Wednesday, January 24, 2007

काही सूर काही नाद

आवाजाचं, गंधाचं आपल्या स्म्रुतीशी नातं असतं. रोजच्या धावपळीत ते लक्षातही येत नाही, पण असा अचानक एखादा क्षण येतो, त्या आवाजाने मनाची तार झंकारते, आणि वढाय मन कुठल्या कुठे जाऊन पोचतं. त्या दिवशी पडद्याला लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने माझी गत अशीच झाली.त्याचं काय झालं, लेकीकडे गेले होते, सकाळच्या गार वायाने झोप चाळवली. पडदाही थोडा हलला असावा.कारण एक वेगळीच किणकिण कानावर आली. झोपाळलेल्या डोळ्यांनीच समोर बघितलं. पूर्व उजळली होती कानात मघाची किण किण होती, पण कसली ते कळत नव्हतं. परत तोच आवाज आला. हे म्हणजे खूप वर्षांनी शाळेतल्या मैत्रिणीचा फ़ोन यावा आणि तिचा चेहरा धूसरपणे तरळत रहावा तसं झालं. डोळ्यावरची झोप उडवून नीट पाहिलं, सकाळच्या मंद वायाने पडदा हलत होता आणि पडद्याला लावलेले घुंगरू वाजत होते. नेहमीचे छोटे घुंगरू नव्हेत, बैलांच्या गळ्यात असतात तसे भले थोरले पितळेचे घुंगरू. त्या आवाजाने आणि सकाळच्या झुळकीने माझं मन परकया पोरीगत धावत माहेरी, कोल्हापूरला पोचले.कोल्हापूर हे शहर, गूळ, कुस्त्या, फ़ताड्या शिंगांच्या म्हशी, यासाठी जसं प्रसिध्द आहे तसं माझ्या लहानपणी , म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी दारात म्हशी पिळून घेण्याबद्दलही प्रसिध्द होतं. म्हणजे काय तर जवळपासची २-४ घर मिळून एक गवळी ठरवायचे. त्याने एका कोणाच्यातरी दारात म्हैस घेऊन यायचं आणि तिथेच म्हस पिळून दूध काढून द्यायचं. सगळाच संस्थानी खाक्या. तसा आमचा दूधवाला होता मधू आणि त्याची आई ' लक्क्षुंबाई'. दोघांपैकी कोणीतरी एकजण तांबडं फ़ुटता फ़ुटता दारात हजर. 'दोअईध' अशी त्याची आरोळी आली की समोरच्या मालुताई, शेजारच्या अक्का, वरच्या मजल्यावरच्या जाधवमामी आपापली भांडी घेऊन लगबगीनं यायच्या. मधूने म्हस पान्हवायला घेतली की अक्का हमखास म्हणणारच, " मधू, चरवी नीट पालथी करायचं बघ हं का ! नाहीतर तिरकी धरून वाटीभर पाणी घालचील बग." यावर मधूही मिशीला पीळ देत म्हणनार, " काय अक्का, इतकी वर्सं दूध घालायलोय