Saturday, May 16, 2009

झोपाळा

फ़ार फ़ार वर्षांपासूनचं एक स्वप्न होतं, घराभोवती बाग आणि तिच्या एका कोप-यात झोपाळा। त्यातलं घराभोवती बाग हे स्वप्न साकार झालं पण बागेतला झोपाळा यायला माझ्या वयाची साठ वर्षं उलटावी लागली। ३० जानेवारीच्या संध्याकाळी बागेच्या मोठ्या फ़ाटकाच्या समोरच्या जागेवर झोपाळा उभा राहिला। अगदी मला जसा हवा होता तसाच। दोन माणसं बसू शकतील एवढीच रुंदी, बळकट पण तरीही आटोपशीर दिसणा-या कड्या आणि खांब आणि मुख्य म्हणजे वर कौलारु छप्पर। बसल्यानंतर उजव्या हाताला मधुमालतीचा वेल आणि डाव्या बाजूला बोगनवेलीचा फ़ुलोरा। एक हिरवी खोलीच तयार झाली , घरापासून वेगळी आणि तरीही घराच्या इतक्या जवळ। जिथे बसून घरातून बाहेर पडून घर न्याहाळताही येतं तुकड्या तुकड्याने आणि रमताही येतं एखाद्या तुकड्यात।
लहानपणी घराजवळच्या मैदानात खेळून झाल्यावर सरिताच्या घरातल्या भल्यामोठ्या झोपाळ्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी दाटीदाटीने बसून गाणी गायचो, आणि गाता गाता झोपाळाइतका उंच चढवायचो की अखेर काकू येऊन ओरडायच्या । तीच झोक्याची झिंग हा झोपाळा झुलवतानाही येते। लहानपणी मनात नुसतीच आनम्दाची कारंजी उसळत असतात.... अकारणच! पण आता कधी कधी अकारणच कातर होणा-या मनाला परत प्रवाहात आणण्यासाठी अशा एखाद्या सख्याची, " चौथ्या कम-याची' गरज असते। कोणाला तो देवळात मिळतो कोणाला वाचनात, तर कोणाला मित्रमंडळीच्या गराड्यात । माझा चौथा कमरा मला माझ्या या झोपाळ्यात मिळतो। मुलांच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला तो चार व्यवहाराचे बोल समजावतो, एखादंसुंदर पुस्तक वाचल्यानंतर स्वत:शीच संवाद करताना साथ देतो,चांदण्या नि:शब्द रात्री लपेटून आपल्या सावलीत मुरवून घेतो, मंद वा-यावर सळाळणा-या सांजेला मधुमालतीच्या गंधाने जोजवत राहतो तर सोनसळी सकाळी चैतन्याने न्हाणतो।
आभारी आहे बाळांनो, मनापासून आभारी आहे मी तुमची, माझ्यातल्या मी ला माझीच साथ घ्यायला मदत करण्यासाठी! दूर राहूनही माझाजवळच असण्यासाठी! या झोपाळ्याच्या रुपाने.

Thursday, April 30, 2009

झावळ्या

खिडकीतून दिसणा-या नारळाच्या झावळ्या इतक्या सुंदर दिसत असतील हे मला इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटतय। कारण नारळाच्या झावळांचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं आहे।आमच्या घरासमोर एक घर मुनिश्वरांचं। त्यांनी दारातच नारळाचं झाड लावलेलं होतं। रात्रीच्यावेळी, विशेषत: चांदण्या रात्री त्या झावळ्या अशा काही झळाळून निघायच्या , की वाटायचं म्यानातून निधणा-या तलवारी अशाचतळपत असतील।त्या शांत रात्री वा-यावर डुलणा-या चमकणा-या झावळ्या न्याहाळताना मनात गूढ देशीचे राजपुत्र शस्त्रागारात आपल्या या तलवारी न्यायला कोणत्याही क्षणी येतील असं वाटत रहायचं.
शिरोड्याला, आजोळी गेलं की, सगळीकडे नारळाचीच झाडं। गेल्या गेल्या मामांनी कोणातरी बाबल्याला किंवा पांडग्याला नारळाच्या झाडावर चढवून शहाळी काढवून घेतलेली असत। खास बहिणीच्या, भाचरांच्या स्वागतासाठी। शहाळ्याचं पाणी पिताना आठवत रहायची ती झाडाची उंची आणि इतक्या उंचीवरून डोलणा-या झावळ्या! मग आईशी गजाली करायला पणग्या किंवा जनग्या किंवा नानीबाय यायची , कोणी बागेतलीच झावळी ओढून आणायची आणि सुख - दु:खाच्या देवाण घेवाणीबरोबरच झावळीचे हीर साळून भलेमोठे खराटे तयार व्हायचे.
शिरोड्यालाच ओसरीवर बसलं की बागेत डावीकडे दोन माड गळामिठी घालून बसलेले होते। दिवसभराची कामं आटपून मामा आणि आई बसलेले असत। मिणमिणते कंदील आजूबाजूचा अंधार आणखीनच गडद करत असायचे। वा-याबरोबर ते माडही किंचितसे डोलायचे आणि त्यांचा करकर आवाज माझं बाल- काळीज कातरत जायचा। उंचच उंच माड राक्षसात बदलून जायचे आणि मामांना चेष्टा करायला स्फ़ुरण चढायचं। " इंदू असा काय गो तुजा चेडू, माडाक भिता? मगे रात्री देवचार बघलो तर काय करीत?'' नुसत्या कल्पनेनेच माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं ।पण रात्र सरल्यानंतर तेच माड सकाळी झावळ्या डोलवत उभे असयायचे तेव्हा मात्र एखाद्या खोडकर मुलासारखे वाटायचे।
माझ्या घराच्या दारात बसलं की समोर माडाची झाडंच झाडं आहेत। पुण्यासारख्या शहरात प्रत्येकाने आपल्या बागेत एखाद दुसरं तरी नारळाचं झाड लावलेलंच आहे। त्या झाडांच्या हिरव्यागार झावळ्या दिवसाच्या कोणत्याही वेळी बघितल्या तरी मनाला सोबत करत असतात। सकाळी हातात चहाचा कप घेऊन वर्तमानपत्रात डोकावत असावं, आणि सहज म्हणून समोर नजर टाकावी तर सूर्यकिरणाचं कोवळेपण घेऊन शेजारी खेळणं घेऊन स्वत:तच रमलेल्या छोट्या मुलासारख्या त्या झावळ्या माझ्याही मनात एक कोवळीक पसरून देतात। दुपारच्यावेळी जेवणानंतर बडिशेप चघळत सहज नजर टाकावी तर " काय आवरलं का? माझंपण आत्ताच आटपलं, पण आज कामवाली आली नाही ना, त्यामुळे भांडी घासायचीत'' असं साम्गणा-या शेजीबाईसारख्या त्या झावळ्या मला पुढच्या कामाला बळ देतात। एखाद्या संध्याकाळी कातर झालेल्या मनाला आपल्या नि:शब्द हेलकाव्यातून गोंजारतात। कधीकधी एखादी वाळलेली झावळी खाली कोसळते, आवाज होतो, पण तो ऐकताच जाणवतं की थोड्याच वेळात बाजूच्या झोपडपट्टीतून सावळ्यामामा येऊन तिला उचलून नेईल , रस्त्याच्या कडेला बसून तिची पानं साळेल, त्याचे हात सराईतपणे त्या हिरांचा खराटा करण्यात गुंततील, ... तेवढेच दहा रुपये मिळतील त्याच्या घरच्या मीठ मिरचीला !

Wednesday, March 25, 2009

"त्याची माझी ओळख होऊनही आता ३५पेक्षा जास्त वर्षं उलटली तरीही मला त्याच्या छंदाची सवय होऊ नये याचं मलाच आश्चर्य वाटतं। तसा तो साधा, सरल मार्गी। आपण बरं की आपल्या हातातलं वर्तमानपत्र बरं या विचारसरणीचा। देवाचा कोणतासा भक्त "" मी देव सेवतो, देव प्राशन करतो आणि देवचि पांघरतो '' असं म्हटल्याचं सांगितलं जातं तसा तो कायावाचामनाने वर्तमानपत्रमय झालेला आहे। म्हणजे हे सगळं मी त्याच्या बायकोकडून ऐकलं आहे। नाहीतर त्यांच्या हनीमूनच्या कथा मला माहीत असण्याचं काय कारण? सुचरिता , म्हणजे अर्थातच आपल्या प्रमुख पात्राची अर्धांगी , एकदा करवादून मला सांगत होती, की ताई, आमच्यावेळी असं दोघांनीच बाहेर फ़िरायला जायची पध्दत नव्हती, पण घरच्यानी आम्हाला महाबळेश्वरला पाठावलं हौसेनं। हिंडावं फ़िराव ह्यांच्याहातून गजरा माळून घ्यावा या स्वप्नात मी दंग । तर "हे'' बाजारात गेलं की प्रथम वर्तमानपत्राच्या स्टॊलवर जाऊन थडकायचे। पेपर साग्रसंगीत वाचून झाल्याखेरीज त्यांच्या कानात मी काहीही बोललेलं शिरायचच नाही। मी मात्र त्या चार दिवसातच समजून चुकले की मला " दुसरेपणा''ला दिलय घरच्यांनी। पहिली माझी सवत म्हणजे पेपर आणि त्यातून वेळ मिळाला तर मी।
यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही त्यात थोडं तत्थ्य होतच। कारण आम्हा सगळ्यांची " माहिती खाण'' म्हणजे दिनकरच। टेलिफ़ोनच्या नवनवीन योजना असोत, पाणीपुरवठ्याच्या वेळेतला बदल असो, वीजेच्या लपंडावाची वेळ असो की क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक असो दिनकरने सांगितलं की बाकीचे निर्धास्त। कारण कोणत्याही विषयासंबधीची माहिती असो दिनकरच्या नजरेतून ती सुटणं अशक्य। वर्तमानपत्राच्या नावापासून ते " यांनी येथे यांच्यासाठी छापले;पर्यंत वाचून दिनकर त्यासम्बंधीची माहिती शोधून काढणार आणि सम्बंधिताला ती पोचवणार। मग भले घरातला गेस संपल्याने नंबर लावायचं काम असो, की सोनालीला शाळेत पोचवायचं काम असो ते थांबू शकतं पण वर्तमानपत्रातून हवी असलेली माहिती मिळाल्याखेरीज इतर कामाला हात न लावणा-या दिनकरमध्ये आणि आधी लगीन कोंडाण्याचं '' म्हणणा-या तानाजीत आणि दिनकरमध्ये काहीच फ़रक नसतो। अशा वेळी "श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं, असं कसं वेडं माझ्या नशीबी आलं ' असं म्हणून सुचरिता सुस्कारे टाकते तर ज्याचं काम झालेलं असतो तो इरावती कर्व्यांच्याच सुटकेच्या भावनेने " बरं झालं मी याचा मित्र झाले, बायको नाही झालो'' असे सुस्कारे टाकतो.
एकदा तर दिनकरने हद्द केली होती। ते सांगताना सुचरिताचे डोळे संतापाने भरून आले होते आणि हसून हसून आमचे! म्हणजे झालं काय की, अनंतचं, दिनकरच्या दोन नंबरच्या मुलाचं टॉन्सिल्सचे ऒपरेशन होतं। त्याच्याजवळ बसायला लागेल म्हणून दिनकरने नेहमीपेक्षा जास्तीची दोन तीन वर्तमानपत्र, इंडिया टुडे, सुचरितासाठी " माहेर'' अनंतासाठी चांदोबा वगैरे सगळी जय्यत तयारी केली होती। सकाळी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अनंताने चांदोबा वाचून टाकला आणि त्याची चुळबुळ सुरू झाली। तो आणखी अस्वस्थ होऊ नये म्हणून दिनकरने त्याला इंडिया टुडे चित्रं बघायला दिला। तेवढ्यात नर्स बोलवायला आली, ऑपरेशन थिएटर तयार आहे आणि चला म्हणून, भराभरा सगळं सामान भरून लगबगीने सगळे तिकडे धावले। ओपरेशन व्यवस्थित पार पडलं। बायको डबा आणायला घरी जाणार होती अनंता भानावर आल्यानंतर । दिनकर अनंताजवळ थांबणार होता। तसे दिनकरचे पेपर्स वाचून झाले होते, पण बायको येइपर्यंत त्याला इंडिया टुडेचा आधार होता। सुचरिताने बघितलं की अनंत हालचाल करतोय, आता जायला काही हरकत नाही तोच तिला दिनकरचं खेकसणं कानावर आलं। आता इथे ठेवला होता, एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ। सुचरिता, आधी इंडिया टुडे शोधून दे आणि मग जा।'' सुचरिता आधीच घाईत। ऑपरेशनच्या काळजीने तिने धड स्वयंपाकही केलेला नव्हता। आता चटकन निदान डाळतांदळाची खिचडी टाकून यावं म्हणून ती भरकन निघाली होती तर याचं गुरगुरणं।असेल हो इथेच। नीट बघा असं तिने बराच संयम करून सांगितलं आणि त्याच वेळी दिनकरला आठवलं की इंडिया टुडे अनंताला चित्र बघायला दिला होता। दुस-या क्षणी तो कॉटकडे झेपावला आणि शुद्धी - बेशुध्दीच्या सीमेवर असलेल्या अनंताला विचारू लागला, ; अनंता, बाळा तू इंडिया टुडे कुठे ठेवलास? तो... तो ते.... तुला मी चित्रं बघायला दिला होता तो....' आता अशावेळी सुचरिता जोरात किंचाळली, नर्स पळत आली तिला न जुमानता सुचरिताने पिशवी जमिनीवर पालथी केली आणि जमिनीवर पिशवीतून पडलेला इंडिया टुडे दिनकरच्या हातावर आपटून ती तरातरा चालायला लागली तर यात तिचा काय दोष?
यानंतर पुलाखालून खूप म्हणजे खूपच पाणी वाहून गेलय।मोठ्या सोनलचं लग्न झालय। अनंता आता अमेरिकेत असतो।दिनकरने इकडे यावं आणि आपलं वैभव पहावं असं त्याला फ़ार वाटतं पण दिनकर त्याला तयार नाही। कारण तिथे मराठी वर्तमानपत्रं नाहीत आणि इंटरनेटवर बातम्या वाचण्यात दिनकरला मजा वाटत नाही। शेवटी कंटाळून सुचरिता एकटीच लेकाबरोबरनिघाली। ती येईपर्यंत दिनकर सोनलकडे राहणार होता। त्याला सोडून निघताना नाही म्हटलं तरी सुचरिताचं मन भरून आलं आपण लेकाच्या आग्रहाला बळी पडून निघालो हे चुकलं की काय अस ही तिच्या मनात आलं। पाणावल्या डोळ्यांनी दिनकरचानिरोप घेताना तिचे कान आसुसले होते, दिनकरचे शब्द ऐकायला, " लवकर ये हं मी वाट पाहतो। ' आणि दिनकर तसं म्हणालाही, पण पुढच्याच वाक्याने सुचरिताला जमिनीवर आणलं, " .... आणि येताना कोणताही एक पेपर घेऊन ये तिकडचा। बघू तरी एवढा मोठा असतो म्हणतात तर काय असतं तरी काय त्याच्यात ते।''

