Wednesday, January 24, 2007

काही सूर काही नाद

आवाजाचं, गंधाचं आपल्या स्म्रुतीशी नातं असतं. रोजच्या धावपळीत ते लक्षातही येत नाही, पण असा अचानक एखादा क्षण येतो, त्या आवाजाने मनाची तार झंकारते, आणि वढाय मन कुठल्या कुठे जाऊन पोचतं. त्या दिवशी पडद्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने माझी गत अशीच झाली.त्याचं काय झालं, लेकीकडे गेले होते, सकाळच्या गार वायाने झोप चाळवली. पडदाही थोडा हलला असावा.कारण एक वेगळीच किणकिण कानावर आली. झोपाळलेल्या डोळ्यांनीच समोर बघितलं. पूर्व उजळली होती कानात मघाची किण किण होती, पण कसली ते कळत नव्हतं. परत तोच आवाज आला. हे म्हणजे खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणीचा फ़ोन यावा आणि तिचा चेहरा धूसरपणे तरळत रहावा तसं झालं. डोळ्यावरची झोप उडवून नीट पाहिलं, सकाळच्या मंद वायाने पडदा हलत होता आणि पडद्याला लावलेले घुंगरू वाजत होते. नेहमीचे छोटे घुंगरू नव्हेत, बैलांच्या गळ्यात असतात तसे भले थोरले पितळेचे घुंगरू. त्या आवाजाने आणि सकाळच्या झुळकीने माझं मन परकया पोरीगत धावत माहेरी, कोल्हापूरला पोचले.कोल्हापूर हे शहर, गूळ, कुस्त्या, फ़ताड्या शिंगांच्या म्हशी, यासाठी जसं प्रसिध्द आहे तसं माझ्या लहानपणी , म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी दारात म्हशी पिळून घेण्याबद्दलही प्रसिध्द होतं. म्हणजे काय तर जवळपासची २-४ घर मिळून एक गवळी ठरवायचे. त्याने एका कोणाच्यातरी दारात म्हैस घेऊन यायचं आणि तिथेच म्हस पिळून दूध काढून द्यायचं. सगळाच संस्थानी खाक्या. तसा आमचा दूधवाला होता मधू आणि त्याची आई ' लक्क्षुंबाई'. दोघांपैकी कोणीतरी एकजण तांबडं फ़ुटता फ़ुटता दारात हजर. 'दोअईध' अशी त्याची आरोळी आली की समोरच्या मालुताई, शेजारच्या अक्का, वरच्या मजल्यावरच्या जाधवमामी आपापली भांडी घेऊन लगबगीनं यायच्या. मधूने म्हस पान्हवायला घेतली की अक्का हमखास म्हणणारच, " मधू, चरवी नीट पालथी करायचं बघ हं का ! नाहीतर तिरकी धरून वाटीभर पाणी घालचील बग." यावर मधूही मिशीला पीळ देत म्हणनार, " काय अक्का, इतकी वर्सं दूध घालायलोय तरी अजून विश्वास इना होय तुमास्नी ? काय एवड्या तेवड्यानं माडी बांदनार हाय काय ?" त्यावर जाधवमामीही त्याला चिडवायच्या, " कुनाला दक्कल माडी बांदतोस का बंगला ते! आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं. ' चरवीत धारेचं पहिलं चुळुक वाजलं म्हणेपर्यंत चरवी दुधानं भरून जायची अणि धारोष्ण दूध प्रत्येकीच्या पातेल्यात मापाप्रमाणे ओतलं जायचं.तसं तुम्ही कधी डोंगरमाथ्यावर गेलाय ? गाडी वळणावळणाने वरवर चढता चढता आसमंताशी आपण कणाकणाने एकरूप व्हायला लागतो. गाडी बंद करून आपण जर विसावतो, सभोवार असते नि:शब्द शांतता! अस्पष्टशी कुठेतरी दुसरी गाडी वर चढते असं वाटत असतं, पण बाकी वेढून असते ती फ़क्त निरव शांती. अशा वेळी दूर झा्डीत कोणी एक पक्षी शीळ घालत असतो. शांतता चिरत तो स्वरांचा बाण आपल्या उरात घुसतो, अगदी " काबुलीवाल्याच्या ' ऐ मेरे प्यारे वतन' च्या अरेबिक सुरावटीसारखा.कधी घेतला आहे असा अनुभव ?आणखी एका आवाजाचा अनुभव मात्र मी कल्पनेतच घेतला आहे. नाताळातल्या नाताळबाबाच्या हो हो हो अशा आरोळीचा. आधीच जगाच्या एका थंड टोकाकडून नाताळबाबा रेनडियरच्या गाडीतून आपल्या घरी येणार ही कल्पनाच किती रोमांचक ! त्यात आणखी गंमत म्हणजे तो आपल्यासाठी गिफ़्ट आणणार !मला तर हा लाल डगल्याचा लाल टोपीवाला नाताळबाबा माझ्या आजोबांसारखाच वाटतो. कोकणातून ५ - ६ तासांचा प्रवास करून हे १०० वर्षांचे आजोबा जेव्हा टांग्यातून आमच्या दारात उतरत, तेव्हा त्यांचे मुळचे धुवट पांढरे कपडेही कोकणचा लाल मातीने लालेलाल झालेले असत. कारण ५०, ६० वर्षांपूर्वी कोकणात कुठली आली आहे डांबरी सडक ? पण त्यांना बघून त्यांचं सामान घ्यायला आम्ही पुढे धावलो की त्यांच्या चेहयावरही तसंच प्रेमळ हसू असे. आणि मग हात पाय धुतल्यावर ट्रंकेतू्न फ़णसपोळी, खाजं, साटं असं काही आमच्या हातावर ठेवताना त्यांचे डोळे चाळशीमागून मिष्कीलपणे लुकलुक त.किती नाद, किती स्वर आपण मनात साठवून ठेवलेले असतात ते आपल्यालाच माहीत नसतं. कधीतरी तार झंकारते आणि आनंदाची वलयं उठतात, आपल्याला वास्तवापासून दूर नेतात .... परत वास्तवात आनंदाने परतण्यासाठी !
draft

6 comments:

Gayatri said...

किती छान लिहिलंयत हो! 'मैत्रिणीच्या चेहऱ्या'ची उपमा, कोल्हापूरची आठवण..आहा!

Sumedha said...

वा! सुरेख!

Nandan said...

wa! chhan zalay lekh. 'आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं' he vaakya aaNi DoMgar-mathyachya vaaTevarachi shantata visheSh aavaDale.

Asawari said...

these associations of certain sounds with memories we treasure is very true. and its not like we remember these small incidents all the time, they are almost forgotten, but when we hear the smallest of sounds which associates our mind with these memories we go right back in the past and relive these happy moments all over again :)

really nice one!!!

संकेत आपटे said...

खूप छान लिहिलं आहे. लेख वाचताना, मी पूर्वी एकदा गावी गेलो होतो, त्यावेळची आठवण झाली. मन पुनः एकदा भूतकाळात गेलं. सुंदर!

Varsha said...

khup chhan lihile aahe. Avadale. kaharch sugandh aani avaz manasala bhutkalat ghevun jatat.
I could relate to your feelings.
varsha