Sunday, February 1, 2015

मुक्काम तामसतीर्थ

खर  तर मला आता यशोधन बाळ  नावाच्या माणसाबद्दल लिहिलच पाहिजे . गेले दोन दिवस या ना त्या प्रसंगात त्याची आठवण येतेय. हे म्हणजे फारच झालं. फक्त दोन दिवसांची त्यांची माझी ओळख. त्यातही सहवास म्हटला तर फार तर सगळा मिळून चार सहा तासांचा. आणि तरीही हा माणूस आठवावा म्हणजे जरा अतीच होतंय. पण काही माणसं असतातच अशी. थोड्या सहवासानेही लक्षात राहणारी
म्हणजे त्याचं असं झालं ,२६ जानेवारी २०१५ हा दिवस नेमका सोमवारी आला. म्हणजे दुग्धशर्करा योग किंवा हल्लीच्या भाषेत म्हणावं तर सोनेपे सुहागां. घरात जर सोमवार ते शुक्रवार दिवसाचे १८ ,-१८ तास राबणारी मुलं असतील आणि त्यांचं मुल जर शाळेत झेंडावंदनाला गेलंच पाहिजे या वयापर्यंत पोचल नसेल तर ते या संधीचा फायदा घेणारच.त्यामुळे आपण सर्वांनी कोकणात जावं  असं मुलांनी ठरवलं आणि आम्ही ८जणं ,अर्रर्रर्र मुख्य माणूस मोजायचं राहिलच, मल्हारसह ( वय वर्ष ५ ) ताम्हिणीमार्गे लाडघरच्या दिशेने कूच करते झालो.
    कोकणाची एक रानभूल आहे. तिथली झाडी , तिथली माती , आणि तिथला सहस्त्रबाहू उभारून मंद्र स्वरात बोलावणारा समुद्र. नारळी पोफळीच हिरवगार गारुड हळूहळू रक्तात पसरायला लागत. मन अगदी आतून आतून शांत शांत व्हायला लागत आणि फेसाळत्या लाटांनी किना-यावर धडका मारणारा समुद्र दिसला की जीवाचा जिवलग सखा भेटल्यागत एक झपूर्झा सुरु होते मनात. प्रथम फक्त पावलं भिजवायची आहेत असं मनाशी ठरवून किना-या किना-याने दबकत चालायला सुरवात करावी तर लाटांच्या लडिवाळपणाने आपल्या पायाखालची वाळू कधी सरकते ते कळतच नाही. फक्त पावलं भिजवणा-या लाटा आपल्या मस्तकावर कधी तुषार उडवायला लागतात तेही उमजत नाही. मग सारा आसमंत विरून जातो. एकापाठोपाठ येणा-या लाटा , क्षितीजापर्यंत पसरलेलं पाणी,आणिक्षितिजापल्याड जाणारं क्षणोक्षणी रंग बदलणारं आणि त्याचं रंगात पाण्यालाही रंगवून टाकणारं सूर्यबिंब. हे सगळं सर्वांगाने आपल्यात साठवून ठेवणारे आपण एक बिंदू. त्या एकतानतेत ऐकू येणारी समुद्राची गाज.
    हे सगळं अनुभवायला आम्ही तामसतीर्थाला ( लाडघर ) पोचलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते. बंगल्याचे  फाटक  उघडून उभे होते बंगल्याचे मालक यशोधन बाळ . शिडशिडीत अंगकाठी, ६ फुटावर उंची प्रथमदर्शनी डोळ्यात भरली. बंगल्याचं नाव होतं " गाज ". आल्या क्षणापासून गृहस्थाने आमचा ताबाच घेतला. तरुतलीच खुर्च्या मांडलेल्या असल्याने क्षणभर विसावा घेऊ असं ठरवणारे आम्ही बराच वेळ तिथेच रेंगाळलो. खोलीतून फ्रेश होऊन खाली आलो तर वाफाळत जेवण आमची वाट बघत होतं. आणि मग होतो तितके दिवस हाच अनुभव आला. रसना आणि क्षुधा तृप्त करणारं साधच पण रुचकर जेवण. ज्याला आपलेपणाचा वास होता. पहिल्या दिवशी आल्या आल्या यशोधन बाळाच बोलणं  ऐकून " अरे देवा , किती बोलतो हां माणूस" असं वाटलं खरं, पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं बोलणं " किती छान बोलतात हे " इथवर कधी येऊन पोचलं  ते कळलंच  नाही. ओळख नसताना माणसं वेगळी भासतात आणि नंतर ती सहवासाने उलगडायला लागली की  वेगळीच वाटतात. माझी सासू म्हणायची " पंक्तीत जेवल्याशिवाय आणि संगतीक रवल्याशिवाय माणसा कळणत नाय ! " यशोधन बाळांच बोलणं, मधूनच स्वत:बद्दल माहिती देणं आल्या आल्या  व्यावसायिकतेचा भाग  वाटला पण जसा जसा सहवास (तुटपुंजा का असेना.) मिळू लागला,तस तसं या माणसाचं " निखळपण " लक्षात यायला लागल. मुळात हा त्यांचा व्यवसाय नाही. मुलं मार्गी लागल्यानंतर आपल्याला आलेली पोकळी भरून काढण्यासाठी अर्पिता बाळांनी शोधलेला हा त्यांचा छंद आहे. आलेल्या अतिथीला खाऊ घालून तृप्त करणं . हे मानसिक समाधान त्यांना लाभावं म्हणून  यशोधन आपल्या सिनेमाच्या शुटीगमधून  वेळ काढून त्यांच्या मदतीला येतात. मग तिथे व्यावसायिकतेला वाव कुठून असणार ?  त्यामुळे  मग आमच्या संध्याकाळच्या   मैफिलीत आपणहून सामील होऊनचित्रपट व्यवसायातले किंवा पत्रकारीतेतले असो , किस्से साभिनय सांगताना त्यांच्या चेह-यावर एक आपुलकीचा भाव असायचा. आणि हे सगळं दुस-याच्या खासागीपाणावर (space ) अतिक्रमण होऊ न देता .त्याचं आपुलकीने त्यांनी सकाळी गरम पाण्याच्या बादल्या जिना चढून खोलीत स्वत: आणून दिल्यां. नाहीतर साधारणपणे अशा ठिकाणी " कामाची बाई आल्यानंतर  चहा आणि आंघोळीच पाणी मिळेल " असं कोरड उत्तर मिळण्याचाच अनुभव आपल्याला असतो. पण इथे म्हणजे घरच्या कार्याला नातेवाईक आलेत आणि त्यांची सरबराई चाललीय हाच भाव. त्यामुळे याशोधनानी स्वत: मासे करून आम्हाला खाऊ घातले आणि खाल्ल्यानंतर कळलं की  ते स्वत: मासे खात नाहीत. आणि याना साथ मिळाली आहे तीही समानधर्मा आहे. अर्पिता बाळानीही आमचे म्हणजे अगदी लाडच केले. एकही पदार्थ परत पानात repeat झाला नाही. घरगुती जेवण , प्रेमाने केलेलं . तेही सर्दीने डोकं जड झालेलं असताना आणि कमरेत उसण  भरलेली असताना.आजच्या व्यावहारिक जगात कदाचित याला वेडेपणा म्हणत असतील, कदाचित कशाला, निश्चितपणे. पण या वेडेपणामुळेच तिथे उतरणारे लोक त्यांचे कुटुंबीय बनतात . अर्पिता बाळाच्या शब्दात " extended family "