Friday, October 3, 2008

नवरात्र

पितरपाठ सरता सरता आमच्या शाळेत स्टाफरुमच्या शेजारच्या जिन्याखालच्या खोलीची साफसफाई सुरु होई आणि आम्हाला शाळेतल्या शारदोत्सवाचे वेध लागत. घटस्थापनेच्या दिवशी छान नटून थटून शाळेत जावं तर समोरच्या दृश्यानं मन प्रसन्न होई. शाळेच्या प्रवेशदाराजवळ हिरवेगार रसरशीत केळीचे खुंट बांधलेले असत. प्रवेशदाराच्याचजवळच्या व्हरांड्यात सनई - चौघडावाले येऊन सज्ज असत. संपूर्ण ग्राऊंड पाणी मारून, रांगोळी घालून सजलेले असे. सगळं वातावरणच मंगलमय, आल्हाददायक असे. शाळेच्या मुख्याध्यापिका शारदादेवीची पूजा करत, आरती होई. बाई शारदेची, पर्यायाने विद्येची उपासना कशी करावी हे कळकळीने सांगत. मग खिरापत घेऊन आपापल्या वर्गात जाण्याऐवजी आम्ही रांगेने आमच्या चित्रकलेच्या वर्गात जमत असू. (हा वर्ग खूपच मोठा असल्यामुळे आमच्या शाळेचे सगळे कार्यक्रम इथेच होत असत.) जेरेशास्त्र्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी! वर्षानुवर्षे शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत जेरेशास्त्र्यांचं प्रवचन असे. समोर बसलेल्या मुलींना समजेल अशा सोप्या रीतीनं जेरेशास्त्री प्रवचन करीत. लहानपणी त्यांची धीरगंभीर, तेज:पुंज मूर्ती मनात इतकी ठसली होती की, पुढे कित्येक वर्षं गोष्टीच्या पुस्तकात "विद्वान ब्राह्मण" असा उल्लेख आला की, माझ्या डोळ्यासमोर हमखास जेरेशास्त्र्यांची मूर्ती येत असे. दुस-या दिवसापासून नवरात्रीचे दिवस क्रीडा, भाषण, गायन, नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांनी गजबजून जाई.
कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईचं नवरात्र सुरु होई. अंबाबाईची रोज षोडषोपचारे विविध प्रकारची पूजा बांधली जाई. आजही बांधली जाते. या पूजेने सजलेली, विलक्षण तेजाने उजळून निघालेली देवीची मूर्ती पाहण्यासाठी देवालयाचा परिसर गजबजून जाई. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून बायाबापड्या दर्शनाला येत. मंदिराच्या परिसरातच एकमेकींना हळदीकुंकू लावत. नवीन लग्न झालेल्या पोरीबाळींची चेष्टा मस्करी करत. घरच्या धन्याला, लेकराबाळांना उदंड आयुष्याचं दान आईकडे मागत. आंबाबाईची मूर्ती डोळ्यात साठावत माघारी परतत. जाणकार लोक देवी जिथे प्रगट झाली त्या स्वयंभू स्थानाचं दर्शन घेतल्याशिवाय रहात नसत. रात्री अंबाबाईसमोर नामवंत गायक, वादक आपली "सेवा" रुजू करत आणि करवीरवासी रसिक त्यात न्हाऊन चिंब होत.
पाचव्या माळेला म्हणजे ललितापंचमीला त्र्यंबुली यात्रा किंवा टेंबलाबाईची जत्रा असे. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी. बहिणीच त्या, भांडल्या एके दिवशी कशावरून तरी. टेंबलाई रुसली आणि गावाबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. काही दिवसांच्या अबोल्यानंतर अंबाबाईला चैन पडेना. ती निघाली बहिणीची समजूत काढायला. ललितापंचमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी वाजत गाजत टेंबलाईच्या टेकडीवर जाते. दुपारी बारा वाजता टेंबलाईच्या देवळाच्या प्रांगणात दोघी बहिणी भेटतात. त्यावेळी कोहळा फ़ोडला जातो. त्याचा एखादातरी तुकडा मिळावा यासाठी भाविकांची झुंबड उडते.
राजघराण्याच्या खाजगी भवानीमाता मंदिरात हे नवरात्र सुरु होतं. भवानीमाता शिवछत्रपतींचं कुलदैवत. त्यांच्या वंशजांची एक गादी कोल्हापुरात असल्यामुळे या नवरात्राला एक वेगळच खानदानी क्षात्रतेजाचं वलय आहे. इथेही गर्दी असते; पण अंबाबाईच्या देवळाच्या मानाने कमी. देवळामधली राजगादी, शाहूमहाराजांचा भव्य पुतळा, त्यांनी मारलेला आणि पेंढा भरून ठेवलेला गवा रेडा या सगळ्यामुळे मंदिरात एक अदबशीर शांतता असे. या देवीलाही रोज वेगवेगळ्या प्रकारे सजवले जाई. दरबारी गायक, वादक देवीपुढे सेवा रुजू करत. देवळात आलेल्या बायाबापड्या देवीनंतर महाराजांच्या गादीपुढे, शाहूमहाराजांच्या पुतळ्यापुढेमाथा टेकतच; पण या लोकांच्या राजाने प्रजेच्या मनात इतकं आदराचं स्थान मिळवलं होतं की, त्याने मारलेल्या गव्याचीही हळदीकुंकवाने त्या पूजा करीत. ही रणरागिणी भवानीमाता क्षत्रियांचं दैवत असल्यामुळे नऊ दिवस देवीपुढच्या चौकात तलवारीच्या एका फटक्यात बकरं मारलं जाई.
