Wednesday, April 11, 2007

हायस्कूल

प्राथमिक शाळेत असताना हायस्कूलच्या मुली युनिफ़ोर्ममध्ये फ़िरताना पाहून ' देवा, मी मोठी कधी होणार' असा ध्यास लागलेला असायचा. त्यामुळे ५वीत गेल्यानंतर भला थोरला वर्ग बघून आकाश ठेंगणं झालं. बसायला बाक, एका बाकावर दोनच मुली, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक. त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत आणि ३री, ४थीच्या मुली ' चिल्ली पिल्ली ' आहेत ही भावना प्रबळ झाली.त्याकाळी बहुतेक शाळांचा गणवेष म्हणजे निळा स्कर्ट आणि पांढरा कोलरवाला ब्लाऊज असा असे. फ़क्त रिबिनीचा रंग वेगवेगळा असे. दोन वेण्या व्यवस्थित तेल लावून घट्ट करकचून घातलेल्या, आणि त्याही अर्ध्या दुमडून वर बांधलेल्या., रिबिनीची फ़ुलं एकसारखी दिसतील अशा ! तेव्हा नायलोन हा प्रकार नवीनच बाजारात आला होता. त्याच्या तीन बोटं रुंदीच्या रिबन्स दोन वार लागत. कापलेल्या रिबिनीची टोकं उसवू नयेत म्हणून ती धावदोरा, हेम घालून शिवावी लागत. आता पिवळ्या रंगाची रिबन आणि पांढरा धावदोरा ही रंगसंगती वरच्या वर्गातल्या काही ' कलाकार ' मुलींना पटत नसे. आणि गरज ही शोधाची जननी असल्यामुळे त्यांना असं आढळून आलं की पेट्त्या उदबत्तीचं टोक रिबिनीच्या कडेवरून अलगद फ़िरवलं की तिथले धागे जळतात आणि उसवत नाहीत.मग काय , उचल उदबत्ती, की जाळ रिबिनीचं टोक असा प्रकार सुरु झाला. शिवाय काही मुलींनी उदबत्तीच्या टोकाने फ़ुलाच्या पाकळीसारखी चार भोकं पाडून कलाकुसरही केली होती. आता होती काय गोची, गणवेष तपासायचं काम पी. टी. च्या कुलकर्णीबाईंकडे [ प्राथमिकच्या नव्हे ] होतं. त्यांची एक पध्दत होती. मुलींना मारण्याच्या अगदी विरुध्द होत्या त्या. ' चुकलेल्या' मुलीच्या शेजारी येऊन त्या उभ्या रहायच्या. प्रेमळ आवाजात चूक कबूल आहे का ते विचारायच्या आणि मुलीने थरथरत 'कुबूल' म्हटलं की त्याच क्षणी तिच्या कानाची पाळी आपल्या बोटांच्या चिमटीत धरून अशी काही दाबायच्या की ती मुलगी पुढचे चार दिवस हातात कानाची पाळी धरूनच फ़िरली पाहिजे. मला वाटतं ' चुकलं, चुकलं " म्हणून कानाच्या पाळीला हात लावतात ना, ती पध्दत प्रथम सुरु करणारी व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी असली पाहिजे. ... तर या रिबन प्रकरणी बाई अशा खवळल्या की , ना सुनवाई, ना तारीख , एकदम फ़ैसला ! दिसलं टोक जाळलेलं की सरळ कानाचा टोकालाच हात. दुस‍याच दिवशी सगळ्या क्रांतीकारी मुलींच्या रिबिनीची टोकं परत धावदोर्‍यात.त्या काळी साधारणपणे परित्यक्ता, विधवा स्त्रियांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जे पर्याय उपलब्ध होते त्यातला शिक्षिकेची नोकरी हा सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानला जायचा. तसे दुसर्‍याच्या घरी स्वयंपाक करणे, शिवणकाम, नर्सिंग हेही पर्याय असत, पन वरील कारणाने मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया हा पर्याय निवडीत. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेतही अशा श्क्षिकांचे प्रमाण अधिक होते. स्वत;च्या खाजगी आयुष्यातल्या कटू अनुभवांमुळे त्यांच्या प्रतिक्रिया कधी कधी कडवट होत असाव्यात असं आता वाटतं, पण त्या सर्वांनी आपापले विषय आम्हाला समरसून उत्क्रुष्ट शिकवले.त्या वेळचे शिक्षक, बहुतांश शिक्षक आपापल्या विषयात पारंगत असत. बहुतेकाम्ना आपला विषय खुलवून शिकवण्याची हातोटी होती. त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांत आदरयुक्त दरारा असे. त्यांच्या हातातली छडी हेच एकमेव कारण त्यामागे नसे.