Friday, January 16, 2015

शहाणपण देगा देवा

ज्ञान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे विचारवंत येतात. त्यांच्या चेह-याच्या मागे तेजाच वलय वगैरे असतं. आणि आपण आदराने त्यांचं पुण्यस्मरण करतो. त्यांची शिकवण विनित भावाने वाचतो. आचरणात किती आणतो तो भाग वेगळा. पण हे विचारवंत एखाद्या दूरस्थ ता-यासारखे वाटतात मला. त्यांची ती दुर्बोध शब्दातली वचनं  मन उल्हासित करण्याऐवजी मला तरी गोंधळून टाकतात. खर सांगायचं तर मला inferiority complex देतात. कारण लहानणापासून वाचन म्हटलं तर कथा, कादंब-या आणि कविताच. आणि मोठे दोघेही बंधू म्हणजे वाईच्या विश्वकोशात आपापल्या विषयावर लेख लिहिणारे. त्यामुळे घरात कला आणि शास्त्र या दोनही विषयातले ग्रंथ भरलेले असायचे. आणि मी मात्र त्यांच्यावरची धूळ झटकण्याशिवाय  इतर कशासाठीही त्यांना हात लावत नसे. त्यामुळे शास्त्रवाला भाऊ चिडून चिडून मला फटकारायचा. " अशी पुस्तकं म्हणजे बांडगुळ "आहेत. काहीतरी वैचारीक वाच." त्यामुळे मी ती " बांडगुळ " तो समोर नसेल तेव्हा लोळत आणि समोर असेल तेव्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन वाचत असे.
विनोदाचा भाग सोडून देऊ या , पण मला आता वयाच्या ६६व्या वर्षी असं वाटायला लागलाय की ज्ञानाचे दोन प्रकार असतात . एक माहितीचं ज्ञान आणि दुसरं जीवनाचं ज्ञान. ज्याला आपण चातुर्य किवा साध्या भाषेत शहाणपण म्हणतो ते ज्ञान. माहिती तंत्रज्ञान मानवजातीच्या विकासासाठी गरजेचं आहे याबद्दल दुमत असायचं कारण नाही , पण " शहाणपण "मानवजातीच्या मानसिक आरोग्यासाठी जरुरीचं आहे हेही तितकच खरं.
आता हा असा वैचारिक किडा मला का बरं चावला असेल ? त्याला कारण आमच्या यमु आजी. वय वर्ष ८९. एकदम उत्साहाचा झरा. ज्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी दासबोध वाचतील त्याचं तन्मयतेने दोन तीन तास रमीही मांडायला जातील.  बोलण्याची शैली अशी खुमासदार की त्यांच्या आयुष्यातल्या गंभीर प्रसंगांचही  विनोदी नाटुकल्यात रुपांतर व्हावं. तर अशा या यमु आजीचं  वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर  आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी  गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही  लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला  नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा  सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही  दुखवलं नाही. 
आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी  फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ?  घशाशी येणारा आवंढा गिळत  यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची  ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही  नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.
मला माणसं वाचायला आवडतात. त्यांच्या पुस्तकाची पानं मला खूप काही समृध्द करतात. इथेही मला माझं  खुजेपण दिसतं, पण त्याने मी निराश होत नाही.मला inferiority complex  येत नाही.कारण मला माहीत असतं मी मला त्यांच्या पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करू शकते. म्हणून मला ग्रंथात जे सापडत नाही ते  माणसात सापडतं . त्यांचे अनुभव मला अधिकाधिक शहाणं करतात. आणि तसंही अंतिम तत्वापर्यंत   पोचेतो  आपण अधिकाधिक विशुध्द होणं चांगलच ना? 

4 comments:

Aditya Patil said...

जुन्या काळातील समंजस सासूबाईंच्या सुंदर आठवणी! खूपआवडल्या!

इंद्रधनु said...

खूप छान आठवणी आहेत... खरं तर माणसं वाचणे जास्त अवघड आहे...

Shubhada said...

आज त्याही सासुबाइंचा कित्ता गिर्वत आहेत। माझी सून आली की हा समंजसपणा मला दखावता आला तर बर मुलीसाठी पण हवाच

Shubhada said...

आज त्याही सासुबाइंचा कित्ता गिर्वत आहेत। माझी सून आली की हा समंजसपणा मला दखावता आला तर बर मुलीसाठी पण हवाच