Sunday, April 22, 2007

खासबागेतलं घर

आजवरच्या आयुष्यात जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या घरात राहण्याचा योग आला, पण आयुष्याची पहिली १९ वर्षं ज्या घरात काढली, ते घर गैरसोईचं होतं असं आज वाटलं, तरीही तेच सर्वात प्रिय वाटतं. ते घर म्हणजे कोल्हापुरातलं खासबाग या भागातलं " राज अंजुमन ताज " अशा भारी भक्कम नावाचं बी. नांद्रेकरांचं घर. घराच्या नावातले ३ शब्द हे त्यांच्या ३ मुलांची नावं होती. त्यांची ४थी मुलगी ' शुक्रिया' आमच्यापेक्षा ३- ४ वर्षांनी मोठी होती. तिचं नाव मात्र घरावर नाही याचं आम्हाला लहानपणी फ़ार वाईट वाटायचं, आणि शुक्रिया आबांची नावडती मुलगी आहे असं आम्हीच मनाशी पक्कं ठरवून ती समोर नसताना फ़ार हळहळायचो. आता आबांनी घर बांधलं तेव्हा 'शुक्रिया'चा जन्मच झाला नसेल तर तिच नाव घरावर कसं असणार ही गोष्ट आमच्या चिमुकल्या डोक्यात काही येत नसे.आम्ही आबांच्या घरातील भाडेकरु होतो. आणखी ३ भाडेकरु आणि आबांचं स्वत:चं घर मिळून नांद्रेकरांचं घर होत असे. या सगळ्या घरांना मध्ये चौक होता, आणि प्यायचं पाणी भरण्यासाठी समाईक नळ तिथेच होता. शिवाय बाथरूमही चौकातच होती आणि बाथरूममध्ये स्वतंत्र नळ होता. अशा घरांना पूर्वीच्या पध्द्तीप्रमाणे समाईक संडासही होता. आमच्या घराला लागूनच , म्हणजे चालत गेलं तर २ सेकंदात आणि पळत गेलं तर १/२ सेकंदात पोचू अशा अंतरावर खासबाग नावाचं मैदान होतं, जे आम्हा मुलाम्चं दुसरं घर होतं, त्या मैदानाच्या नावावरून त्या भागाचं नाव खासबाग असं पडलं होतं.याभागात बर्‍याच नामवंत मंडळींची घरं होती, आणि ती सगळी मंडळी इतकी मोठी आहेत याची जाणीव लहानपणी आम्हाला नव्हती. आता आमचे घरमालक म्हणजे शुक्रियाचे आबा हे १९३०_ १९५० या काळातले फ़ार मोठे नट होते हे मला बर्‍याच वर्षांनंतर त्यांचे मीनाकुमारी , निम्मी, नर्गिस यांच्याबरोबरचे फ़ोटो बघितल्यानंतर कळलं. तसे तर आमच्या अवतीभोवती सरिताचे अण्णा,[जुन्या काळचे प्रसिध्द नट विष्णुपंत जोग ],बकुळाबाईंचे मिष्टर[ भालजी पेंढारकर], भालजी पेंढारकरांची सर्वात मोठी बायको लीलाबाई [मिस लीला] अण्णांकडे येणारे त्यांचे मित्र दादा साळवी, मांगोर्‍यांच्या समोरच्या घरात येणारा अरुण सरनाईक,शकून मासूरकरची मैत्रीण उमा [उमा नटी] हे सतत वावरतच असायचे, पण त्यांचं ग्लॅमरचं वलय आमच्या डोळ्यावर कधीच आलं नाही.खासबागेच्या ग्राऊंडवर धुडगूस घातल्यानंतर आम्ही सगळ्या मुली सरिताच्या घरी झोपाळ्यावर बसून झोके घेत गाण्याच्या भेंड्या खेळत असू. सरिताची आई जानकीकाकू गोड गळ्याच्या होत्या. त्याही कधी कधी अण्णा नसले तर गाणं म्हणत.कधी कधी संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेला अण्णांच्या पहाडी आवाजातल्या ताना कानावर पडत. भालजी पेंढारकरांकडच्या , म्हणजे बकुळाबाईंकडच्या घरगुती समारंभासाठी उमा नटून थटून पण डोक्यावर पदर आणि नजर खा्ली , हातात क्रोशाच्या रुमालाने झाकलेलं ता्ट घेऊन जाताना दि्से. लीलाबाई रस्त्याने निघाल्या की कोणीतरी योगिनी शुभ्र वेषात निघाल्यासारखं वाटे.शाळेत आमच्या मागे दोन वर्षं असलेली माया जाधव सायकल वरून गोखले कॉलेजला जाताना दिसे. ती सगळी कोल्हापुरातल्या उच्चभ्रू लोकांची वस्ती होती, पण हे लोक आपल्या खाजगी आयुष्यात अगदी मध्यम वर्गीय मूल्य जपणारे असल्यामुळे बाकीच्या जनसामान्यात मिसळून गेलेले असत.
