Friday, May 25, 2007

सीझन

साधारणपणे दसर्‍याच्या सुमाराला कारखान्याचा बॉयलर पेटवला जात असेआणि त्या दिवशी पूजा अर्चा करून समारंभाने गव्हाणीत ऊस टाकला जात असे. कारखान्याचा सीझन चांगला चालण्यावर सगळ्यांचं पोट अवलंबून असल्याने सगळा अधिकारीवर्ग सपत्निक हजर असे. आपल्याच घरातल्या समारंभाचा उत्साह सगळ्यांच्या देहबोलीतून ओसंडत असे. आता जाणवतं ते हे की या अशा समारंभाला कामगारवर्गाच्या बायका मात्र उपस्थित नसत. खर तर त्यांचं पोट तर जास्त प्रमाणात कारखान्यावर अवलम्बून होतं. पण काही काही गोष्टी आपण ' तशी पध्दत नाही ' म्हणून दुर्लक्ष करतो त्यातली ही एक . आमचे गुरुजीही मस्तच होते. कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून इतर देवतांना आवाहन करतानाच ते " शुगरदेवताय नम: " म्हणून मोकळे होत.कारखान्याचा सीझन चालू झाला की सगळं वातावरणच बदलून जाई. पहाट दुपार, रात्र अशा पाळ्यात पुरषांचं आयुष्य आणि देवा ब्राह्मणासमक्ष हाताला हात लावून 'मम ' म्हटलेलं असल्यामुळे त्यांचे डबे करण्यात आणि त्यांची झोपमोड होवू नये म्हणून मुलांचं ध्वनिप्रदुषण रोखण्यात बायकांचं आयुष्य गुंतून जाई. पोरांची अवस्था म्हणजे " ह्यो कोन बाबा आपल्या घरात रोज येतो ग आई, ' अशी होवून जाई. कारण बाबा घरी तेव्हा पोरं शाळेत आणि पोरं घरी तेव्हा बाबा एक तर झोपलेला किंवा कारखान्यात.
सीझन सुरू झाला की कारखान्याचा परिसर एकदम गजबजून जाई. कारखान्यासाठी लागणारा ऊस घेवून येणार्‍या डल्लॉप गाड्यांच्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण [ बैलगाडीला डनलॉप टायर्स लावले की डल्लाप गाडी होते.] ऊस लेबर वाहून नेणार्‍या ट्रक्सचा फ़रफ़राट, वातावरणात भरून राही. साखरेची पोती, बगॅसचे गठ्ठे वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स छोट्या रुळांवरून थेट श्रीरामपूरहून कारखान्याच्या दारात उभ्या रहात. रस्त्यांच्या कडाम्ना ऊस तोडणी कामगारांच्या त्रिकोणी आकाराच्या तट्ट्याच्या झोपड्या उभ्या रहात. अगदी पहाटे किंवा सांजला त्यांच्या चुलीतला जाळ ढणढणत राही, भाकरी आणि कोरड्यास करायला. संध्याकाळ कधी कधी दारू प्यालेल्या बाप्यांच्या गुरगुराटात आणि मार खाणार्‍या बायांच्या कलकलाटात मिसळून जाई. सगळीकडे रसाचा गोड वास आणि नवीन माणसाचं डोकं उठवणारा मळीचा दर्प दरवळत राही. पुरुषांच्या बोलण्यात क्रशिंग, रिकव्हरी असे शब्द वारंवार येऊ लागत.
कारखान्याचा सीझन सुरू झाला की घरातली बायका मुलं खूष असत.कारण आपली आणि आजूबाजूच्या शेजीबाईंचे मुलं घेऊन कारखाना बघायला जाणं हा एक मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झालेला असे. मग मुलांनी आतली अजस्त्र मशिन्स भयचकीत चेह्र्‍याने न्याहाळण , पोटभर रस पिणं गरम गरम साखरेचा बोकणा भरून खिदळणं हे सगळं सगळं बरेच दिवस चर्चा करायला पुरत असे. आमच लग्न ठरल्यानंतर पुण्यात आम्ही भेटल्यानंतर माझे पाय रसवंतीगृहाकडे वळत असत.कारण कोल्हापूरला असली न्हाई ती झेण्गटं नव्हती, कारन" रस कुट असा पितात व्हय ? सरळ रसाचा तांब्याच एका दमात रिकामा करायचा असतोय की राव, " ही कोल्हापुरची विचारधारा तेव्हा होती. पण मी कितीही लाडिकपणे " आपण रस पिवू या ? " असं विचारलं तरी " तू घे ना मी सोबत करतो " असं उत्तर यायचं मग मीही मनातल्या मनात " अरसिक किती हा मेला " असं म्हणत उघड " नको राहू दे तुला नको तर आपण दुसरं काही तरी घेऊ" असं म्हणत असे. पण पहिला सीझन सुरू झाल्यानम्तर नवर्‍याच्या नकाराचं कारण लक्षात आलं. सहा महिने रसाच्या वासात डुंबत राहिल्यानंतर तो तरी बापडा परत रस कसा पिणार ?
पण हळू हळू ३,४ महिन्यांनंतर याचाही थकवा यायचा. मुलांच्या वार्षिक परिक्षा झालेल्या असायच्या आणि मीही कारखान्याचा सीझन कधी सम्पतो आनि आपण मुलाम्च्या मामाच्या गावाला कधी निघतो याची वात बघायला लागायची, मुलांच्या बरोबरीने !
draft

2 comments:

prabhavati said...

Vah, chhan aahe ki ' RasapuraaN ! '

कोहम said...

hmm...chaan vatatay he vachayala...sagla mahit nasalela vishwa aahe...