तरी अजून विश्वास इना होय तुमास्नी ? काय एवड्या तेवड्यानं माडी बांदनार हाय काय ?" त्यावर जाधवमामीही त्याला चिडवायच्या, " कुनाला दक्कल माडी बांदतोस का बंगला ते! आमाला वास्तुकाला बोलीव म्हंजी जालं. ' चरवीत धारेचं पहिलं चुळुक वाजलं म्हणेपर्यंत चरवी दुधानं भरून जायची अणि धारोष्ण दूध प्रत्येकीच्या पातेल्यात मापाप्रमाणे ओतलं जायचं.तसं तुम्ही कधी डोंगरमाथ्यावर गेलाय ? गाडी वळणावळणाने वरवर चढता चढता आसमंताशी आपण कणाकणाने एकरूप व्हायला लागतो. गाडी बंद करून आपण जर विसावतो, सभोवार असते नि:शब्द शांतता! अस्पष्टशी कुठेतरी दुसरी गाडी वर चढते असं वाटत असतं, पण बाकी वेढून असते ती फ़क्त निरव शांती. अशा वेळी दूर झा्डीत कोणी एक पक्षी शीळ घालत असतो. शांतता चिरत तो स्वरांचा बाण आपल्या उरात घुसतो, अगदी " काबुलीवाल्याच्या ' ऐ मेरे प्यारे वतन' च्या अरेबिक सुरावटीसारखा.कधी घेतला आहे असा अनुभव ?आणखी एका आवाजाचा अनुभव मात्र मी कल्पनेतच घेतला आहे. नाताळातल्या नाताळबाबाच्या हो हो हो अशा आरोळीचा. आधीच जगाच्या एका थंड टोकाकडून नाताळबाबा रेनडियरच्या गाडीतून आपल्या घरी येणार ही कल्पनाच किती रोमांचक ! त्यात आणखी गंमत म्हणजे तो आपल्यासाठी गिफ़्ट आणणार !मला तर हा लाल डगल्याचा लाल टोपीवाला नाताळबाबा माझ्या आजोबांसारखाच वाटतो. कोकणातून ५ - ६ तासांचा प्रवास करून हे १०० वर्षांचे आजोबा जेव्हा टांग्यातून आमच्या दारात उतरत, तेव्हा त्यांचे मुळचे धुवट पांढरे कपडेही कोकणचा लाल मातीने लालेलाल झालेले असत. कारण ५०, ६० वर्षांपूर्वी कोकणात कुठली आली आहे डांबरी सडक ? पण त्यांना बघून त्यांचं सामान घ्यायला आम्ही पुढे धावलो की त्यांच्या चेहयावरही तसंच प्रेमळ हसू असे. आणि मग हात पाय धुतल्यावर ट्रंकेतू्न फ़णसपोळी, खाजं, साटं असं काही आमच्या हातावर ठेवताना त्यांचे डोळे चाळशीमागून मिष्कीलपणे लुकलुक त.किती नाद, किती स्वर आपण मनात साठवून ठेवलेले असतात ते आपल्यालाच माहीत नसतं. कधीतरी तार झंकारते आणि आनंदाची वलयं उठतात, आपल्याला वास्तवापासून दूर नेतात .... परत वास्तवात आनंदाने परतण्यासाठी !
draft