तर मी ज्या घरात लहानाची मोठी झाले, ती दुमजली आणि चार खोल्या असलेलं होतं. पुढे गॅलरी, मागे गच्ची. या गच्चीत एका कोपर्‍यात आई बंबात घालायसाठी कोळशाची खर आणि शेण कालवून त्याचे बंबगोळे करून वाळवत असे. तिथेच बाजूला शेणाच्या गवर्‍या [कोल्हापुरी भाषेत 'शेण्या' ] पोत्यात भरून ठेवलेल्या असत. आणि उरलेल्या जागेत तिने आणि भैय्याने देवदारी खोक्यात वेगवेगळी फ़ुलझाडं लावलेली असत.संध्याकाळच्या वार्‍यात ति्थे बसून गोष्टीचं पुस्तक वाचायला मजा येत असे.पुढच्या बाजूला गॅलरी होती.एका कोपर्‍यात छोटीशी मोरी होती, आणि दुसर्‍या कोपर्‍यात कोळशाचं भलं मोठं पिंप. यामधली जागा भैय्याची स्टडीरूम. त्याने तिथे बल्ब लावून घेतला होता.पिंपाच्या शेजारच्या शेल्फ़वर त्याच्या नोटस, पुस्तकं. ११वीत असताना मीही हट्टाने त्याच्या पायाशी बिछाना घालून अभ्यास करत असे.जेमतेम १० वाजेपर्यंत डोळे ताणून वाचल्यानंतर अंथरुणाला पाठ टेकली की चांदण्यांनी भरलेलं आकाश खुणावायला लागायच, समोरच्या मुनिश्वरांच्या बागेतल्या नारळाच्या झावळ्या मंद डोलायला लागायच्या आणि त्या सगळ्यांना पांघरून डोळे जड व्हायला लागायचे.मला आता आश्चर्य वाटतं, की अशा अडचणी , जागेच्या, गोंगाटाच्या, आमच्या अभ्यासात अडथळे का आणू शकल्या नाहीत. खालून रस्त्यावरून रहदारीचे आवाज,ग्राऊंडवरून खेळताना मारलेल्या आरोळ्या, काही काही कळायचं नाही पुस्तक उघडल्यावर.सगळं जग जणू विरून जायचं आणि उरायचं फ़क्त पुस्तकातलं जग, मग ते अभ्यासाचं असो की गोष्टीचं !
आमच्या या घराला दोन मजले होते, वर दोन खोल्या, खाली दोन खोल्या.. शिवाय एखाद्या हॉलसारखा भला मोठा माळा, ज्यात भैय्या आणि त्याचे मित्र शिडी लावून चढायचे, आणि दोनच माणसं उभी राहतील अशा गच्चीत उभे राहून पतंगाची काटा काटी करायचे.वरच्या मजल्यावरची सगळी कपाटं , लॉफ़्टस, वरच्या माळ्याचा काही भाग पुस्तकांनी भरलेला असायचा. महाभारताच्या खंडापासून पी. जी. वुडहाऊसपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तकं ठासून भरलेली असायची. शिवाय बंगाली , गुजराथी भाषेतील साहित्य, शास्त्रीय विषयांची असा भरणाही त्यात असायचा. माझे वरचे दोन्ही भाऊ वाईच्या विश्वकोषात लिहिणारे असल्यामुळे त्यांच्यापुढे माझं वाचन म्हणजे लिंबू टिंबूतली बी च. पण वरच्या मजल्यावरच्या पुढच्या खोलीत सगळे काही ना काही वाचत असताना मी बाराखडी काढत बसलेली मला अगदी स्वच्छ आठवतय.पुढे मोठी झाल्यावर माझीही लायब्ररी झाली. जिन्याच्या वरच्या कपाटावर एक माणूस आरामात झोपेल इतकी जागा होती,तिथे खाकी कव्हर घातलेली आणि कॅलेंडरचे आकडे कोपर्‍यात चिकटवलेली, चांदोबा, गोट्या, रॉबिन हुड, सानेगुरुजींच्या गोड गोष्टी अशी कितीतरी पुस्तकं मी नीट रचून ठेवलेली असत.पुस्तकांवर माणसांप्रमाणे प्रेम करायला या घराने मला शिकवलं . अर्थात माझ्या मुलांच्या मते तो साने गुरुजींच्या 'बोर 'गोष्टींचा परिणाम आहे. जनरेशन गॅप, दुसरं काय ? असो.