तर त्यांनी साहित्याचे , विज्ञानाचे अंतरंग आमच्यापुढे उलगडण्यात कोणतीही कसर सोडलेली नसे, हे असे. अर्थात बालसुलभ उतावळेपणामुळे आम्ही त्यांना त्रास देण्यात , दंगा करण्यात धन्यता मानली तरीही त्यातूनही जे ज्ञान आमच्यापर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले ते आम्हाला आजही उपयोगी पडत आहे. पुढे स्वत: शिकवताना विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगताना कधी कधी लख्खकन जान्णवून जायचं, अरे, ही आपली 'स्टाइल' सावंतबाईंसारखी / कुलकर्णीसरांसारखी आहे शिक्षक आपल्याला नकळत जन्मभराची शिदोरी देतात. आपण क्षणभर त्यांच्या आठवणीने गहिवरतो.एखाद्या उदास क्षणी त्यांची त्रास दिल्याबद्दल मनोमनी क्षमाही मागतो, पण त्याच क्षणी आपल्याला जाणवलेलं असतं,की कालचक्र उलट फ़िरून आपल्याला ' सुधारायची' संधी मिळाली तरी आपण परत तसेच वागू. हे म्हणजे वासराने गाईला दिलेल्या ढुशा असतात. त्याविना वासराला पिण्याचं समाधान नाही, आणि गाईला पान्हा फ़ुटत नाही..शिक्षक आणि विद्यार्थी यात इतकं जवळीकतेचं नातं निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या हेही असावं असं मला वाटतं.वर्गात ३५ -४० मुली असल्याने शिक्षक सगळ्यांना ओळखत ते त्यांच्या घरगुती पार्श्वभूमीसह. आमचे शिक्षक कितीही वर्षांनी भेटले तर त्यांना नमस्कार करताना आमचा ऊर अभिमानाने भरून यायचाच, पण शाळेचे प्यून भेटले तरी त्यांची खुशाली विचारल्याविना पाय पुढे पडायचा नाही.या शाळएने मनुष्य म्हणून जगण्याला लागणारे संस्कार भरभरून दिले, अभ्यासाच्या परिक्षातून, खेळाच्या स्पर्धातून आणि शाळा सुटल्यावर केलेल्या नाटकाच्या तालमीतूनही.
१९६५ ला ११वीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास झाल्यानंतर कोणत्या कोलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हा प्रश्न उभा रहिला.तेव्हा गोखले, आणि राजाराम असे दोनच उत्तम पर्याय कला आणि विज्ञान शाखेकडे जाणार्‍यांसाठी उपलब्ध होते. बहुताम्श मुली कला शखेचा पर्याय निवडत.आम्ही काही मुली आंतरराज्य स्पर्धा खेळलो असल्याने आम्हाला गोखले कोलेजकडून सन्मानपूर्वक आमंत्रणही मिळालं होतं.वडिलांचं म्हणणं मी गोखले कोलेजला जावं असं होतं. यामध्ये कोलेज खेळाडू म्हणून चारी वर्षांची फ़ी माफ़ करणार होतच, पण त्याबरोबर खेळाची शिष्यव्रुत्तीही देणार होतं, हे होतच, पण दुसरं कारण म्हणजे कोलेज घरापासून ३ मि. च्या अंतरावर होतं. आता मात्र त्यांची काळजी फ़ारच वाढली असावी. आपल्या सुकुमार [!] राजस बाळीला पळवून नेण्यासाठी जागोजाग घोडे तयार ठेवून राजकुमार तयारीत अशी दुष्टस्वप्नं त्यांना पडत असावीत.मीही बाणेदारपणे ' जाईन तर राजारामला नाहीतर शिकणार नाही" असं उत्तर दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. आणि मी तरी काय करणार ? माझाही नाईलाज होता. गेले वर्षभर शाळा आणि कोलेज यामधलं ' ते' फ़ाटक खुणावत होतं ना मला डोळे मिचकावून ! त्यामुळे जून १९६५ ला मी अधिकृतपणे ' राजारामियन ' झाले. प्रथम वर्षासठी मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी लागणार्‍या गुणांसह ! d
draft

3 comments:

Abhijit Bathe said...

namaskar!
maajhyaa blog warachyaa aapalyaa comment baddal dhanyawaad.
tumhee hee chhaan lihitaa.
tumache anubhaw waachun te 'june' waaTat naaheet - mhaNajech fresh waaTataat he saangaNe na laage!! :)

prabhavati said...

राधिका, तू अगदी थेट भूतकाळत नेतेस !आणि मजा अशी की शाळा, स्थळं वेगळी असली तरी अनुभव तोच ! काळाचा महीमा, नाही ?मलाही आमच्या तुळजापूरकर बाई आणि सामंत बाई आठवल्या.सांमंत बाईंनी रोज शुद्धलेखन लिहायला लावून माझं हस्ताक्षर सुधारलं.म्हणायच्या,
" सुळे, हुषार आहेस, पण अक्षराने मार्क घालवशील "तेव्हा एकटीलाच हे काम म्हणून एखद्या वेळी रागही आला असेल कदाचित, पण आज कोणी " अक्षर सुंदर " म्हटलं की त्या आठवतात !

archana said...

तुमच्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही स्वतः किती सुंदर लिहिता. मी न पाहिलेल्या दिवसांचा अनुभव मला तुमच्या लेखातून घेता आला.