या मोठ्या उत्सवाबरोबरच आणखी एक उत्सव सुरु होई तो आम्हा मुलींचा. कोल्हापुरी भाषेत हादगा म्हणजे भोंडला. मुलगी साधारण पाच वर्षांची झाली की हादगा मांडला जाई तो ती सोळा वर्षांची होईपर्यंत. म्हणजे हादगा हा सण कुमारिकांचा मानला जाई. हस्त नक्षत्र लागले की याची सुरवात होई आणि नक्षत्र संपले की हा बोळवला जाई. म्हणजे हादगा १५ दिवस आणि १६व्या दिवशी बोळवण! हादग्याचा एक कागद मिळे. त्यावर एकमेकांसमोर तोंड करून सोंडेची कमान करून हत्ती असत. वर अंबारी सजलेली असे. बाजूला मुली फ़ुगडी घालत असलेल्या, बायका नटून थटून पूजेला चाललेल्या असत. हा कागद घटस्थापनेच्या दिवशी घरातल्या भिंतीवर चिकटवला जाई. त्याला चुरमु-याची, भिजवलेल्या शेंगदाण्यांची, गव्हाच्या ओंब्यांची, फुलांची आणि मुख्य म्हणजे सोळा प्रकारच्या फळांची माळ घातली जाई. आमच्या लहानपणी ब-याचशा घरांना भल्या मोठ्या बागा असत आणि त्या फळाफुलांने बहरलेल्या असत. मग घटस्थापनेच्या आदल्या दिवशी, शाळा सुटल्यावर सगळ्यांच्या बागा धुंडाळायचा एक कार्यक्रमच असे. जास्तीजास्त फळं मिळवण्यासाठी आमचा आटापिटा चाले. कुठे घरातल्या काकींना "पटवून" तर कुठे कुंपणाची तार वर करून गुपचुपबागेत शिरून तर कुठे "माझ्यातला एक पेरू तुला देते, तुझ्याकडचं एक केळं मला देतीस काय?'' अशा गंभीर वाटाघाटी करून फळं जमवली जात. या सगळ्या माळांनी सजलेला कागद भिंतीवर चिकटला की धन्य धन्य होई. मग सोळा दिवस पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याभोवती फ़ेर धरून नाचताना, लोकगीतातून साकारलेली या मातीची गाणी, या मातीतली गाणी गाताना मन झपूर्झा घेत रोज वेगळी खिरापत आणि तिची संख्याही चढत्या भाजणीने. रोज नवी गाणी आणि एकेक वाढत जात असलं तरी सुरवात मात्र "ऐलमा पैलमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा'' अशी गणेशाला साकडं घालूनच होई. आता विचार करताना वाटतं की, आपल्या या शेतीप्रधान देशातला हा सृजनाचाच एक उत्सव असावा. सोळाव्या दिवशी हादगा बोळवायचा असल्याने त्या दिवशी तर साखरखोब-यापासून लाडूकरंजीपर्यंत सर्व प्रकारची खिरापत तर असेच पण साटो-या- कोल्हापुरी भाषेत सारनो-या, खांडवी/खांतोळी, वाटली डाळ/मोकळं तिखट, आणि मटकी उसळ यांचा समावेश असावाच लागे. एवढे सगळे पदार्थ असल्यामुळे प्रत्येकीचा हादगा वेगवेगळ्या दिवशी बोळवला जाई. मात्र हादग्याला दिवाळीचे दिवे दिसता कामा नये असा अलिखित दंडक असे "नाहीतर आंधळं व्हायला हुतय बाई'' याभितीनं भराभर हादगा बोळवण्यासाठी मुली आपापल्या आयांच्यामागे लागत. आता लक्षात येत ते हे की, पूर्वी सगळे फराळाचे प्रकार घरीच आणि मुबलक प्रमाणात करायचे असल्यामुळे त्या गडबडीत हादग्याचं प्रकरण नको म्हणून कुणीतरी हे आंधळेपणाचं पिल्लू सोडलेलं असावं.
हादगा संपला की चार दिवस हुरहूर वाटे पण लहान वयात दिवाळीच्या किल्ल्याचं, रांगोळीचं, फराळचं आणि मुख्य म्हणजे सटीसामाशी मिळणा-या नव्या कपड्यांचं आकर्षण त्यावर मात करी आणि आम्ही दिवाळीचे बेत करण्यात रंगून जात असू.
आजही नवरात्र असंच साजरं होत असत. काही किरकोळ फ़रक झालेही असतील, कारण कोल्हापूर सोडूनही ३५ वर्षं झाली. पण मला खात्री आहे आजच्या मुलींनाही हे उत्सव तितकेच आपले वाटत असतील. कारण वरचं आवरण बदललं तरी आतला गाभा भारतीय मनाचा आहे, तसाच लख्ख आणि निखळ!