तर साम्गायची गोष्ट अशी की वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी दोन ठिकाणी वाकडा जिना होता. त्याच्या खालून तिसर्‍या पायरीजवळ भिंतीत एक खिडकी होती.पायरीवर बसून बशीत खाणं घेवून पुस्तक वाचत तिथे बसायला खूप मजा येत असे. जिन्याखाली जास्तीचं सामान असायचं आणि पुढे डायनिंग टेबल आणल्यानंतर लाल लाल लाकडी पाटही तिथेच गेले. पण एकदा आम्हा मुलांचा गणपती बसवण्यासाठी सगळं सामान काढून 'कैलास पर्वतावर गणपती' असा सीनही आम्ही जिन्याखाली केला होता. डायनिंग टेबलचे ड्रॉवर्स कपड्यांनी खच्चून भरलेले असायचे आणि बापू कामासाठी गावाला गेले की भैय्या आणि त्याचे मित्र टेबलावर टेबल टेनिसही खेळत. किंवा भैय्या रात्री त्यावर झोपेही.आमचं स्वयंपाकघर मात्र अंधारं होतं. दिवसा ही तिथे बल्ब लावावा लागे. दार होतं, पण ते समाईक चौकात उघडत असल्याने बहुधा बम्दच असायचं.स्वयंपाक चुलीवर चालायचा. चूल सारवणं, तिला पोतेरं देणं, दुसर्‍या दिवशीसाठी ती भरून ठेवणं हे कितीही " एथनिक" वाटलं तरी तेव्हा न जाणवलेले आईचे कष्ट आज मनाला वेदना देतात. आयुष्य हे असंच असतं. एकमेकींना मदत करत ते हसत खेळत पार पाडायचं असतं, हे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला आपल्या वागणुकीनेच दाखवून दिलं. बाहेरचे पदार्थ खाणं हे छचोरपणाचं मानलं जात असल्याने आणि वेगवेगळे पदार्थ करणं स्त्रीच्या स्त्रीत्वाचं प्रमुख लक्षण मानल गेल्यामु्ळे रोजचं वाटण घाटण ही तर सामान्य गोष्ट होती, पण विशेष खटाटोपाचे जिन्नसही या बायका सहजपणे करत. [ की त्यांना करावे लागतच ? ] मला माझ्या लहानपणीची आई आठवते ती चुलीच्या धगीने लाल झालेली, कमरेला खो्चलेल्या सोदन्याने [फ़डकं ] घाम पुसणारी, आणि तरीही शांत. या सगळ्या कामातही विणकाम भरतकाम वाचन करण्यासाठीचा वेळ ती कुठून काढायची ते तीच जाणे.
आमच्या या घराला फ़रशीची जमीन नव्हती, तर मातीची जमीन होती. दर आठ दिवसांनी ती सारवायला लागायची. आणि दर चार महिन्यांनी ती उलायची, म्हणजे तिचे पोपडे निघायचे. मग उलथन्याने ते काढायचे. जमिनीवर पाणी मारायचं आणि मग ती शे्णसडा घालून केरसुणीने सारवून घ्यायची. अशी ती सुस्नात झालेली जमीन खोलीच्या चार कोपर्‍यात शुभदर्शक रांगोळी घालून वर हळदीकुंकू घातलं की गरत्या सवाशिणीसारखी उजळून निघायची.
या घराची एकच का्ळीकुट्ट बाजू होती, ती म्हणजे संडास. पूर्वीच्या काळचे टोपलीचे संडास आणि संपूर्ण तोंड फ़डक्याने बाम्धून डोक्यावरून मैला वाहून नेणारे भंगी लहानपणी दिसले की मळमळायला लागायचं आणि घृणेने मान फ़िरवली जायची, कळत्या वयात ते दृश्य आठवलं की त्यांच्या नशिबातल्या नरकयातना बघून शरमेने डोळे पा्णवायचे आणि मान खाली झुकायची.
आमच्या घरमालकाम्चे मुलगे कर्ते झाल्यावर त्यांनी घराचा कायापालट करायचं ठरवलं. घरात फ़रशी घालून शिवाय प्रत्येकी स्वतंत्र फ़्लशचे संडास, घरातच नळ . मात्र भाडं महिना ४० रुपयावरून १०० रुपयावर जाणार होतं. एवढं भाडं देवून अंधार्‍या घरात राहण्यापेक्षा नव्या वस्तीत रहावं हा बायकांचा विचार पुरषांनाही पटला आणि आम्ही सागरमाळावर रहायला गेलो, पण पाण्याच्या टंचाईमुळे तेही घर ६ महिन्यातच आम्ही सोडलं आणि संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत रहायला गेलो. तिथे मात्र मी लग्न होईपर्यंत राहीले.
draft

