Wednesday, April 18, 2007

कॉलेज

१९६५ च्या जून महिन्यात ११वीच्या परिक्षेचा निकाल लागला, आणि कॉलेजात जाण्याची तयारी सुरु झाली. त्या काळी कॉलेजच्या निवडीत कोल्हापुरात दोनच कॉलेजेसना प्राधान्य असायचं. राजाराम आणि गोखले. राजाराम आमच्या शाळेला लागून असल्यामुळे त्या वास्तूबद्दल प्रचंड आपुलकी आणि कुतुहल होतं. डिग्री मिळवायची आणि लग्न करून संसाराला लागायचं हेच इतर बहुसंख्य , म्हणजे जवळ जवळ सगळ्याच , मुलींप्रमाणे माझंही ध्येय असल्यामुळे कॉलेजात जावून काही भव्य दिव्य करायचय असंही ठरवलं नव्हतं.शाळेच्या आखीव रेखीव चाकोरीतून सुटून एक स्वच्छंद फ़ुलपाखरी जग बघायचं हाच कॉलेजात जाण्याचा मुख्य हेतू असायचा.अभ्यास ही तदनुषंगाने येणारी अपरिहार्य गोषट असल्याने कोणीच त्याचा बाऊ करत नसे. त्यामुळे कॉलेज लाइफ़ एन्जॉय करण्यासाठी आर्टसला जाणं हा उत्तम पर्याय होता. त्यासाठी लागणा‍र्‍या चार वह्या, पेन ,सगळ्याच साड्यांवर मॅचिंग होईल अशी काळ्या रंगाची पर्स, वेगवेगळ्या आकाराची कानातली, लांबलचक माळा, ५, ६ लेटेस्ट फ़ॅशनच्या साड्या यांची खरेदी मी मे महिन्यातच उरकलेली होती.शिवाय वह्या छातीशी धरून एक वेणी पुढे घेऊन चालायची प्रॅक्टीसही बर्‍यापैकी झालेली होती.११ वीला प्रथम श्रेणी आणि राष्ट्रीय पातळीवर शहराचं प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळे गोखले आणि राजाराम या दोन्ही कॉलेजात सन्मानपूर्वक प्रवेश मिळत होता. मी राजारामचा पर्याय निवडला.
त्यावेळी राजाराम कॉलेज गावातल्या भवानीमातेच्या मंदिराच्या परिसरात, ज्याला भवानी मंडप असं ओळखलं जातं, भरत असे. कॉलेजची मूळ इमारत ही राजवाड्याचाच एक भाग असल्याने त्या बांधकामाचा प्रभाव कॉलेजच्या इमारतींवर होता. ती काळ्या दगडाची इमारत उन्हाळ्यातही थंडगार वाटायची.कॉलेजचं पोर्च हा मुलांसाठी ' आरक्षित ' भाग असल्याने आणि तिथे आजी सदस्यांबरोबर आजीव सदस्यांचेही वास्तव्य असल्याने तो भाग मुलींसाठी 'निषिध्द क्षेत्र ' होतं. कॉलेजच्या दारातून आत शिरलं की, मुलींच्या माना ज्या खाली जात, त्या वर्गात शिरलं कीच वर होतं.पहिल्या वर्षी मुली पोर्च समोरून जाताना ' आता कोणत्याही क्षणी मुलांचा घाला होईल ' या भीतीने वाघ मागे लागलेल्या मेंढरासारख्या थरथरत, पळत सुटत . एखाद्या मुलाने शीळ घातली तर किंवा बाण मारला तर ? या भीतीने त्यांची गाळण उडत असे. बहुसंख्य मुली केवळ मुलींसाठी असलेल्या शाळेतून आलेल्या असल्याने दबावाखाली असत आणि मुलंही सहशिक्षणाला सरावलेली नसल्याने दबाव झुगारायला उत्सुक असत. मुलामुलींनी एकत्र उभं राहून गप्पा मारणं ही फ़ारच दूरची गोष्ट होती.त्यामुळे वेगवेगळे 'सजातीय ' घोळके करून 'विजातीय ' धृवावर लक्ष ठेवणं एवढाच 'रोमॅंटिसिझम ' मुलं करू शकत होती. काही फ़ारच धीट मुलं, मुली निघाल्या की छातीवर हात ठेवून छातीत कळ आल्यासारखा चेहरा करून आपल्या दिलाचे हजार तुकडे झाल्याचं सुचवत असत आणि मुलीही मुमताज , साधना, शर्मिला, जया जेवढ्या लाजू शकतील तितपत लाजून त्याला दाद देत असत. अशाही परिस्थितीत नोटस मागण्याच्या बहाण्याने प्रेमप्रकरणं फ़ुलत असत, पण फ़ारच थोड्याम्ची परिणती लग्नात होत असे. कारण विवाह जरी स्वर्गात ठरव्ला जात असला तरी, त्याचे सर्वाधिकार आकाशातल्या बापाने आपल्या पृथ्वीवरच्या बापाला दिलेले आहेत मुलींच्या मनात चांगलंच ठसलेलं किंवा ठसवलेलं असे. त्यामुळे कॉलेजच्या दुसर्‍या वर्षापासून एक एक पान गळावया लागून शेवटच्या वर्षी बहुसंख्य पानं गळायच्या बेताला आलेली असत. परिक्षेच्या मांडवातून लग्नाच्या मांडवात हाच त्या काळच्या वडिलधार्‍यांचा नारा असे
.कॉलेजच्या मुख्य इमारतीच्या गेलं की दोन्ही कोपर्‍यातल्या मेघडंबर्‍यातून रंकाळा तलावापर्यंतचा भाग दिसत असे. खाली पाहिलं तर भवानी मंडपाचा भाग , के. एम. टी. च्या बसेसच्या थांब्याचा भाग सोडल्यास मोकळाच दिसत असे. त्यामुळे एक खानदानीपणा त्या भागाला होता. आमच्या कॉलेजला लागूनच त्या भागात येण्यासाठी एक दगडी कमान होती. त्याच्या दोन्ही बाजूला हत्ती झुलताना मी पाहिलेले आहेत. कमानीच्या वर सनई चौघडावाले बसलेले असत. महाराजांची मोटार लांबवरून येताना दिसली की ते वाजवायला सुरवात करत. अंबाबाईचं देऊळही जवळ असल्याने दुपारी आरतीच्या वेळी घाटी दरवाज्यावरची घंटा वाजू लागे. या सगळ्यामुळे आपण एका पावन ऐतिहासिक परिसरात वावरत आहोत ही भावना मनाला सुखवत असे. ऑफ़ पिरियडला भवानीमातेच्या मंदिराच्या गारव्याला गप्पा मारत बसणं किंवा अंबाबाईच्या देवळात दर्शन घेऊन तिथल्या दुकानात बांगड्या पर्सेस , कानातली, गळ्यातली, वेगवेगळ्या रंगांच्या गंधाच्या, कुंकवाच्या बाटल्या खरेदी करणंहा मुलींचा स्त्रीसुलभ टाइमपास असे, तर काही अंतर ठेवून ' जेथे जाशी तेथे मी तुझा सांगाती ' असं [मनातल्या मनात ] म्हणत मुलाम्चे घोळकेही मुलींच्या मागून फ़िरत असत.