Wednesday, May 30, 2007

हरिगावातले सण

मी लग्न होवून हरेगावला आले तेव्हा कारखान्याचा सरता काळ सुरू झाला होता आणि आपल्या हातातून वाळू सरकून जातेय हे फ़ार थोड्यांच्या लक्षात येत होतं. वरवर सगळं पूर्वीसारखंच चालू होतं. संध्याकाळी वाड्यांवरून डल्लॉप गाड्या जिमखान्यात येत, खेळणार्‍यांच्या आरोळ्या उठत, पण प्रमाण कमी होत होतं.पूर्वी जशी खेळायला टे. टे. चं टेबल मिळण्यासाठी किंवा बॅडमिंटनसाठी कोर्ट मिळण्यासाठी भांडणं होत, तसा काही प्रकार उरला नव्हता. पण तरीही हरेगावी दिवस म्हणजे झाडाच्या शेंड्यावरचे पोपटच भासत होते. तसेच उत्फ़ुल्ल. मग भले ते जग केवळ अधिकारीवर्गाचं का असेना.

जिमखान्यात चैत्राचं महिला मंडळाचे हळदीकुंकू, कांदेनवमी असे कार्यक्रम उत्साहाने साजरे होत होते. शे-सव्वाशे बायका आणि त्यांची मुलं जमून नुसती धम्माल करत.. पण सगळ्यात उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशचतुर्थी, दसरा आणि संक्रांत. त्या दिवसात म्हणजे आमच्या घरी जत्रा उसळत असे. माझे सासरे हे कारखाना सुरु झाल्यापासूनच तिथं कामाला होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणार्‍यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणपती सार्वजनिक असला तरी आमच्याकडे घरात लगबग आणि राबता चालूच राही. गणपतीच्या पूजेसाठी रोज सकाळी घरातून तबक जात असे. त्यात ठेवण्यासाठी सासूबाई सुरेख हार करत. कधी जाईचे, कधी जुईचे, कधी दुर्वांचे... अनंत चतुर्दशीला सगळ्या गावाला घरचा पंचखाद्याचा प्रसाद असे. त्यादिवशी गणपतीची मिरवणूक फ़र्लांगभर अंतरावर आलली की सास~यांची गडबड सुरू होई, ' बाई, (ते सासूबाईंना बाई म्हणत, आणि त्यांच्याशी कोकणीत बोलत) सगळां ठेवलसस मा ? प्रसाद ठेवलस ना भरपूर, गुरुजी येतीत आत्ता. काशीनाथ, चल लवकर दारात उभा रहा लवकर.' नुसता गोंधळ उडवून देत.

दसरा आणि संक्रांतीला तर ते आणि सासूबाई संध्याकाळी ५ वाजताच सगळं आटपून बसत . पध्दत अशी की दसर्‍याला लहानांनी सोनं लुटायचं आणि संक्रांतीला मोठ्यांनी तिळगूळ द्यायचा. मग बेलापूर गावातून ४, ५ किलो रेवड्या आणि किलो दोन किलो तिळगूळ आणला जायचा. रेवड्या भाऊंनी द्यायच्या आणि तिळगूळ सासूबाईंनी. पहिले भाऊंच्या खात्यातले हमाल यायचे ५ वाजता. मग जी रांग सुरू व्हायची ती रात्री १० वाजेपर्यंत. साधारण ७च्या सुमाराला म्हणजे फ़ुल्ल मारामारीच. फ़ाटकाकडे वाल्हा उभा असायचा. कारण वात्रट मुलं एकमेकांचे शर्ट घालून २,२ ३,३ वेळा रेवड्या न्यायला यायची. मग वाल्हाचा आरडाओरडा " ईईए ए, आल्ता न तू मघा, उजुक का आला रे ****." की आतून कोणीतरी वाल्हाला आठवण करून देत असे की आज ' ति्ळगूळ घ्या गोड बोला "चा सण आहे. मग थोडा वेळ शांतता असे. काही हमाल बायकांना, नव्या सुनेला घेऊन येत. मग त्या आत माजघरात येऊन बसत... नव्या नवरीला नाव घेण्याचा आग्रह होई. काही बायका अगदी आगगाडीसारखी लांबलचक नाव घेत. साधारण ९ पर्यंत हा कल्ला असे आणि मग अधिकारीवर्गाची दुसरी फ़ळी येत असे. त्यांच्यासाठी तिळाचे लाडू घरी केलेले असत. त्यापुढे जेवण आणि जेवतानाही कोण आलं कोण नाही याची चर्चा चालू असे. दसर्‍यालाही याच नाटकाचा प्रयोग असे, पण फ़रक एवढाच की घरात ढीगभर आपट्याची पानं जमा होत आणि दुसर्‍या दिवशी काशीनाथला आपट्याची पानं झाडावी लागत.

2 comments:

Chaitra said...
This comment has been removed by the author.
Abhijit Dharmadhikari said...

नमस्कार!
तुमचा ब्लॉग छान आहे.
छायाचित्र तर अप्रतिम!!
अत्यंत बोलकं छायाचित्र आहे.