Sunday, January 21, 2007

शून्यातून शून्याकडे

महाराष्ट्राच्या नकाशात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपासून आठ कि. मी. अंतरावरील हरेगाव हा छोटासा ठिपका. दुष्काळी भागातील कमी पावसावर जगणारी शेतीभाती करून इथला शेतकरी जीव जगवत असतो. अशा या भागात विसाव्या शतकाच्या दुसया दशकाच्या आसपास महाराष्ट्रातला पहिला साखरकारखाना उभा राहिला. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा वापर करून इथे ऊस पिकवण्याची जिद्द काही तरुणांनी मनाशी बाळगली आणि स्थानिक शेतकर्यांना हाताशी धरून त्यांना ऊस लागवडीचे शिक्षण देण्यास सुरवात केली.जावाहून 'पुष्ट उष्ट जावा ' बियाणे आणून ऊस लागवडीला प्रारंभ झाला आणि पाहता पाहता हरेगाव येथे 'बेलापूर कंपनी लिमिटेड ' उभी राहिली. लोकमान्य टिळकांचे भाचे कै. महाजन हे या साखरकारखान्याचे पहिले इस्टेट मनेजर होते. पुण्यातील शेतकी महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. त्यांनी आपले द्यान स्वजनहितार्थ वापरले.छोट्या छोट्या चाळवजा घरात राहून इथला अधिकारी वर्ग शेतकर्याण्ना शेतीचे अद्यावत द्यान देऊ लागला. कारखान्यातील तांत्रिकी माहिती सांगू लागला. कारखान्याने चांगलेच मूळ धरले. जो शेतकरी शेतीवर कशीबशी गुजराण करत होता, त्याला कारखान्यामुळे कामधेनूच दारात आल्यागत झाले.कारखान्यात काम करून कामगार चार पैसे कमवू लागला.१९५४ साली जगप्रसिध्द वास्तुशास्त्रद्य जे. जे. बोधे यांच्या आराखड्यानुसार सुप्रसिध्द शापुरजी पालनजी आणि कंपनीने कारखान्याची दिमाखदार वसाहत उभी केली. एक नंबर बंगला कारखान्याच्या ब्रिटिश मनेजरसाठी असे,. अनेक खोल्या असलेली ही इमारत सभोवार देशी विदेशी फ़ळाफ़ुलांनी बहरलेल्या बगिच्यात एखाद्या गढीप्रमाणे शोभत असे. डायरक्टरचा बंगला, मनेजरचा बंगला व इतर वरिष्ठ अधिकार्यांचे बंगले म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्क्रूष्ट नमुने होते.ए., बी, सी, डी अशा टाइपमध्ये विभागलेल्या या सुबक , रेखीव वसाहतीवर उंच उंच व्रुक्षांनी सावली धरली होती. मध्यभागी जिमखाना होता. त्यामध्ये होणाया टेबल टेनिस, बडमिंटन यांच्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू भाग घेत असत.
draft

Saturday, January 20, 2007

ज्याच त्याचा बोधिसत्व

राजपुत्र सिध्दार्थ बोधिव्रुक्षाखाली बसला आणि त्याचा भगवान बुध्द झाला. आपण सामान्य माणसं, पण मला वाटतं बोधिव्रुक्ष हे आत्मद्यानाचं प्रतीक मानलं तर आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक बोधी असतो साध्या साध्या घटनांतून तो आपल्याला अशी अनुभूती देतो की एका अनमिक आनंदाने मन भरून येतं.
मी तेव्हा एका संस्थेमध्ये शिकवण्याचं काम करत होते. मे महिन्याची सुट्टी संपून मी रोजच्या वाटेने निघाले. दुतर्फ़ा शेतं असलेल्या वाटेने चालत मी नेहमीच्या वळणावर आले. मनात सुट्तीतल्या गमतीचे विचार होते तसेच भेटणाया सहकायांची ओढही होती. वळण पार करून मी समोर बघितलं, --- वाहनांना पाठीवर घेऊन रस्ता नेहमीच्या वेगाने पळत होता.त्या क्षणी माझं मन एक सेकंद, फ़क्त एक सेकंद अवाक होवून थबकलं, आणि एका अगम्य अनुभूतीनं भरून आलं. रस्ता नेहमीसारखाच धावत होता, मी न येण्याने त्यात काही फ़रक पडला नव्हता. आता ही गोष्ट खरतर क्लेशकारक वाटायला हवी, पण त्या वेळी माझं मन आनंदाने भरून आलं मस्त मजेत मी तो रस्ता पार केला.
दुसरी घटना घडली तेव्हा माझ्या आईला जावून वर्ष झालं होतं. सकाळपासून तिच्या आठवणींनी डोळे ओलावत होते, हुंदके रिचवता रिचवता घसा दुखायला लागला होता. मनाशी येत होतं ,आज मी माहेरी असते तर मोठ्या भावाच्या गळ्यात पडून रडले असते. त्याच्या खांद्याच्या आधाराने मी मला सावरलं असतं. त्याचा हात पाठावरून फ़िरला असता तर ' आई, आई ' असं आक्रंदणाया मनाला दिलासा मिळाला असता
पण त्याच क्षणी मनात एका जाणीवेची धारदार सुरी फ़िरली, " अरे, माझ्यापेक्षा १५, १६ वर्षांनी ते मोठे असले म्हणून काय झालं, त्यांच्याही मनात एक पोरकं मूल आक्रंदत असेलच की !"माझ्या मनातलं वादळ निमाल आणि मी मोठ्या बहिणीच्या मायेनं ,आईच्या आठवणी जागवणारं पत्र लिहायला घेतलं
या सगळ्या घटना १२ १५ वर्षांपूर्वीच्या. आता तर आयुष्याच्या संध्याकाळी असे कितीतरी प्रसंग आठवतात आणि त्यांचा वेगळाच अर्थ दिसू लागतो, पण कोणत्याच प्रसंगातून पश्चात्तापाची भावना येत नाही हे किती भाग्य !

Monday, January 8, 2007

तप

आज मी रेणू गावस्करांना भेटले. तुळशीबागेजवळच्या पंतांचा गोट म्हणून ओळखल्या जाणाया भागातल्या एका इमारतीत त्या वेश्याच्या मुलांसाठी शाळा चालवतात. एका भागात बालवाडी, दुसया भागात कार्यालय अशी माण्डणी होती. अतिशय साधे कपडे घातलेल्या बायका आपल्या मुलांना नेण्यासाठी आलेल्या होत्या. कुठलाही भपका नसलेलं ते कार्यालय , आजूबाजूचा परिसर पाहून, काहीतरी उदात्त करण्यासाठी आसुसलेलं माझं मन एकदम खचलं. धीर एकवटून मी त्यांना माझ्या येण्याच कारण साम्गितलं. त्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज होती, आणि ते काम करण्याची माझी इच्छा होती. रेणूताईनी या विचाराचं स्वागतच केलं, पण त्यांनी माझा उतरलेला चेहरा, भरून आलेले डोळे बघितले आणि मडक्याच कच्चेपण ओळखलं त्याना दुसर्या भागातही शिक्षकाची गरज होतीच, तेव्हा तिथे मी काम करावं असं त्यानी सुचवलं
बोलण्याच्या ओघात त्या आपले २५ वर्षांचे अनुभव सांगत होत्या. प्रथम तर त्या वेश्या वस्तीतच एखाद्या गोणपाटावर बसून शिकवायच्या.मुलाना सांगायच्या, एवढ्या भागात थुंकू नका म्हणजे मला इथे बसून शिकवता येइल. एखादी बाई आजारी आहे म्हणून तिला औषधपाणी करत रहावं तर काही दिवसातच तिच्या मरणाची बातमी कळायची. किती गोष्टी ऐकताना माझं पांढरपेशी मन फ़ाटत होतं,पण त्या शांतपणे सांगत होत्या. मी हा माझा मूर्खपणा आहे हे जाणवत असतानाही त्याना म्हटलं, केवल सहनुभूती दाखवणं हा यावरचा मार्ग नाही हे मला कळतं पण... त्यावर त्या हसून म्हणाल्या, तोच तुमच्या माझ्यात फ़रक आहे, कुठेही केव्हाही जाण्यात मला संकोच वाटला नाही, कुठलीच गोष्ट करायला मी मागेपुढे पाहिलं नाही. आज माझ्या अनुभवाला आलं की गेल्या २५ वर्षात माझ्या उघड्या पर्स मधून एकदाच२५ रुपये गेले तर ते वस्तीने दुसया दिवशी चोर पकडून परत केले. इथे मला " साखर " आहे म्हणून बिन साखरेचा चहा आवर्जून दिला जातो आणि " आप टीचर हो, तो आपको यहा कुछ नही होगा " हा दिलासाही मिळतो. हा सगळा संवाद मी कदाचित पुस्तकात वाचला असता तर एक सुस्कारा सोडून मी पान उलटल असतं, कदाचित याला एक दर्प आहे असंही वाटल असतं पण आज पोटात ढवळलं, त्या शांत हसया चेहयामागची तपष्चर्या जाणवली आणि आपलं खुजेपणही !