Monday, September 1, 2008

कल्पित आणि सत्य

रोज सकाळी ६.२० पर्यंत आम्ही दोघे फ़िरण्यासाठी घराबाहेर पडतो. ठराविक मार्गानेच फिरायला जातो. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खोदकामामुळे रस्ता बदलावा लागला तरच दुसरा रस्ता पकडतो. अन्यथा आखीव रेखीव कॉलनीतून बाहेर पडून पुढच्या महामार्गावरच्या रहदारीवर एक डोळा ठवून चालण्याची कसरत आता आम्हाला जमू आणि आवडूही लागली आहे.
पूर्वी आमच्या कॉलनीच्या एका बाजूला सडक आणि दुस-या बाजूला शेतांचे लहान - मोठे तुकडे पसरलेले होते. आम्ही त्या शेतांमधून जाणा-या रस्त्यावरून फिरणं पसंत करत असू. आमच्याप्रमाणेच त्या रस्त्यावरून फिरण्यासाठी लोक मुद्दामहून यायचे, अगदी महामार्गाच्या पलिकडच्या कॉलनीतूनही. झाडांच्या सळसळत्या फांद्यांखालून जाताना, कधी काळ्याभोर शेतात स-या पाडलेल्या पाहताना, कधी वितभर रोपट्यांमधून खुरपणी - भांगलणी चाललेली पाहतानातर कधी एखाद्या शेतामधून उसाचे तुरे डोलताना पाहताना पन्नास पावलांपलिकडचा कर्णकटू आवाजांचा धबधबा विसरायला होतो म्हणायचे. सकाळच्या रामप्रहरी इथून जाताना त्यांच्या मनाच्या गाभ्यात एक हिरवा चाफा उमलायचा त्याचा सुगंध त्यांना दिवसभर प्रसन्न ठेवायचा.
कालान्तराने शरीराने शहरात पण मनात आपलं " गाव " जपणा-या त्या माणसाचा एकछत्री अंमल संपला आणि वावराच्या प्रत्येक तुकड्याभोवती तारेचं कुंपण आलं. नव्या पिढीचं काळ्या आईत काही आतडं गुंतलं नव्हतं, त्यामुळे पटापट त्या जागांवर वेगवेगळ्या सोसायट्यांचे फलक लागले. कदाचित आमच्या सोसायटीचा जन्मही असाच झाला असावा. काळाची ती गरज होती. त्याप्रमाणे सर्व घडत होतं.
हळूहळू एकेका वावरातली काळीभोर माती सिमेंटखाली झाकली जाऊ लागली. खडी, सिमेंट यांच्या ढिगांनी, कॉंक्रीट मिक्सरच्या घरघराटाने कॉंक्रीटची घमेली एका हातातून दुस-या हातात आणि तिथून पुढे तिस-या चौथ्या, पाचव्या आणि वरवर जाणा-या पुढच्यांच्या हातात जाताना उठणा-या आरोळ्यांनी, होणा-या ओरड्याने , शांत बेटासारखं आपलं अस्तित्व टिकवून धरणारा आमचा भाग मुख्य महामार्गाशी अलगद जोडला गेला. हे होत असताना छोट्या छोट्या बंगल्यांपासून थोडं हात राखून का होईना पण तुरळक झोपड्या उभ्या राहिल्या. अनिवार्यपणे .. या झोपड्यांतले आईवडील समोरच चाललेल्या बांधकामात गुंतलेले असत, देवानं पदरी दिलेलं दान देवाच्याच भरवंशावर सोडून. रोज सकाळी फिरायला जाताना त्या कच्च्याबच्च्यातली कोणी गोधडीत गुरफटून झोपलेली दिसत तर कोणी आपल्या अम्माच्या मागे मागे लुडबुडताना दिसत.
त्या दिवशीही नेहमीची रपेट आटोपून येत असताना रस्त्याच्या कडेला, फूटपाथला टेकून एक स्कूटर दिसली. स्कूटरस्वार एक पाय फूटपाथवर आणि दुसरा रस्त्यावर टेकवून पुढे झुकला होता आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन - चार वर्षांच्या मुलीचे गालगुच्चे घेत होता. मुलीच्या डोक्याचं शिप्तर, अंगावरचा फाटका, मळकट फ्रॉक बघून ती जवळच्या झोपडीतली असणार हे कळत होतं. मुलगी बाळसेदार आणि लोभस होती. एखाद्या ब-या घरात जन्मली असती तर "सोनुली" "छकुली" "साजिरी" म्हणून मिरवली असती.
"चढ पटकन" असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच मुलगी टुणकन उडी मारून स्कूटरवर चढली आणि हँडलवर हात ठेवून उभी राहिली. "हं , दाब " असं त्या स्कूटरस्वाराने म्हणताच तिने बटन दाबलं आणि पीप, पीप चा आवाज ऐकताच खुषीने मान डोलावत हसली. दुस-या क्षणाला स्कूटरस्वाराने स्कूटरला वेग दिला. सगळा दोन मिनिटांचा मामला. एक नजर त्या जोडीकडे टाकून मी पुढे सरकले. आणि स्कूटरस्वाराचं चित्र मेंदूवर उमटल्याने दचकून थबकले. चुरगळलेले कपडे, टापसलेला चेहरा, त्यावर दाढीमिशांचं जंगल. पाऊल पुढे टाकवेना. डोळ्यापुढे भीषण चित्रं यायला लागली. आणि त्या पोरीचा निष्पाप चेहरा. काहीच न सुचून मी नव-याकडे पाहिलं. त्याचाही चेहरा गंभीर दिसत होता. अरे देवा, म्हणजे मला जे वाटतय तेच त्यालाही वाटातय की काय ? आता मात्र मला धीर धरवेना.
त्या मुलीच्या आईच्या बेपर्वा वागण्याबद्दल तिला झापावं म्हणून मी वळले तर नव-याने हाताला धरून अडवलं आणि लांबवर बोट दाखवून म्हणाला, "तो बघ आला.'' तो स्कूटरस्वार दिसताच डोक्यावरचं मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. सैलावलेल्या मनाने तिकडे पहात राहिले. नवराही तणावरहित आवाजात म्हणाला, "बरं झालं आला ते. मी तेवढ्यात स्कूटरचा नंबरही बघून घेतला होता.'' एवढं होईतो स्कूटर जवळ आली. मुलगी उतरली आणि त्याचवेळी झोपडीच्या बाजूने एक दीडेक वर्षाचं पोर, अंगात फक्त सदरा आणि कमरेला करदोटा अडकवलेलं, मातीच्या ढेकळातून वाट काढत हात उभारून स्कूटरकडे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो स्कूटरस्वार त्याच्याकडे पाहून हसत होता.
" हुश्श! " म्हणून चालायला लागतानाच एक विचार मनात विजेसारखा घुसला. कुठून कुठे आलो आपण. काळ्या मातीबरोबरच बापाचं वात्सल्यही सिमेंटखाली गाडलं आपण !

Thursday, July 10, 2008

मन

कधी कधी मन सैरभैर होतं आणि काहीही करायला नकार देतं. मग अशा वेळी काय करायचं? मनाला मोकळं सोडून द्यायचं. त्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्यायचं. मग ते उधळतं कधी लहानपणाचे धागे उसवत तर कधी एकदम शेवटाचे पाश कवटाळू पहात. मन असं का करतं? कोण जाणे ! आता या क्षणी काहीही करायचं नाही आहे मला ....... असं म्हणता म्हणता मागच्या आठवड्यातला एक समारंभ नजरेसमोर येतोय. कदाचित सांगता सांगता मन जाग्यावर येईल.
कोल्हापूरजवळ सादळेमादळेनजिक "निसर्ग " म्हणून एक ठिकाण आहे. डोंगराच्या कुशीत वसवलेलं. हिरव्यागार वनराजीनं वेढलेलं. शुध्द हवेचं. रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असलेलं. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवायला कंटाळला असाल तर मस्तपैकी बैलगाडीत बसून जेवा ना! म्हणजे बैठक घोंगडं अंथरलेली आणि पाठ टेकायला दोन्ही बाजूला बैलगाडीची चाकं टेकवलेली. जेवण मस्तपैकी गावरान ( अर्थात "दोन्ही" प्रकारचं) एका भिंतीवर पितळेचा सगळा जुन्या पध्दतीचा संसार मांडलेला ( जो रात्री पोत्यात भरून ठेवला जातो) आणि भिंतीवर खाली घरकामात रंगलेल्या बायका रंगवलेल्या .. कुणी दळतेय तर कुणी भाकरी थापतेय. रोजच्या कुकरच्या शिटीपासून आणि फ्रिजच्या भाजीपासून दूर घेऊन जाणारं वातावरण ताजतवानं करतं आपल्याला!
आता थोडे कामाचे विचार येऊ लागलेत मनात. पण इतक्यात नाही उठायचं . अजून थोड्या गप्पा. कोल्हापूरपासून २० - २५ मिनिटांच्या अंतरावर काडसिध्देश्वराचा मठ आहे, कण्हेरी या ठिकाणी. या ठिकाणी एक खेडं वसवलं आहे मठाच्या वतीने . पण या खेड्यात माणसं रहात नाहीत, राहतात पुतळे, आणि ते घडवणारे कर्नाटकातले कारागीर, ज्यांनी शिल्पकलेचा ५ वर्षाचा अभ्यास केला आहे. एका वेसवजा कमानीतून २५ रुपयांचं तिकीट काढून तुम्ही आत शिरता आणि छोट्या छोट्या घरांच्या खेड्यातच प्रवेश करता. खेडं खोलगटात वसलेलं आहे आणि त्याची रचना पूर्वीच्या खेड्याप्रमाणे केली आहे. बारा बलुतेदार आपापल्या घरात बसून आपापले व्यवसाय करताहेत आणि हे पुतळे आहेत याची पूर्वकल्पना असूनही आपण दरवेळी एखाद्या पुतळ्याला माणूस समजून फ़सतो. इथे आपल्याला गवंडी, सुतार, लोहार, चांभार, सोनार, तेली बुरुड, कोरवी, नालबंद, न्हावी, कासार, कोळी, शिंपी, तराळ भेटतातच पण वतनदार, वैद्य, पंचांग सांगणारा ब्राह्मण चावडीवर वाद मिटवणारे पंच, कीर्तन करणारे प्रवचनकार इतकंच नव्हे तर जीव तोडून भुंकणारी कुत्रीही भेटतात. पाटावर शेवया कराणा-या बायका दिसतात तशी गोधडी शिवणारी आजीही दिसते. बैलगाडीत बसून सासरी चाललेल्या मुलीचे अश्रू पुसायला आपले हात पुढे होतात आणि त्याच वेळी तिच्या गाडीमागून खांद्यावर सामानाचं गाठोडं घेऊन निघालेला बाप आणि घराच्या अंगणातून निरोप देणारी आई बघून घशाशी आलेला आवंढा परतवायला त्रास होतो. प्रत्येक पुतळा म्हणजे मूर्तीमंत शिल्प. कासारणीकडे बांगड्या भरणारी लेकुरवाळी बाळाला पाजतेय तर बाळ हात लांब करून तिच्या मंगळसूत्राशी खेळतय. तिच्या पायातली साखळी जमिनीवर लोळतेय. दागदागिने, पेहराव, चेहरे घरातलं सामानसुमान, ते ठेवण्याची पद्धत यांचा इतका बारकाईने विचार केला आहे की "वा! सुंदर! अप्रतीम!" याशिवाय आपण काही बोलूच शकत नाही.
खेड्यापासून थोडं लांब शेतं आहेत. मधल्या पायवाटेनं गेलं की सुरवातीला पाणवठा, पुढे कुरणात गाई, म्हशी, बक-या चरत आहेत तर डाव्या बाजूला एका शेतात नांगरणी चालली आहे तर दुस-या शेतात कुळवणी चालली आहे. कुठे शेतकरीदादा मोटेनं शेताला पाणी पाजतोय तर कुठे खळ्यावर मळणी, उफणणीची धामधूम चालली आहे. हे सगळं इतकं खरं आणि वास्तव की म्हशीच्या डोक्यावरच्या कावळ्यासकट आणि पाठीवरच्या पोरासह, शेताच्या बांधावरच्या म्हातारबाबासह प्रत्येक शिल्प आपली दाद घेऊन जातं. म्हणजे पुतळे बघून त्यांना लाला म्हणायचं की गनपा, मालक म्हणायचं की हनम्या हे आपण समजू शकतो. एकदा तरी ह्या खेड्याला भेट द्यावी आणि परत आलं की आपल्या माणसांना घेऊन परत जायचं अशी खूण मनाशी बांधावी असं वाटायला लावलेलं हे खेडं!
मन म्हटल्यावर ल क्षात आलं की खरचं मनाला कधी कधी असं स्वैर सोडून दिल्यावरच ते ताळ्यावर येतं. म्हणून म्हटलं कधी कधी मन तुमचं ऐकेनासं झालं की त्याला खेचू नका, असंच मोकळं सोडून द्या, भटकू दे त्याला हवं तसं थोड्या वेळानं आपोआपच ते परत येतं आपल्या जागी. कानात वारं शिरल्यावर हुंदडून परत आईला ढुसण्या देणा-या वासरागत!

