Saturday, January 3, 2015

नाताळ

गोष्ट साधारण १९५९ -६० मधली. तेव्हा मी पाचवीत असेन. शाळेला नाताळची सुट्टी लागायची. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला  सगळ्या शाळाभर एकच विनोद, हल्लीच्या भाषेत पी जे फिरत असायचा. बाई किंवा सर सुट्टीचा अभ्यास द्यायचे आणि बजावून सांगायचे, " सगळा अभ्यास पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण अभ्यास "पुढच्या वर्षी "बघणार आहे मी."  कोणी शिक्षक कविता पाठ करायला सांगायचे. परत तेच डायलॉग  " कविता पाठ करायला वर्ष आहे.पुढच्या वर्षी म्हणून घेणार आहे ". अखेर आम्हालाही त्या "पुढच्या "वर्षीची इतकी सवय व्हायची की शाळा सुटल्यावर निघताना निरोपाचा धपका मैत्रिणीच्या  पाठीत मारताना जरा जास्तच जोरात मारला जायचां आणि आम्हीही एकमेकींना " आता आपली भेट पुढच्या वर्षी" असं हसत हसत सांगायचो .घरी गेल्यावर रात्री झोपताना मी आईला " मी आता पुढच्या वर्षीच उठणार" असं सांगून घाबरवून सोडलं होतं, पण भैय्याने " ए यडे  आज २४ आहे. तू काय १ तारखेपर्यंत झोपणार की  काय? " असं खवचटपणाने ( जो बहिणीशी बोलताना सगळ्याच भावांचा भाव असतो ( अरे अरे, वा वा काय जमलय वाक्य.)  विचारल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला . मग मी नेहमीप्रमाणे " ए आई , भैय्या  बघ की  कसा करतोय " असं ओरडून सूड घेतला होता.
लहानपणी आम्हाला नाताळाची सुट्टी असायची. ख्रिसमसची नाही.कारण मराठी भाषा आणि मराठी शिक्षक. पुढे ८वी ९वीत गेल्यावर त्याच स्पष्टीकरणही बाईच्या  तोंडून ऐकायला मिळालं होतं आणि तेच पुढे कितीतरी वर्षं मनात ठसलं होतं. बाई  म्हणाल्या होत्या , "या सणाला नाताळ म्हणतात कारण  त्या काळात गोरे लोक ताळतंत्र  सोडून वागतात, पण त्यांना कोणी काही म्हणत नाही. पाहिजे तेवढी दारू पिली तरी चालते. कितीही मास खाल्ल तरी चालतं." आणि हे सगळं बाई इतकं वेडवाकडं  तोंड करून सांगायच्या की  कित्येक वर्षं माझ्या डोळ्यासमोर " गोरे" लोक एका हातात दारूचा बुधला आणि दुस-या हातात चघळायला  हाडूक घेऊन रस्त्यावरून चाललेत आणि त्यांना कोणी रागावत नाही असं  चित्र येत असे. त्यात परत बाईनी चोरट्या स्वरात आम्हाला आणखी एक भयंकर सत्य(?) या सणाबद्दल सांगितलं  होतं की  ३१ तारखेला रात्री दिवे घालवतात आणि बरोबर १२ वाजता दिवे आल्यावर कोणीही कोणाचाही मुका घेतला तरी चालतो. हे आम्ही लाजरं हसू  दाबत गो-यामो-या होत ऐकलं होतं आणि त्याचं वेळी ठरवून टाकलं होतं की  काहीही झालं तरी नाताळच्या  वेळी इंग्लंडला जायचं नाही आणि असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. कारण तेव्हा कोणीही तिथल्या गो-यांना रागावत  नाही..येशू ख्रिस्ताची जन्मकथा किंवा  जीवन ,त्याचा उदात्त संदेश फार नंतर कळला पण तेव्हा नाताळ म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण  एवढच माहीत होतं. नाताळबाबाची  पोतडी आणि त्याची मध्यरात्री आपल्या घराला मिळणारी भेट ही  तर समजलेली गोष्ट होती. पण तेव्हाही नाताळबाबा ख्रिश्चनाच्यात असणार आपल्यात कशाला येणार असंच वाटत असे.आणि मोठ्या माणसांना जरी माहिती असायची तरी आपल्याही घरात मोजा टागावा आणि मुलांना त्याची मौज लुटू द्यावी हा विचारही नव्हता. कारण त्यावेळी मुलच कॉलेजला जाईपर्यंत पायात चपला घालत नव्हती तिथे नाताळ बाबासाठी  मोजा कोण कशाला आणतय.? ती गमंत आम्ही आमच्या मुलांसाठी केली आणि परत बालपण अनुभवलं, त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद बघून.!

No comments: