Sunday, September 2, 2012

आठवणींच्या फेरफटक्याचं वास्तव

गत काळाच्या स्मरणात गुंगून जाणं प्रत्येकालाच आवडतं. मलाही.त्या आठवणी बालपणीच्या असोत, तरुणपणीच्या किंवा संसाराच्या सुरवातीच्या काळाच्या. कटु आठवणी बहुधा कोणी आठवत बसत नाही. कारण त्या मनाला क्लेशच देतात. अशा आठवणी थोड्या फ़ार प्रमाणात सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण त्या उगाळत बसून आपला आज कटु करु नये याच भान प्रत्येकाला जरी नाही तरी बरेचजणांना असतं. त्यामुळे आठवणींचा फ़ेरफ़टका हा सुखद आठवणींचा असतो असं इथे मानलेलं आहे.

तर हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग.बरेच दिवसांनंतर आम्ही नातेवाईक मंडळी जमलो होतो. त्यामुळे आठवणींना उजाळा देणं हे ओघाने आलंच. किंबहुना अशा आठवणी एकमेकांबरोबर अनुभवण्यासाठीच तर आपल्याला आपल्या माणसांना भेटण्याची ओढ वाटत असते. त्या दिवशीही तसच झालं. रात्र संपली पण बोलायाचे उरले अशी अवस्था झाली. या सगळ्या गप्पात आमच्या हरिगावचा विषय निघणं अपरिहार्यच.( हरिगाव म्हणजे साखर कारखान्याची एक टुमदार वसाहत.२० वर्षांपूर्वी तो कारखाना बंद पडला आणि सगळे पोटासाठी पांगले) मग तिथल्या फ़ळबागा, शांत वातावरण, हाताखाली मुबलक नोकर असल्याने आरामाचं आयुष्य. तिथला जिमखाना, जिमखान्यातले गाण्याचे जलसे, नाटकांच्या तालमी, खेळाच्या स्पर्धा, जेवणावळी, शुध्द हवा. एक ना अनेक.विषयांना तोटा नव्हता. प्रत्येक विषयावर प्रत्येकाकडे आठवणींचा साठा होता. जमलेल्यातल्या कोणाचा जन्म , बालपण हरिगावचं होतं, तर कोणी लग्नानंतर तिथे गेलेलं होतं, पण प्रत्येकाचा चेहरा त्या आठवणींनी उजळून निघाला होता.ही गोष्ट झाली पहिल्या पिढीची. पण त्याचं दुस-या पिढीला काय? " झालं, भेटले एकत्र की घुसले हरिगावात. काय सोनं लागलय त्या हरिगावला कोण जाणे" असं अगदी आंबट चेह-याने मुलांनी आपापल्या आईवडलांना विचारुन हरिगावातून बाहेर काढण्यासाठी एक खेळ शोधून काढला आणि मुलांचा विरस नको म्हणून त्यांच्या आईवडिलांनी "हाय कंबख्त तूने पीही नहीं" असा शायराना शेरा मारुन खेळात भाग घेण्याची तयारी दाखवली. खेळ होता ठराविक वेळात आपल्या आवडीचे पान, फ़ूल, रंग, गाव, सिनेमा वगैरे वगैरे लिहायचं.पहिली पिढी विरुध्द दुसरी पिढी. अक्षर होतं " ". वेळ संपल्यानंतर कागद गोळा केले गेले. प्रत्येक कागदावरची नवं वाचण्याचा कार्यक्रम सुरु झाला. आवडत्या गावाचं नाव वाचायची वेळ आल्यानंतर मुलं एक सुरात ओरडली "हरिगाव".पण वाचणा-याच्या चेह-यावर संभ्रम. कारण पहिल्या पिढीच्या २९ कागदांवर हरिहरेश्वरपासून हरिद्वारपर्यंत नावं होती पण एकाही कागदावर हरिगावचं नाव नव्हतं.

मग प्रश्न पडतो, आपण जे स्मरणरंजनात आकंठ बुडतो ते ढोंग असतं की काय? कारण या सत्य घटनेनंतर मलाही धक्का बसला होताच, पण बराच विचार केल्यावर लक्षात आलं की गत काळातल्या आठवणी अत्तराच्या कुपीसारख्या आपण मनाच्या कप्प्यात ठेवतो हे खरंच असतं पण आजच्या वास्तवानेही आपल्याला स्वत:त सामावून घेतलेलं असतं. अगदी एकरुपतेनं. एकतानतेनं.कालच्या आठवणी आपल्या आजचा आधार असतो ...............आणि आज उद्याचा. म्ह्णून तर हा प्रवाह निर्वेधपणे पुढे चालू रहातो. तुम्हाला काय वाटतं?

No comments: