Saturday, January 20, 2007

ज्याच त्याचा बोधिसत्व

राजपुत्र सिध्दार्थ बोधिव्रुक्षाखाली बसला आणि त्याचा भगवान बुध्द झाला. आपण सामान्य माणसं, पण मला वाटतं बोधिव्रुक्ष हे आत्मद्यानाचं प्रतीक मानलं तर आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक बोधी असतो साध्या साध्या घटनांतून तो आपल्याला अशी अनुभूती देतो की एका अनमिक आनंदाने मन भरून येतं.
मी तेव्हा एका संस्थेमध्ये शिकवण्याचं काम करत होते. मे महिन्याची सुट्टी संपून मी रोजच्या वाटेने निघाले. दुतर्फ़ा शेतं असलेल्या वाटेने चालत मी नेहमीच्या वळणावर आले. मनात सुट्तीतल्या गमतीचे विचार होते तसेच भेटणाया सहकायांची ओढही होती. वळण पार करून मी समोर बघितलं, --- वाहनांना पाठीवर घेऊन रस्ता नेहमीच्या वेगाने पळत होता.त्या क्षणी माझं मन एक सेकंद, फ़क्त एक सेकंद अवाक होवून थबकलं, आणि एका अगम्य अनुभूतीनं भरून आलं. रस्ता नेहमीसारखाच धावत होता, मी न येण्याने त्यात काही फ़रक पडला नव्हता. आता ही गोष्ट खरतर क्लेशकारक वाटायला हवी, पण त्या वेळी माझं मन आनंदाने भरून आलं मस्त मजेत मी तो रस्ता पार केला.
दुसरी घटना घडली तेव्हा माझ्या आईला जावून वर्ष झालं होतं. सकाळपासून तिच्या आठवणींनी डोळे ओलावत होते, हुंदके रिचवता रिचवता घसा दुखायला लागला होता. मनाशी येत होतं ,आज मी माहेरी असते तर मोठ्या भावाच्या गळ्यात पडून रडले असते. त्याच्या खांद्याच्या आधाराने मी मला सावरलं असतं. त्याचा हात पाठावरून फ़िरला असता तर ' आई, आई ' असं आक्रंदणाया मनाला दिलासा मिळाला असता
पण त्याच क्षणी मनात एका जाणीवेची धारदार सुरी फ़िरली, " अरे, माझ्यापेक्षा १५, १६ वर्षांनी ते मोठे असले म्हणून काय झालं, त्यांच्याही मनात एक पोरकं मूल आक्रंदत असेलच की !"माझ्या मनातलं वादळ निमाल आणि मी मोठ्या बहिणीच्या मायेनं ,आईच्या आठवणी जागवणारं पत्र लिहायला घेतलं
या सगळ्या घटना १२ १५ वर्षांपूर्वीच्या. आता तर आयुष्याच्या संध्याकाळी असे कितीतरी प्रसंग आठवतात आणि त्यांचा वेगळाच अर्थ दिसू लागतो, पण कोणत्याच प्रसंगातून पश्चात्तापाची भावना येत नाही हे किती भाग्य !

2 comments:

Nandan said...

chhaan lekh, aavaDalaa. manatalaa bodhi kadhi tyache astitva jaaNavoon deil he kharach sangata yet nahi.

Asawari said...

kharach chaan ahe, agadi mala suddha hya war comment karayla shabda suchat nahi ahet :)