आजच्या तरुण पिढीला हे सगळं हास्यास्पद वाटत असेल, पण यामागचं कारण त्यावेळचं सामाजिक बंधन असे. मुलामुलींनी एकत्र गप्पा मारत उभं रहाणं जिथे शिष्टसंमत नव्हतं तिथे मैत्री ही फ़ारच दूरची गोष्ट. त्यामुळे मुलींची भूमिका बहुधा बावरलेल्या हरिणीची असे, व मुलगे आपल्या 'टेरिटरी'तल्या मुलींच्या रक्षणकर्त्याच्या थाटात वावरायचे. पोषाख आचरण याबाबतीत अधिकांश मुलं मुली दबावाखाली असत. पण तारुण्यसुलभ बंडखोरीमुळे त्यातून पळवाटही काढत. म्हणजे मुलगी ११ वीत गेली की ती साडीत शिरे. काही काही घरात तर ८वीपासूनच मुली साडी नेसू लागत. काही किंचित फ़ॅशनेबल मुली कॉलेजात आल्यानंतरही स्कर्ट ब्लाऊज घालत,आणि घरून निघताना गुडघ्याच्या खाली असलेला स्कर्ट लेडिजरूम मध्ये आलं की नेफ़्याकडे दुमडून लांडा करून हेलनसारख्या चालत वर्गात जात. साडीवाल्या मुलीम्ची गत आणखी न्यारी, न्यारी !घरून निघताना बिचार्‍या साधीसुधी साडी नेसून पदर दोन्ही खाम्द्यावर पांघरून निघत आणि लेडिजरूमच्या आरशासमोर आल्या की तोच पदर लाम्ब करून कमरेभोवती गच्च दोन फ़ेरे देऊन डाव्या हातावर पंख्यासारखा झुलवत तासाला निघत.आम्ही ११वीत असताना 'गीत गाया पत्थरोंने ' नावाच्या सिनेमात राजश्री नावाच्या नटीने कटिवस्त्र नाभीखाली खेचून शिवाय नाभीत चमकता खडा घातला होता. त्यामुळे अगदी खडा जरी नाही तरी बर्‍याच कॉलेजकन्यकांनी हे नाभीदर्शन उचलून धरलेलं होतं.अशा या मुली पदर फ़डकवत निघाल्या की पोर्चमधून " चुनरी संभाल गोरी, उडी चली जाय रे, मार ना दे डंख कोई नजर कोई हाय ! " असा कोरस उमटला नाही तरच नवल.ही सगळी छेडखानी, रुपेरी पडद्यावरची भ्रष्ट नक्कल, जिच्यावरून चाले ती आरामात असे, आणि पाहणार्‍याला घाम फ़ुटे.पुढे मग आम्ही कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेल्यानंतर जया भादुरी नावाची एक साधीशी मुलगी रुपेरी पडद्यावर अवतरली आणि सगळ्या आयांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण मुलींनी पदराचे पंखे मिटले,पदर दोन्ही खांद्यावरून पांघरून आले. केसाम्चा सैलसर शेपटा पाठीवर झुलू लागला. कपाळावरचा साधना कट जावून केसांचे भले मोठे आकडे कानामागे झुलू लागले .कपाळावर गंधाची टिकली, कानात साध्याशा रिंग्ज, सुती काठा पदराच्या कलकत्ता साड्या अशा वेषात मुली कॉलेजला जावू लागल्याने आया धन्य धन्य झाल्या.मुलांना बिचार्‍यांना फ़ारसे काही पर्यायच नव्हते.त्यातल्या त्यात राजेश खन्नाने आपलं वाढतं पोट झाकण्यासाठी सुरु केलेला ' गुरु शर्ट ' हीच त्यांची फ़ॅशनची कमाल पातळी होती. कदाचित त्यामुळेच की काय आजचे ६०- ६५ चे आजोबा टी शर्ट मध्ये दिसतात.
१९६७ च्या सुमाराला राजाराम कॉलेज भवानी मंडपातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरानजिकच्या स्वत:च्या जागेत गेलं, पण उघड्या बोडक्या माळावरची ती वास्तू आम्हाला कधी आपलीशी वाटलीच नाही.अजूनही आमचं कॉलेज म्हटलं की गावातलं कॉलेजच डोळ्यापुढे येतं.कॉलेजच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला निबंध भित्तीपत्रकात पाहताना वाटलेला अभिमान आनंद संकोच मी इथेच अनुभवला. कॉलेजच्या निवडणुकीत लेडिज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी माझ्यापेक्षा मोठ्या ३, ३ मुलींना हरवल्यानंतर विजयाचा जल्लोष आम्ही मैत्रिणींनी इथेच केला.आंतर विद्यापीठ खोखो स्पर्धेसाठी आम्हा नऊजणींपैकी सातजणी निवडल्या गेल्यानंतर ताठ मानेने याच कॉलेजच्या फ़ाटकातून प्रवेश केला.कॉलेज मॅगेझिनमधल्या माझ्या लेखाला वर्णनात्मक ललित लेखन या विभागात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पोर्चमधून झालेला टाळ्यांचा कडकडाट इथेच मी अंगावरचे रोमांच लपवत ऐकला.खो खो च्या अंतिम सामन्यात कमरेच्या हाडाला मार बसून रक्तबंबाळ झाले असतानाही सर्वाधिक गडी खांबावर टिपण्याचा मान मिळवला तोही भवानी मंडपातल्या कॉलेजमध्ये असतानाच.या कॉलेजने माझं व्यक्तिमत्व फ़ुलवलं.वरवर आक्रमक भासणारं पण अंतर्यामी हळुवार असं मन दिलं. नाव कमवायची संधी दिली.
ते दिवसच तसे होते, " झोपाळ्यावाचूनि झुलायचे ! "

