Monday, March 19, 2007

गुढीपाडवा

आज मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस ! रोजच्यासारखाच उगवलेला,पण डोळे उघडल्याबरोबर पहिली जाणीव झाली की आज पाडवा.बाहेर चांगलच उजाडलेलं होतं. ताडकन पांघरूण बाजूला करून उठले तर दुस‍र्‍या क्षणी जाणवलं की गडबड करण्याची काहीच गरज नाही. आज सगळ्यांचा सुट्टीचा दिवस. परत पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले, पण पापणीच्या आत ५० वर्षांपूर्वीची गुढी डोलू लागली.
तेव्हा या वेळपावेतो सगळ्यांच्या दारात गुढी उभी राहिलेली असे. काय शामत होती सणाच्या दिवशी "इतक्या " उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याची ? कारण "ज्ञान, संपत्ती आरोग्य," मिळवण्यासाठी " लवकर निजे आणि (मुख्य म्हणजे) लवकर उठे "हा साधा, सोपा, सरळ मार्गच त्या काळी मोठ्या माणसांना माहीत होता. त्यामुळे लवकर उठल्याखेरीज गत्यंतर नसायचं. एरवी त्याचं फ़ारसं काही वाटायचं नाही, पण गुढीपाडव्याला मात्र एकदम दुपार उजाडली तर काय बहार होईल हाच विचार मनात असायचा. कारण दात धुतले न धुतले तोच आई कडुलिंबाची पानं घेऊन तयारच असायची.प्रथम ती चावायची, मगच गोड खायला मिळायचं ( ही सवलत मी शेंडेफ़ळ असल्यामुळे फ़क्त मलाच असायची, मोठ्या भावंडाना ती पानं गिळावीही लागायची.) त्यामुळे नववर्षाची सुरवात "आई, नको ना ग, पुढच्या वर्षी नकी खाईन ' याच वाक्याने व्हायची हे ठरलेलं.
पण एवढं सोडलं तर मग मात्रं धमाल! दारासमोरचं अंगण , खर तर रस्ताच, झाडणे, शेणसडा घालणे आणि मग रांगोळी. आपली रांगोळी सगळ्यांच्या आधी घालून व्हावी हे त्या दिवसातलं माझं स्वप्न होतं. पण शेजारच्या अक्का पहाटेच उठून रांगोळी घालून तयार असत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या त्यांच्या मुलीही. परत वर मला रांगोळीत मदत करायला तयार ! ओळीत सडा घालून रांगोळीने सजलेली ती अंगणं बघताना आतून कुठून तरी पारिजातकाचं फ़ूल उमलल्यागत सुरेख वाटायचं.मग गुढी उभारायची गडबड . सूर्याच्या कोवळ्या उन्हात रंगीबेरंगी खणांनी नटलेल्या,माळांनी सजलेल्या गुढ्या 'चैत्राच्या' आगमनाची ललकारी देत असायच्या. त्यांचे सोनेरी खण उन्हात झळाळून उठायचे. नवीन कपडे घालून , हातात नवीन वर्खाच्या बांगड्या झळकवत, वेणीचं नव्या रिबिनीच फ़ूल चाचपत मैत्रिणींच्या गळ्यात गळे घालून गुढ्या बघताना सकाळ कधी सरायची कळतच नसे.घराघरातून पक्वान्नांचे गोड वास आणि तळणाचे सुगंध यायला लागले की पळत घर गाठायची घाई उडायची.
आज 'तो' पाडवा आठवून वाईट वाटतय का असं मी (डो्ळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली.ते हसून म्हणालं " वाईट काय वाटायचं त्यात ? प्रत्येक वे्ळचे नियम वेगळे, प्रत्येक वे्ळच्या गमती वेगळ्या.तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना , मग आवर.मस्त पैकी चहा घे कपात ओतून , बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून.त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडच आहे ?मग 'ती' गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे ?