Wednesday, September 5, 2007

बोरिस जोशी

अखेर शेवटी काल बोरिस जोशीच्या नावाआधी कै लागलं. ते लागणार हे गेले २ महिने दिसतच होतं. ह्ळू हळू ज्या पध्द्तीने त्याची तब्येत ढसळत होती ते पाह्ता हे घडणार हे सगळेजणच समजून होते. नाही तर त्या आधी सकाळ संध्याकाळ तो फ़िरायला जायचा. म्हणजे कोंणी ना कोणी त्याला घेऊनच जायचं त्यामुळे त्याचाही नाईलाज व्हायचा. नपेक्षा शक्य तो जागा न सोडावी हा त्याचा मानस असायचा. फ़िरायला जातानाही त्याची शान बघून घ्यावी. हा म्हणजे मागच्या जन्मी कोणी बडा सरकारी अधिकारी असल्यासारखा इकडे तिकडे ढुंकूनही बघणार नाही. आपण मारे" काय बोरुनाना, फ़िरायला चालला वाटतं " असं मोठ्या प्रेमानं विचारावं तर रावसाहेब दुसरीकडेच बघणार." मेल्या, आता घरातली माणसं बाहेर गेली की हाक मार, मग साम्गते तुला" असं चिडून म्हणावं की नाईलाजाने नजर टाकल्यासारखं करणार. पण एकंदरीत अविर्भाव उपकार केल्याचा.
बारा वर्षांपूर्वी एके दिवशी समोरच्या जोशांच्याकडे जेव्हा एक कापसाचं बंडल चार पायावर दुडदुडायला लागलं तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांनीच तिकडे धाव घेतली. विशेषत: शाळकरी निकेतने पळता पळता पुढे जाणार्‍या बाबांकडे जो कटाक्ष टाकला होता तो स्वच्छ वाचता येत होता, " आपण पाळू या म्हटलं तर नको म्हणतात आणि आता कशाला पळताहेत ?" त्या पिलाभोवती भोवती करताना सुरवातीला कितीदातरी शाळेची वेळ टळून जात असे. कारण निकेत , निनादला त्याला अगदी 'पोलिसी कुत्रा ' करायचं असायचं. त्यामुळे त्यांनी त्याच्या " शिक्षणाची "सगळी जबाबदारी शिरावर घेतलेली असायची.बोरुही फ़ेकलेला चेंडू आणणं जोरात पळणं या सगळ्या कसरतीत बालसुलभ उत्साहाने भाग घ्यायचा. कधी कधी तर मोहनने पळवत तळजाईवर नेलं तर चक्क पळत जायचा. [ अर्थात तळजाईवर जाईपर्यंत तो स्कूटरवर बसायचा हे उघडच आहे] कालांतराने बोरिसचं वेळापत्रक संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी शुभदावर आली आणि ती एक ओघाने येणारी गोष्ट झाली ते वेगळं. त्यामुळे त्याला शिस्त लावताना बोरिसने शुभदाचे किती फ़टके खाल्ले असतील ते बोरिसच जाणे ! पण त्या फ़टक्यांचा धाक अखेरपर्यंत होता. शेवटी शेवटी एक गावठी कुत्रं बोरिसच्या दारावरून चालालं होतं , चक्क मान वर करून. किंचित किलकिलं रहिलेल्या दारातून बोरिसनं ते बघितलं, " बूढा हुवा तो क्या हुवा, शेर कभी घास नहीं खाता " या अविर्भावत तो लंगडतच त्याच्यावर चाल करून गेला आणि ' आई ' मारणार म्हणून दारातच दबून उभा राहिला. अर्थात आजारी असल्यामुळे शिक्षा झाली नाही तो भाग वेगळा. आजी आणि दादांनी केवळ नातवंडांच्या प्रेमाखातरच त्या ' राक्षसा'ला घरात घ्यायला परवानगी दिलेली असल्यामुळे आणि बोरिस मोठा होता होता खरोखरच 'राक्षस ' दिसू लागल्यामुळे त्याला फ़िरवणे हा प्रकार त्या दोघाम्नाही शक्य नव्हता. त्यामुळे बोटीवरून सुटीला आला की मोहन, शाळा क्लास यातून वेळ मिळाला की नेहा, निनाद यांना बोरिस फ़िरवून आणायचा. इतर वेळी बोरिस आणि त्याची "आई." मग अशा वेळी मला जोर चढे, " बघा, आधी नाचतात पाळू या म्हणून आणि मग सगळी जबाबदारी पडते घरच्या बाईवर." बोरिस तसा शांत स्वभावाचा किंवा आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे की काय पण कुणाकडे फ़ारसं लक्ष द्यायचा नाही. त्याने नुसती मान वर करून भुंकणार्‍या कुत्र्याकडे बघितलं तरी त्या कुत्र्याची बोलती बंद होवून शेपूट पायात जात असे. त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे राळ्यांचा सोनू. बोरिस फ़िरायला निघाला की सोनू भुंकून भुंकून तोंडाला फ़ेस आणत असे. पण बोरिस शांत. पण एकदा त्याच्याही अंगात दीवारमधला अमिताभ संचारला होता की काय न कळे, गळ्यातल्या पट्ट्यासकट राळ्यांच्या घरात शिरून त्याने सोनूला असा लोळवला की अखेरपर्यंत बोरीस दिसला की सोनू आज्ञाधारक दासाच्या भूमिकेत शिरायचा. योगायोग म्हणजे बोरिस जाण्याआधी एक दिवस सोनु ' गेला.'
बोरिस आमच्या दोन्ही घरात विभागला गेला होता. म्हणजे जोशी मंडळी बाहेर गेली की बोरीसचं पालकत्व आमच्याकडे असायचं. घर बंद झालं की अर्ध्या तासातच त्याच्या हाका सुरू होत. आपण जरा दुर्लक्ष केलं की बंद दाराला नखांनी खाजवून तो आपला निषेध व्यक्त करी.दार उघडलं की घराभोवती एक फ़ेरी मारली की त्याचं समाधान होई. मग परत तो आत जायला तयार ! कोणी पाहुणा आला आणि त्याला बाल्कनीत कोंडलं आणि फ़ाटक उघडून पाहुणे बाहेर पडलेले दिसले की हा दार ढकलत रहायचा आत घेण्यासाठी.लहान असताना किरकिर्‍या मुलासारखा बराच वेळ त्याचं भुंकणं चालायचं. मोठा झाल्यावर संध्याकाळच्या सिरियल्स लागल्या की याला ' नरडं ' साफ़ करायची हुक्की येत असे. त्यासाठी त्याने आम्हा सगळ्यांच्या शिव्या खाल्लेल्या होत्या. अपवाद मणजे निनाद आणि विलास. ही दोन माणसं त्याने काहीही केलं तरी यशोदेनं कान्ह्याच्या बाललीलांकडे बघावं तशी बघायची.
हळू हळू आजींच्या राक्षसाचं " बोरु " त कधी रुपांतर झालं ते त्यांनाही कळलं नाही. इतकं की दादू, बबी सारखं हे नातवंडही आजींकडून गुपचुप लाड करून घ्यायला लागलं.आणि आम्हाला तर कितीजणांनी "आपल्या शत्रूपक्षा"त टाकलं असणार.
वय झालं की माणसांसारखीच कुत्र्यांनाही दुखणी होतात हे नवच ज्ञान आम्हाला झालं. शेपटाला झालेली जखम इतकी प्राणघातक असेल असा संशयही येऊ नये इतक्या पटकन बोरुनानांची तब्येत ढासळत गेली. तसंही आपल्या हिशेबाने त्यांचं वय ७५ झालच होतं. आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको असं म्हटल्यासारखं त्याने आपला मुक्काम बेसमेंटमध्ये हलवला. अगदीच आठवण झाली की तो वर घरात जाई.पण अखेर अर्ध्या अंगातली शक्ती पूर्णपणे गेल्याने त्याला एक पायरीही चढवेना. आपली अखेर कळल्यासारखा तो शेवटच्या दिवसाची वाट पहात पडून राहू लागला.त्याच्या यातना न बघवून त्याला अखेर इच्छामरण दिलं .
आज तो मते फ़ार्ममधल्या जोशांच्या बागेत चिरविश्रांती घेतोय. या जगात कुठलीच गोष्ट विनाश पावत नाही; ती संपूर्णपणे नाहीशी होत नाही. त्याला पुरलेल्या ठिकाणी त्याची आठवण म्हणून लावलेलं झाड वर्षभरात वाढेल. त्याच्या पानांचं हिरवेपण , फ़ुलांचा सुगंध जीवनाचं गाणं गात राहतील. त्या झाडाच्या पारावर बसून गप्पा मारताना मध्येच बोरुची आठवण निघेल. त्याच्या खोड्यांना हसताना प्रत्येकाच्या मनात त्याच्या वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतील, पण त्या सगळ्या आनंदगान गाणार्‍या असतील, नक्कीच !