8 comments:

Abhijit Bathe said...

As usual - detailed!
Good!!

This time I didnt have to look at your profile. I could figure just from reading that no one else can write this stuff! :)

Radhika said...

thanks Abhijit !

कोहम said...

chaan lekh aahe...pan ek suggestion aahe....evadah motha lekh ekach veli na publish karata jar to tumhi ardha ardha don vela publish kelat, tar jasta lok shevatparyanta vachatil....karan computer var itaka vel concentration ni vachat rahana kathin vatta...pan lekh uttam aahe hyat shankach nahi...

Radhika said...

सूचनेबद्दल आभार, कोहम. खर तर हे माझ्याही मनात आलं होतं पण नक्की काय कराव उमगत नव्हत.

prabhavati said...

कॅलेंडरचे आकडे कोपर्‍यात चिकटवलेली, चांदोबा, गोट्या, रॉबिन हुड, सानेगुरुजींच्या गोड गोष्टी अशी कितीतरी पुस्तकं मी नीट रचून ठेवलेली असत.पुस्तकांवर माणसांप्रमाणे प्रेम करायला या घराने मला शिकवलं .
Chhan !

Aani, mala sagala ekadam vaachayla aavadel. Ho, Black backgroundcha jara doLyAna tras hoto he maatra khara hM !Pan tujhya sundar likhanapudhe ha dolyancha tras
' hyaa ! voh kya cheez hai ! '

Keep writing my friend and pl. inform.

डॊ.मुक्ता पाठक शर्मा said...

खु्पच छान लिहिलय तुम्ही

Chaitra said...

मातोश्री, साने गुरुजींच्या गोष्टींना बोर गोष्टी असे निकेत म्हणायचा, मी नाही याची नोंद घ्यावी. आपण मुलांना लिहिले आहे.

priyaaa said...

Namaskar!
tumacha blog vachala.....
tumachaya manacha aawaza
majhya manaparyanta yeuna thet pochala!
khup bara vatala tumacha blog vachun....kharach....
manacha vay kadhich vadhat nahi
tumacha profile vachun
tehi zanhavala!