Sunday, October 18, 2009

भाऊबीज

लहानपणी चांदोबात एक लोककथा वाचली होती. एका आदिवासी स्त्रीचा नवरा, मुलगा आणि भाऊ युध्दात मारले जातात. सर्वत्र पडलेल्या शवांच्या गर्दीत तिला आपली माणसं ओळखू येत नाहीत. ती देवाची करुणा भाकते. देव प्रसन्न होऊन तिला वर देतो की, तुला हवा असेल तो नातेवाईक मी जिवंत करून देतो. सगळेच जवळचे असल्याने ती स्त्री विचारात पडते. पण निर्धाराने देवाला सांगते की, माझ्या भावाला जिवंत कर. देव कारण विचारतो , तर ती सांगते, " नवरा परत मिळेल कारण मी परत लग्न करेन. त्यामुळे मला मुलगाही मिळेल. पण भाऊ परत मिळणार नाही." त्या लहान वयात हे विधान धक्कादायक वाटलं. पण आता विचार केल्यावर जाणवतं ते हे की आदिवासी स्त्री असल्यामुळे ती निसर्गाच्या अधिक जवळ होती. त्यांचे नियम हे वास्तवाला धरून होते. एक नवरा मेल्यावर दुसरा करणं हे त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक होतं. देव तिच्या चतुराईवर प्रसन्न होऊन सगळ्यांना जिवंत करतो हा भाग वेगळा.
आज सकाळीच ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे, आज भारतात आणि उद्या अमेरिकेत भाऊबीज. लांब अंतरावर असलेल्या माझ्या भावांची सहज आठवण आली , जे आता सत्तरी ओलांडलेले आहेत , आणि त्यापाठोपाठ ही गोष्ट आठवली. या गोष्टीतला बाकीचा भाग वगळता भावाचं आपल्या आयुष्यातलं स्थान परत एकदा आतून जाणवलं.
सहोदर. एकाच आईच्या उदरात वाढलेले, एकाच आईशी नाळेने बांधलेले , तिचं रक्त आपल्या धमन्यातून वाहून नेणारे जीव ते सहोदर. त्यांनी तिच्या रक्तातले कोणते गुण- दोष घेतले यावर त्यांच्यातली जवळीक वाढत जाते. माझ्याबाबतीत हा प्रश्नच आला नाही. कारण सगळ्यात मोठा भाऊ १७ वर्षांनी मोठा दुसरा पंधरा वर्षांनी तर तिसरा आठ वर्षांनी. पहिल्या दोघांच्या विद्वत्तेच्या दबावाखाली आम्ही धकटे दोघे दबून. निदान मी तरी. त्यामुळे भावा बहिणीची भांडणं, मारामारी हे सूख मला कधी मिळालच नाही. कारण हे दोघे नेहमी जाड्या जाड्या पुस्तकांच्या गराड्यात. पण त्यामुळे एक झालं की लहानपणापासूनच पुस्तक ही मोठी जादूभरी गोष्ट आहे हे कळलं. त्यातही आम्ही वाचणार म्हणजे fiction. जे आप्पाला वाटायचं बांडगूळ. काहीतरी. शास्त्रीय माहिती वाचावी, मुळात गादीवर पालथं पडून वाचू नये यासाठी मी लहानपणी त्याच्या कितीदातरी शिव्या खालेल्या आहेत. ( आता शिव्या म्हणजे जास्तीजास्त " मूर्ख". कारण वरच्या दोघांनी कधी च्यायला किंवा साल्या इतके साधे शब्दही उच्चारलेले मी आजतागायत ऐकले नाहीत. तो मान माझा आणि भैय्याचा).सगळ्यात मोठा बाबा तर माझा गुरु. कारण कॉलेजात आम्हाला शिकवायला तो होता. ( त्यामुळे त्याच्या तासाला (attendance compulsary). त्यामुळे मारामारी झालीच तर थोडीशी भैय्याशी ज्याचं पर्यवसान नेहमी भैय्याला बोलणी किंवा मार बसण्यात व्हायचं .कारण तीनही भावात मी एकटी, सगळ्यात लहान. यांनी त्यांच्या रडक्या बहिणीला शांत करण्यासाठी किती तरी वेळ फ़िरवलं आहे.उत्तमोत्तम सिनेमे दाखवले आहेत, स्वत: वाचून चांगलं साहित्य वाचायची सवय लावली आहे. ( आज सांगायला हरकत नाही, की, जे वाचायला निषिध्द होतं ते मी त्यांच्या अपरोक्ष गुपगूप वाचून काढलं होतं)त्यामुळे निकेत चैत्रा म्हणतात तसं " आई, तू कोल्हापूरला असलीस की मामा लोक जितक्या खुषीत येऊन जोक मारतात तितके आम्ही तुझ्याविना गेलो की मारत नाहीत. आता याला काही सयुक्तिक अर्थ आहे का? "खरच नाही . पण काय करणार? सहोदर हेच त्यामागचं कारण.
आज हे सगळं आठवायचं कारण, केवळ दूरच्या देशात मी आहे हेच. कारण गेल्या ३५ वर्षात लग्न झाल्यापासून मी त्यांना दोन तीनदाच ओवाळलं असेल. कारण घरची लक्ष्मी दिवाळीतपूजनाला घरीच असली पाहिजे हा सासरचा नियम. आणि आता मी या वयाला येऊन पोचले आहे की, हे बाह्य उपचार माझ्यासाठी अगदी गौण आहेत. पण आजच्या दिवशी माझ्या भावांना मला सांगावसं वाटतं, की तुम्ही मला वडिलांची माया दिलीत आणि भावाचं प्रेमही. माझं आयुष्य तुमच्यामुळे समृध्द झालं . तुम्ही माझ्यासाठी आहात, " द्रौपदीसी बंधु शोभे नारायण " असे!

No comments: