Monday, March 19, 2007

गुढीपाडवा

आज मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस ! रोजच्यासारखाच उगवलेला,पण डोळे उघडल्याबरोबर पहिली जाणीव झाली की आज पाडवा.बाहेर चांगलच उजाडलेलं होतं. ताडकन पांघरूण बाजूला करून उठले तर दुस‍र्‍या क्षणी जाणवलं की गडबड करण्याची काहीच गरज नाही. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. परत पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले, पण पापणीच्या आत ५० वर्षांपूर्वीची गुढी डोलू लागली.
तेव्हा या वेळपावेतो सगळ्यांच्या दारात गुढी उभी राहिलेली असे. काय शामत होती सणाच्या दिवशी "इतक्या " उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याची ? कारण "ज्ञान, संपत्ती आरोग्य," मिळवण्यासाठी " लवकर निजे आणि (मुख्य म्हणजे) लवकर उठे "हा साधा, सोपा, सरळ मार्गच त्या काळी मोठ्या माणसांना माहीत होता. त्यामुळे लवकर उठल्याखेरीज गत्यंतर नसायचं. एरवी त्याचं फ़ारसं काही वाटायचं नाही, पण गुढीपाडव्याला मात्र एकदम दुपार उजाडली तर काय बहार होईल हाच विचार मनात असायचा. कारण दात धुतले न धुतले तोच आई कडुलिंबाची पानं घेऊन तयारच असायची.प्रथम ती चावायची, मगच गोड खायला मिळायचं ( ही सवलत मी शेंडेफ़ळ असल्यामुळे फ़क्त मलाच असायची, मोठ्या भावंडाना ती पानं गिळावीही लागायची.) त्यामुळे नववर्षाची सुरवात "आई, नको ना ग, पुढच्या वर्षी नकी खाईन ' याच वाक्याने व्हायची हे ठरलेलं.
पण एवढं सोडलं तर मग मात्रं धमाल! दारासमोरचं अंगण , खर तर रस्ताच, झाडणे, शेणसडा घालणे आणि मग रांगोळी. आपली रांगोळी सगळ्यांच्या आधी घालून व्हावी हे त्या दिवसातलं माझं स्वप्न होतं. पण शेजारच्या अक्का पहाटेच उठून रांगोळी घालून तयार असत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीही. परत वर मला रांगोळीत मदत करायला तयार ! ओळीत सडा घालून रांगोळीने सजलेली ती अंगणं बघताना आतून कुठून तरी पारिजातकाचं फ़ूल उमलल्यागत सुरेख वाटायचं.मग गुढी उभारायची गडबड . सूर्याच्या कोवळ्या उन्हात रंगीबेरंगी खणांनी नटलेल्या,माळांनी सजलेल्या गुढ्या 'चैत्राच्या' आगमनाची ललकारी देत असायच्या. त्यांचे सोनेरी खण उन्हात झळाळून उठायचे. नवीन कपडे घालून , हातात नवीन वर्खाच्या बांगड्या झळकवत, वेणीचं नव्या रिबिनीच फ़ूल चाचपत मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून गुढ्या बघताना सकाळ कधी सरायची कळतच नसे.घराघरातून पक्वान्नांचे गोड वास आणि तळणाचे सुगंध यायला लागले की पळत घर गाठायची घाई उडायची.
आज 'तो' पाडवा आठवून वाईट वाटतय का असं मी (डो्ळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली.ते हसून म्हणालं " वाईट काय वाटायचं त्यात ? प्रत्येक वे्ळचे नियम वेगळे, प्रत्येक वे्ळच्या गमती वेगळ्या.तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना , मग आवर.मस्त पैकी चहा घे कपात ओतून , बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून.त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडच आहे ?मग 'ती' गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे ?

6 comments:

prabhavati said...

त्या काळाचं किती सुंदर चित्र उभं केलंय्‌ !आणि नव्या काळातले अनुभव अप्रतीम तुलना.समारोपाचा परीच्‍छेद तर फ़ार काही सांगतो. एका परीनं नव्या वर्षासाठी नव्या काळातला हा संदेशच की जुन्या जाणत्या( अजाणत्यां )साठी !
वा.सुंदर.

कोहम said...

farach chaan...

Radhika said...

मनापासून आभार, प्रभा, कोहम!

Radhika said...

मनापासून आभार, प्रभा, कोहम!

Asawari said...

was in delhi so didnt even get to see a gudi - but m not one to accept defeat so easily, so i logged on to internet and saw a gudi padva video on youtube :D

simple.com said...

... आतून कुठून तरी पारिजातकाचे फ़ूल उमलल्यासारखे छान वाटलं हा लेख वाचताना..