Saturday, December 24, 2011

एक बालकथा

गोष्ट तशी फार जुनी नाही. अगदी अलिकडची. गेल्या साठ वर्षांपूर्वीची. आटपाट नगरातल्या एका ब्राह्मणाच्या ब्राह्मणीला तीन पुत्रांपाठी एक कन्यारत्न झालं. ते म्हणजे अस्मादिक, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असणारच. माझी आई म्हणायची की, मी जन्मले तेव्हा माझ्या अंगात फारसं रक्त नव्हतं म्हणे. (कोण रे ते खुसू खुसू हसतय?) अगदी कमी वजनाची होते म्हणे मी. अर्थात ती सगळी कसर मी पुढे भरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊन काढली ती गोष्ट वेगळी. पण हे कमी रक्त असण्याचा संबंध तिने माझे केस पांढरे असण्याशी जोडला. आणि लोकांनाही ती तसंच सांगू लागली अर्थात मलाही ते खरं वाटून मीही कोणी माझ्या केसांबद्दल विचारलं तर तसंच सांगू लागले. पण ब-याच वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं की केसांच्याबाबतीत आपण आपल्या वडलांवर गेलो आहोत. म्हणजे असं की साहित्य, कला, क्रीडा यांची आवड, चार लोकात गा असं सांगितलं तर आजूबाजूच्या लोकांना पळापळ करायला लागणार नाही इतपत (आणि इतपतच) गोड गळा या गोष्टी जशा त्यांनी आपल्याला दिल्या तशीच ही भेट आपल्याला दिली आहे. त्यामुळे यात आपला काही दोष नसून ही "वंशपरंपरेने" लाभलेली विरासत आहे समजून मी निश्चिंत झाले. पण आईचं ह्रदय. त्याला कोण समजावणार? आणि तिने मनाची समजूत घातलीच तरी आजूबाजूच्या बायाबापड्या तिला थोड्याच सोडणार? "वैनी, काय तरी उपाय करा बरं का, न्हाय तर पुरीला कायमची घरात ठेवून घ्याची येळ ईल." एक सईबाईला भिववून सोडी. "क्यास पिकल्यात म्हंजी पोरीला डोकं कमीच असनार. दर वरसाला पास झाली तरी घोडं न्हालच म्हनायचं की." "तर वो, त्यात या आजकालच्या पोरी फ्याशनी कराय पायजेत. केसाला त्याल म्हनून लावाय नगं. "असं करुन आईला बिचारीला भंडावून सोडत. मग तीही आपापल्या परीने माझे पांढरे केस झाकायचे प्रयत्न करी. एका बाईने तिला सल्ला दिला की, एका विशिष्ट प्रकारची केरसुणी जाळून त्याची काळीकुट्ट राख (एरवी राख पांढरट असते, पण या जातीच्या केरसुणीची राख काळी व्हायची.) खोबरेल तेलात खलवून डोक्याला लावा. बघा, केस काळे होतात की नाही. आई बिचारी लागली कामाला. बाजारात जाऊन केरसुणी आणून ती जाळली. आणि तिने ते मलम तयार केलं. माझे काळेभोर केस बघून तिच्या चेह-यावर जो अवर्णनीय आनंद पसरला, तो आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. ते मलम लावलं की मला मात्र माझं डोकं संभाळता संभाळता पुरेवाट व्हायची. कारण जरा जरी कोणाचा हात माझ्या डोक्याला लागला तरी तो काळा व्हायचा. अखेर माझ्या आरडा ओरड्याला कंटाळून तिने हा उद्योग बंद केला. कदाचित तिलाही त्यातला फोलपणा जाणवला असावा. मी साधारण नववीत असताना आमच्या घरासमोर एक मालुताई रहात होत्या. त्या एक दिवशी आईला म्हणाल्या, बाजारात एक नवीन औषध आलय. ती पावडर पाण्यात खलवून ब्रशने केसाला लावायची आणि वाळल्यावर केस धुवायचे. थोडक्यात म्हणजे तो एक डाय होता. संजिवनी बुटी सापडल्यावर हनुमानाला व्हावा तसा आनंद आईला झाला. (उपमा चुकली वाटतं, खैर, मतलब समझो) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर हा डाय लावून मी शाळेत गेल्यानंतर खोटं वाटेल, पण खरं सांगते, मला पहायला शाळेतल्या मुली मधल्या