Wednesday, May 9, 2007

नैहर छुटोही जाय

हरिगांव हे दोन अडिचशे उंबर्‍यांचं गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे याची १९७३ सालापर्यंत मला खरच कल्पना नव्हती.पण माझे तीळ तांदूळ या गावचे आहेत हे माझ्या निकटवर्तीयांना समजलं, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे, " बघ ग बाई, नगर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष, डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाणी आणायला भटकावं लागेल हां. " अशी होती. पण ' सावरे अयजय्यो ' च्या त्या काळात डोक्यावरचा हंडा उतरायला साजण असणार ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करत होती.कोल्हापूरसारख्या हिरव्यागार गावातून टळटळीत उन्हात प्रवास करून श्रीरामपूरच्या रखरखीत बस स्थानकावर मी पोचले तेव्हा दुपार ढळत होती. अजून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या साखरकारखान्याच्या वसाहतीत आम्हाला जायच होतं. कारखान्याची जीप काही कामासाठी श्रीरामपुरात आली होती, तीच आम्हाला मुक्कामी घेऊन जाणार होती. इथल्या बस स्थानकावर आल्यावर मला समजलं की ज्या हरिगावचा मुरलीरव मला इथवर खेचून घेऊन आला होता, ते ' हरि'गाव नसून 'हरे'गाव आहे. त्यामुळे प्रवासाचा चिकटा अंगावर आणि कुठे येऊन पडलो ही ठुसठुस मनात घेऊन ' हरे राम ' म्हणत हरेगावला जाणार्‍या जीपमध्ये बसण्याखेरीज गत्यंतर नव्हतं.
श्रीरामपूर संपता संपता रस्त्यावरचा प्रकाश विरळ होवू लागला. वाटेवर अंधुक अम्धुकसे दिवे मिणमिणायला लागले.गाडी हरेगावकडे जाणार्‍या रस्त्यावरून दणदणायला लागलीआणि बघता बघता मिट्ट अंधार झाला. त्या निर्मनुष्य रस्त्यावरच्या अंधाराचं मनावर दडपण यायला लागलं. नवर्‍याचा उल्हासलेला आवाज कानाशी गुणगुणत होता, " हा वाकडा लिंब, इथे मोठा दरोडा पडला होता. ही तीन वाडी, हा ब्राह्मणगाव फ़ाटा, हे स्टाफ़ क्वार्टर, हे हरळीगेट आणि हे----'असं म्हणत कोपर कुशीत घुसल आणि आवाजातल ' डाबर हनी ' वाढलं तेव्हा लक्षात आलं की आपलं घर आ-----ल. नपेक्षा मिट्ट अम्धारात, जीपच्या दिव्याच्या झोतात, वाकड्या लिंबापासून हरळीगे्टपर्यंत सगळीच ठिकाणं माझ्या दृष्टीने सारखीच ' प्रेक्षणीय' होती. जीपमधून उतरता उतरता व्हरांड्यातल्या स्वच्छ प्रकाशात मला दिसली ती पिवळ्या भिंतीवरची हिरवीगार मनीप्लांट आणि जाणवला प्रवास करून थकलेल्या मनाला तजेला देणारा मोगर्‍याचा सुगंध. आता हेच ' आपलं ' घर ही खूण मनावर एक गंधित मोहोर उमटवून गेली.
सकाळ झाली आणि अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना दिसला मागील दारी सळसळणारा पिंपळ. ताडकन उठून खिडकीतून डोकावले तर चिंच, पिंपळ, उंबर एकाच खोडातून आकाशाकडे झेपावलेले. असच झाड रेडकरांच्या मूळगावी, रेडीला, आहे हे समजल्यावर आपल्या सासरचे कोणी आदि पुरुष छत्र धरून आहेत की काय अशी भावना जागी झाली. पुढच्या दारी आंबा, जाम्भूळ, यांची सावली. ट्विन बंगल्यांची सीमारेषा ठरवणार्‍या तारेला लागून मोगर्‍याची रांग.बागेत गुलाब , जाई, जुई, कुंद, चमेली , अबोली यांचा बहर.रामफ़ळ , सीताफ़ळ, आवळा, नारळ, विलायती चिंच . ही सगळी रेलचेल क्षणा क्षणाला डोळे विस्फ़ारायला लावत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही उंच वृक्ष सावली धरून हवेतला उकाडा कमी करण्याचा प्रयत्न करत होते. सम्पूर्ण कॉलनीतल्या लांबरुंद बागा आणि आखीव रेखीवपणा बघून आपण "कुठे" येऊन पडलो ही खंत केव्हाच पुसली गेली. कारखान्याच्या या 'बी' टाइपच्या बंगल्यात मी ७३ मध्ये रहायला आले आणि आयुष्याची १७ वर्षं, कारखाना बम्द पडल्यावर पोटासाठी गाव सोडेपर्यंत, तिथेच राहिले.
draft

3 comments:

prabhavati said...

Va, chhaan aahe suruvaat. paN 17 varshanchya vaastavyabaddhal aathvaNi ajun lihaaychya astil na ? haa pahila bhaag, puDhe chaalu.... vATalaa .
Waiting for the next post.

Abhijit Bathe said...

mee hee shrirampur bhaagaat 4 warsh kaaDhalee - tee exactly sukhadaayak nawhatee, paN tyaa parisaraane tee 'bearable' banawalee. lihit lihit tumhee maazyaa janmaachyaa 5 warsh aadhee pohochalaayt. itakyaa warshaanchaa 'tempo' tumhaalaa chhaan jamatoy. malaa to ekaa post warun dusaryaawar 'carry' karataa yet naahee!

Radhika said...

abhijit, tu sundar lihitos, majhya vayacha jhalas ki majhyapeksha chhan lihishil.
prabha, thanks friend.