूरवर पसरलेल्या अथाम्ग जलाशयात , रंगांची उधळण करत त्याच पाण्यात मिसळून जाणार्‍या सूर्यबिंबात असणार्‍या दिव्यत्वाचा स्पर्श माणसाला का पुरेसा होत नाही ? अशा विचारांनी मन खट्टू झालं

समुद्रकिनार्‍यावर गेल्यानंतर त्या अथांग सागराला बघताना किती रुपं आठवावी त्याची. लहानपणी शिरोड्याला , आजोळी गेलं की त्याच्या वाळूत पाय खुपसून चालताना किती वाळू उडवत होतो. सगळ्यांच्या हातात हात गुंफ़ून लाटेबरोबर पायाखालची वाळू सरकताना जोराने किंचाळायची चढाओढच लागायची. वाळू भरलेले ओले कपडे घालून मागच्या दारी विहिरीवर जावून आंघोळ केल्याशिवाय आजी घरात पाऊल टाकू द्यायची नाही.किती आठवणी घेऊन त्याच्याशी संवाद करत फ़ेर्‍या मारल्या , मात्र यावेळी पाय मात्र कोरडेच राहिले.
अंधार पडताच रस्त्यावरचे मिणमिणते दिवे थेट बालपणातच घेऊन गेले. अशा दिव्यातच आम्ही वाढलो होतो. उजेडापेक्षा अंधार गडद करणारे दिवे आणि रस्त्यावर आखलेल्या लोकांच्या घरातल्या उजेडाच्या चौकोनांनी आम्हा सगळ्यांना लहानच करून टाकलं. कदाचित संध्याकाळी " सुवर्ण गणपती "च्या मंदिरात म्हटलेल्या आरतीचा आणि अगदी हात जोडून आणि पहिलीतल्या पोरांसारखे डोळे मिटून " मना सज्जाना भक्तीपंथेचि जावे " म्हटलेल्याचाही परिणाम असावा तो.
पण दिवेआगरने खोलवर दडलेली सुरावट छेडली खरी !
समुद्र हा माझा आतल्या गाभ्यातला सखा आहे. तो मला अशी खट्टू होवून जाऊ देणार होता थोडाच ?आदल्या दिवसाची कसर दुसर्‍या दिवशी भरून निघाली. दिवेआगर ते श्रीवर्धन हा सकाळी केलेला प्रवास आणि दिवेआगर ते दिघी हा संध्याकळी केलेला प्रवास म्हणजे केवळ अविस्मरणीय ! रुसलेल्या छोट्या बहिणीला मोठ्या भावाने वेगवेगळ्या भेटी देवून मनवावं तसा वा्टला तो समुद्र मला ! गाडी एखाद्या वळणावर वळली की खाली खोलवर तो असा काही चमचमत उसळत असायचा की त्या त्याच्या नर्तनाच्या खोडकर लाटा आपल्याही हृदयातून उसळाव्यात. झाडीतून त्याचं मंद सम्गीत खुलवत रहायचं. म्हणायचं, बघ, माझ्यापासून दूर तू जाऊच कशी शकतेस ? मी आहे इथेच. चल , शोध मला. आणि आपणही नटखट मुरलीधराला शोधणार्‍या गोपींच्या आतुरतेने त्याला शोधत रहावं तर अचानक त्याचा अथांग जलाशय बाहू पसरून खुणावत रहायचा. एके ठिकाणी कधी न पाहिलेल्या पांढर्‍याशुभ्र रंगात समुद्र डोलताना दिसला आणि जवळ गेल्यावर लक्षात आलं की शेकडो बगळे भक्ष्याच्या प्रतिक्षेत ' बकध्यान ' लावून पाण्यात लाटेवर झुलताहेत.
संध्याकाळचा दिवेआगर ते दिघी हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देवून गेला. विशेषत: नानवलीहून दूरवर समुद्रात वसलेला जंजिरा पाहताना कोणत्याही क्षणी किल्ल्यात हालचाली सुरु होतील असं वाटावं इतका तो जिवंत वाटत होता.
या सगळ्या क्षणांनी जो जिवंतपणा रसरसून आतपर्यंत झिरपत गेला तो खूप दिवस तसाच रहाणार होता हे नक्की !

draft

6 comments:

Parag said...

Khup chan lihilay varnan.. :)
Diveagar cha baptancha ghar ani vadi khup sunder ahe.. ekunach gav far chan ahe... Amhi 3/4 varshanpurvi kelelya trip cha athvani jagya zalya.. Ajun lihit raha. Pudhil likhanasathi shubhechaa. !

prabhavati said...

पण दिवेआगरने खोलवर दडलेली सुरावट छेडली खरी !

Chhanach jamalay lekh. Ashich chhan chhan lihit raha, vaachun masta fresh vaTata !

Abhijit Bathe said...

bahutek tumache sundar lekh aaNi maazee teech tee pratikriyaa yaawar meech chiDaayalaa laagaloy!

lihit rahaa - mee 'too good', 'chhaan', 'kyaa baat hai' yaapekshaa saras pratikriyaa shodhat rahaato! :)

Padmashree said...

aajach Diveaagar la jayachaa vichar karat hoto ani achanak he vaachal.. aata jaayachaa vichar anakhi baLavalaa.. chhan lihil aahe

Shubhada said...

mami meech diveaagarla jaun aale asa vatat aahe

Unknown said...

samudra khupch malapan awadato pan ase lihine shakyach nahi. khupch chhan
charu