सुट्टीत माझ्या वर्गाच्या दारात लोटल्या होत्या. त्यांच्या आश्चर्ययुक्त प्रश्नांना माझं (अर्थात आईने पढवलेलं) उत्तर तयार होतच. "अग, माझ्या आईचे वडील वैद्य आहेत ना, त्यांनी एक औषध शोधून काढलय ते तेल लावल्यामुळे माझे केस असे झाले." माझे आजोबा वैद्य होते आणि पंचक्रोशीत नावजलेले होते हे सत्य होतं पण त्याबरोबरच दुसरं सत्य असं होतं की ते कोकणात रहात असल्याने त्यांच्या "औषधाची" छाननी कोणीही करु शकणार नव्हतं. त्यामुळे लग्न होईपर्यंत मी आरामात "मून अन्ड स्टार" या डायने माझे केस काळे करू लागले.
पुढे मग ’गोदरेज’ माझा कायमचा डाय झाला आणि "वैनी तुमचे केस किती लांबसडक आणि काळेभोर आहेत नाही?" अशा कौतुकालाही मी पात्र ठरले. पण कालान्तराने दर महिन्याच्या महिन्याला या लपंडावाचा कंटाळा येऊ लागला. जवळजवळ पंचवीस वर्षं डाय लावल्यामुळे डोक्याची कातडी नाजुक झाली. सतत खाजू लागली. हे रंगकाम नको वाटू लागलं. पण धीर होत नव्हता. नव-याचा सल्ला घेतला. त्याला बापड्याला तरुण असतानाही केसांच्या रंगांमुळे काही फरक पडत नव्हता. आता तर त्याचं म्हणणं असं होतं की, केस तुझे, तर ते कसे असावे हे ठरवायचा अधिकार फक्त तुझा आहे. बस्स! एक साक्षात्कारच झाला मला. मनाची बंधनं गळून पडली आणि ठरवलं. अभी नहीं और कभी नहीं. ते सहा महिने म्हणजे माझ्या द्रूश्टीने नाही तरी लोकांच्या नजरेने भयंकरच गेले असणार. कारण डोक्यावर वाढून नवे आलेले पांढरे केस, डाय न केल्यामुळे झालेले तांबूस केस आणि नैसर्गिक असलेले काळे केस असे तीन रंग दिसत असल्याने मैत्रिणी कळवळून परत केस काळे करायचा सल्ला द्यायला लागल्या. पण माझा बाणेदारपणा त्यामुळे मुळीच कमी झाला नाही केसाची लांबी एकदम कमी करुन टाकली आणि त्याचं फळ मला सात -आठ महिन्यात मिळालं. सगळं डोकं पांढ-या केसांनी भरुन गेलं. पूर्वी राठ लागणा-या केसांचं रुपान्तर मऊ मऊ कापसात झालं. आणि बघणा-याच्या नजरेत खुषीची दाद मिळू लागली. लहान मुलं केसातून हात फिरवत "आजी तुझे केस किती मऊ आहेत ग," असं लाडिकपणे म्हणतात तेव्हा मी भरुन पावते, आणि माझ्या समवयस्क मैत्रिणी "किती छान दिसतात ग तुझे केस. आम्हाला पण करावेसे वाटतात पण धीर होत नाही." असं म्हणतात तेव्हा मी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटतो. खरोखर आज साठीला आलेल्या आमच्या पिढीला किती तरी बंधनांना निष्कारणच बळी पडावं लागलं. कोण जाड म्हणून, कोणाचं रुप तर कोणाचा रंग त्यांचं बालपण करपवून गेला. प्रत्येक ठिकाणी लोक काय म्हणतील ही भीती. आणि त्या द्डपणामुळे मनात नसतानाही काही गोष्टी रुढी पाळव्या लागत असत. एकदा ती बंधनं तोडली की आनंदच आनंद! आजची पिढी या दडपणाखाली वावरत नाही. मस्तपैकी केस रंगवून घेते आणि वर अभिमानाने सांगते. "आय अ‍म वर्थ इट".

4 comments:

Chaitra said...

Nice! But don't assume that today's generation is confident enough to say I'm worth it! It is saying so because it is governed by the market!

Shubhada said...

Mami but do you remember what one of your grandchild asked you ? :)

Shubhada said...

Mami but do you remember what one of your grandchild asked you ? :)

Shubhada said...

Mami but do you remember what one of your grandchild asked you ? :)