Wednesday, April 4, 2007

गोष्टी आठवणीतल्या

काही काही लोकांना आपल्या खूप लहानपणीची आठवण असते.अगदी दीड दोन वर्षापासूनची. पण मला मात्र वयाची पहिली ५ वर्षं आठवत नाहीत.आठवते ती खासबागेतली माझी पहिली शाळा. राधाकृष्णाच्या देवळाजवळची.घराच्या अगदी जवळ. खर तर सगळ्यात जवळची म्हणजे प्रायव्हेट हायस्कूल. कारण या शाळेच्या मागच्या गल्लीत अगदी शेवटी आमचं घर होतं. पण ती मुलांची शाळा असल्यामुळे तिचा उपयोग नव्हता. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल तशी लांब(?) होती ५ वर्षाच्या मुलीच्या मानाने. म्हणजे आमची पूर्ण गल्ली पार करून उजवीकडे वळलं की प्रायव्हेट हायस्कूल. तिथून पुढे गेलं की डाव्या हाताला पॅलेस थिएटर. त्याला डावीकडे ठेवून वळलं की कुस्त्यांचं मैदान. या मैदानावरून डावीकडून मंगळवार पेठेतून येणारा आडवा रस्ता देवल क्लबकडे जात होता.या रस्त्यावर रहदारी असायची. आता कोल्हापूरसारख्या शहरात ५०-५५ वर्षापूर्वी रहदारी ती काय असणार ? एखादा टांगा, काही सायकली, किंवा क्वचित एखादी मोटार.पण हा "रहदारीचा" रस्ता ओलांडून आपली बाळी शाळेत कशी जाणार ही काळजी माझ्या आईपेक्षा माझ्या वडलांना अधिक वाटत असल्याने त्यांनी माझं नाव जवळच्याच " अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल" मध्ये इयत्ता पहिलीत घातलं. या शाळेच्या बाहेर एक उंबराचं भलं मोठं झाड. दुपारच्या वेळेला टांगा, बैलगाड्या सोडून गाडीवान झाडाखाली शिदोरी सोडत. झाडालगत देऊळ, देवळाच्या मागे लागूनच 'अहिल्यादेवीचं ' पटांगण होतं . पटांगण ओलांडून गेलं की शाळेच्या उम्च दगडी पायर्‍या लागत. त्या चढून गेलं की शाळेचा व्हरांडा. समोर काही वर्ग, डाव्या बाजूला जिना. जिन्याच्या सुरवातीला शाळेची पितळी घंटा. वरही काही वर्ग होते. या शाळेत मी एकच वर्ष होते, त्यामुळे या शाळेच्या आठवणी फ़ारशा नाहीत. मात्र एक सर आठवतात, उंच धिप्पाड. नेहमी झब्बा पाय़जमा या वेषात असत. तेच पी. टी. घेत आणि संगीतही. या दोन विषयांची सांगड ते कशी काय घालत होते असं मला आज वाटतं. तेव्हा मात्र त्यांना बघितल की जाम भीती वाटायची. भला मोठ राक्षस आपल्याला मटकावायला आलाय की काय असं वाटायचं. आणखी भीतीदायक व्यक्ती होत्या ,त्या म्हणजे शाळेच्या मधल्या सुट्टीत पोत्यात चणे कुरमुरे विकणारा गंगाराम आणि आमसोलं विकणारा एक गोरा भुरका म्हातारा. गंगारामची चुरमुर्‍याची भट्टी होती मंगळवार पेठेत. काळ्यारोम गंगारामचा खालचा ओठ भलताच जाड होता आणि लोंबतही असे. त्यामुळे तो कितीही मवाळपणे बोलला तरीही हा आपल्याला मारणार असंच वाटायच मग जरा मोठी झाल्यावर लक्षात आल की गंगाराम अतिशय प्रेमळ आणि माणसांचा भुकेला आहे. दुसरा तो सुकामली विकणारा म्हातारा. फ़णसपोळी, आंब्याची साटं, असा कोकणचा मेवा पोत्यात घालून बिचारा विकत फ़िरायचा.तर तो त्याच पोत्यात मुलींना घालून पळवून नेतो आणि " काय तर करून लांब तिकडं विकून टाकतो म्हणे, पाआआप !" असं मोठ्या मुलींकडून [इयत्ता ४थी] ऐकायला मिळत असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू आला की माझी पाचावर धारण बसत असे. याच मुली त्याच्याचकडून काहीबाही विकत घ्यायच्या तेव्हा तर त्या मला उच्च कोटीच्या वीरांगनाच वाटायच्या. आईला या माणसाबद्दलची माझी भीती सांगितल्यानम्तर तिनेही फ़ारसं लक्ष दिल नाही, ते बहुधा याच विचाराने असावं की या भीतीने तरी आपली मुलगी शाळा सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर पडायची नाही.त्यामुळे शनिवारच्या सकाळच्या शाळेच्या वेळेत सगळ्या मुली कोवळ्या उन्हात उंबरं गोळा करत असत तरीही आम्ही मात्र लक्ष्मण रेषेच्या आतच !
पण पहिली होता होता आईच्या लक्षात आलं की या शाळेत राहून आपल्या मुलीचा शैक्षणिक आलेख फ़ारसा उंचवण्याची शक्यता दिसत नाही, तेव्हा तिने मला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये घालण्याविषयी वडिलांचं मन वळवलं. माझ्या आजूबाजूला राहणार्‍या बहुतेक सगळ्या मुली याच शाळेत जात असल्यामुळे त्या आपल्या मुलीला नीट शाळेत नेतील आणि आणतील असा भरवसाही तिला वाटला असावाआणि दुसरीपासून मला महाराणी लक्ष्मीबाई च्या प्राथ्मिक [ ज्याचा उच्चार मी किती तरी दिवस प्रार्थमिक असा करत होते आणि त्याचा संबंध प्रार्थनेशी जोडत होते] शाळेत दाखल झाले . माझं " पालकत्व " शेजारी राहणार्‍या निडसोशीकरींच्या मीना , बेबी या मुलींनी आणि मागच्या गल्लीतल्या सरिताने आनंदाने पत्करलं नंतर नंतर तर मी सरिताचं ' शेपूट ' म्हणून तिच्या मैत्रिणीत ओळखली जावू लागले.
कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे इथल्या शाळांची नावम राजघराण्यातल्या स्त्री- पुरुषांच्या नावावरून ठेवली गेलेली होती. १९५० च्या सुमाराला कोल्हापुरात अहिल्यादेवी, महाराणी लक्ष्मीबाई, पद्माराजे, जिजामाता, ताराराणी अशा मुलींच्या आणि प्रायव्हेट , विद्यापीठ, राजाराम, आयर्विन अशा मुलांच्या नावाजलेल्या शाला होत्या. म. ल. ग. हायस्कूलाअमच्या घरापासून फ़ार तर अर्ध्या फ़र्लांगावर होती. शाला राजवाड्याच्या परिसरातच असल्यामुळे शाळेभोवती उंचच उंच भिम्त भांधलेली होती. बाम्धकामही राजवाड्याच्या धाटणीचं होतं कदाचित तो पूर्वी राजवाड्याचाच भाग असावा. शाळेचं मागचं फ़ाटक आणि राजाराम कोलेजचं मागचं फ़ाटक एकच होतं. त्या फ़ाटकाजवळ प्राथमिक शाळा होती. २री ते ४थी या काळात त्या फ़ाटकाकडे पडणारी बुचाची फ़ुलं वेचण्यासाठी आमच्यात अहमहमिका लागायची,पण पुढे हायस्कूलमध्ये गेल्यावर त्या फ़ाटकाकडे जाणं म्हणजे " अव्वा, तिथ जाऊन राजारामची पोरं बघायची असणार" असा शिक्का आपल्यावर पडेल ही धास्ती असल्याने ते " निषिध्द क्षेत्र " मानलं जाऊ लागलं. तशीही आमची ' मास पी. टी. ' पहाण्यासाठी ' राजाराम' ची काही टवाळ पोरं तिथे उभी असायची, त्यामुळे मोठ्या मुलीम्च्या मनात त्या फ़ाटकाबद्दल थोडी हुरहुरयुक्त उत्सुकता असायची.काही धीट मुली आमच्या शाळेच्या खडूस प्यून ' बक्षू' ची नजर चुकवून तिथे एक फ़ेरी मारून येत, पन्ण अशा मुली बाकीच्या पापभिरू मुलींच्या ब्लेकलिस्टवर असत. पण ती नंतरची गोष्ट. आधी म. ल. ग. हायस्कूलच्या प्राथमिक शाळेविषयी.

5 comments:

Asawari said...

chaan vatala vachun :)

will wait for the next part. reminds me of the things we did in schools, the places and actions we tabooed, etc. and realised that even after a generation having passed between us, we lived through the same experiences at school!!! thats kolhapur for us i guess

Gayatri said...

:) 'प्रार्थमिक शाळा' - हा कोल्हापुरातला सामुदायिक गैरसमज होता की काय? मी पद्माराजेची! तुझे शाळेचे अनुभव वाचताना इतकं छान वाटलं - आणि "ब्लॅकलिस्टेड पोरी" आमच्यातपण होत्याच की बई! खास कोल्हापुरी शाळकरी उद्गार आणि वाक्यं वाचायला धमाल येत्येय. पुढच्या भागाची वाट पाहीन!

Radhika said...

ध्न्यवाद, आसावरी, गायत्री. या आठवणींचा उद्देश परत जुन्या जागी जाऊन यायचं आणि ताजंतवानं व्हायचं, हाच असतो नाही !

simple.com said...

मला तुमची style यासाठी आवडते की एकाच वेळी तुम्ही खूप involved आणि detached असे दोन्ही असता भूतकाळाचे वर्णन करताना..

prabhavati said...

Radhikachi bhasha oghavati ahe tyamule ticha likhan vachayla far chhan vatata.pudhalya bhagachi vat pahate.
Aani,Gayatri, ' prarthamik' ha Kolhapurchacha varasahakka navhe. aamhi mumbaitahi tech mhanat asu ! Kiti maja nahi ?
Balapanachi safar ekandaritach rochak. Thanks, Radhika, vishyachya nivadibaddhal !