5 comments:

Nandan said...

wa, lekh aavadala.
आता कोणत्याही क्षणी मुलांचा घाला होईल ' या भीतीने वाघ मागे लागलेल्या मेंढरासारख्या थरथरत, पळत सुटत - :)

Abhijit Bathe said...

वा! छान!!
माझे आई बाबा त्यांच्या शाळा कॉलेजचे अनुभव सांगायचे त्याची आठवण झाली.
तुमची - कोल्हापुर डोळ्यासमोर उभं करण्याची हातोटी विलक्षण आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण माझा अनुभव असा कि तुमच्यानंतर तीस वर्षांनी मी कॉलेजात गेलो तेव्हाही ती सगळी सामाजिक बंधनं वगैरे टिकुन होती. तुम्हाला कदाचित ३० वर्ष म्हणजे जनरेशन गॅप वाटेल, पण मी जेव्हा माझ्या मावस-मामे भावा बहिणींना पहातो तेहा मलाच १० वर्षात नविन जनरेशन आल्यासारखं वाटतंय - कदाचित अजुन ५ एक वर्षांत त्यांनाही तसच वाटेल!

छान लिहिताय - लिहित रहा.

कोहम said...

chaan lekha aahe.....junya kali college life kasa asel hyachi kalpana aali....maja pan vatali....pan abhijeet mhanato tyapramane amachya veli paristhiti kahi far vegali navati....may be marathi mula mulinsathi...

अनु said...

Sundar varnan. Tumachi smaran shakti changali ahe. Ani fashions chi varnane pan khup changali ahet. Ajun liha na ya college life var.

prabhavati said...

Radhika, chhan ' tya ' kaalat nelas ! Aamhi college la jai paryant Punjabi dress aani bell bottom aala. Shivaay, hikes nataka vagairechi paravangi mile. Pan ekandar te mula mulini bolana mhanaje ' shantam paapam ' athavatay. Chhan vatala tya kaalat jaun ! Thanks for the kaala - pravaas !