Thursday, March 15, 2007

आईपण

कितीही नको म्हटलं तरी तू मला आठवत राहतेस तशी
औषधाच्या दुकानाच्या पायरीशी
औषधाच्याच साइड इफ़ेक्टविषयी बोलत असलेली !
पण खरच का तू औषधाविषयी होतीस बोलत ?
वरवर वाटणारं सुसंगत ?
मीही टाळत होते तुझ्या डोळ्यात पहाणं
घाबरत होते आत डोकावणं !
कारण मग
दिसल्या असत्या मला खोल भोवर्‍यातल्या
खदखदत्या उष्ण चिळकांड्या,
लक्तरं सुन्न मनाची ,
अन विखुरलेल्या घरट्याच्या काड्या !
कदाचित उसनं अवसान टाकून पळतही सुटले असते सैरावैरा,
पण मग बोलू लागलो, तर हललीसशी वाटलीस जरा जरा
ऐकवू लागलीस
नाद रुमझुमत्या पैंजणांचे,
साद चिमण चार्‍याचे!
मी फ़क्त वाट पहात होते
उरी कोंडल्या तुफ़ानाची,
बांध पडल्या उधाणाची !
पण तू उभी, घट्ट पाय रोवून
श्वेत कफ़नात विखुरलेलं आईपण गाडून
थरथरत्या ओठांवर दात दाबून
छिन्न "धर्म"पुत्रासाठी!
केवळ त्याच्याचसाठी !

Wednesday, March 7, 2007

निरोप

तुझ्या भल्या थोरल्या बॅगेवरची पिवळी रिबन बांधून झाली असेल तर जरा थांब,
क्षणभर मागे वळून बघ.
रिबन घट्ट बांधली आहे, हे तुला माहीत आहे,
यादीबरहुकूम सामान भरलय हेही तुला नीटच आठवतय,
उगीच रिबिनीच्या फ़ुलाशी चाळा करत राहू नकोस
तुझ्या अस्वस्थ हालचालींना लगडल्या आहेत
आतापर्यंतच्या आठवणी...
आजूबाजूचा अबोल आश्वस्त वावर...
समंजस उबारा !
ज--रा थांब आणि मागे बघ.
तुझ्या मागेच तर आहे मी
तुला आवडणार्‍या लाडवाच्या, थालीपिठाच्या आणखी कशाकशाच्या पुड्या घेवून,
तुझ्या कपड्याच्या चळती ठेवत---
तुझ्या पुस्तकांचा ढीग सावरत---
उगीचच इकडून तिकडे फ़िरत.
म्हणूनच म्हणते आता हा लपंडाव थांबवूया
ये माझ्या मुला, आपण मोकळे होवूया !
झरणार्‍या आसवात वाहू दे उरात कोंडलेला वियोग
परस्पराविना काढायच्या दिवसांचा बागुलबुवा.
ये माझ्या बाळा पदरा आड झाकून घेऊ दे तुला
मांडीवरच्या जावळाचा स्पर्श साठवून घेऊ दे मला.
मग उद्या डोळ्यात सूर्य साठवून निघशील तू तेजाकडे
त्यावेळीही मी मागे असेन तुझ्या
माझी संध्याकाळ ओंजळीत घेऊन !

Monday, March 5, 2007

कारखाना बंद पडल्यानंतर

फ़ारा दिवसांनी भेटलास मित्रा, तुझं स्वागत असो !
बैस ऐसपैस, जरा पाठ टेक
मधल्या काळातल्या काही कथा, काही व्यथा
ऐकव आणि ऐक !
अर्ध्या वयापर्यंतचे आपले धागे, एकत्रच तर होते विणलेले
गर्द पोपटी चैतन्याने भारलेले, अन सोनेरी तेजाने लखलखलेले !
सरळ सुरळीत चालू राहती वाट ,
तर कदाचित बदललाही असता आयुष्याचा घाट.
भेटलो असतो आपण शुभ्र माथ्याने, थरथरत्या मानेने.
केल्या असत्या गोष्टी , मुला नातवंडांच्या
किंवा आपापल्या निव्रुत्ती समारंभाच्या !
मित्रा, हसलाससा खिन्नसा ?
अजूनही आठवतो कारे तुला
एक एक दिवा मावळता अंधुकसा ?
बंद घरातला एकेक कवडसा?
गाडी घुंगरांच्या किणकिणाटात फ़रपटत जाणाया सावल्या मूकशा ?
बघ, अजूनही हात थरथरतोय तुझा
अरे, खूप वर्षं झाली मित्रा,
जागत्या जागेचा मसणवटा होवून
पांगली बघ माणसं आपली
गोणत्या बोचक्यात आपलं जग भरून
ओठ मिटले उमासे मागे ठेवून !
शांत हो मित्रा,
घामेजलेला हात पूस आणि पाणावलेले डोळेही, जमलं तर.
खरं आहे तुझं
वारा सुटतोच असा कधी कधी धूळ उडवत......
आणि मित्रा, नको येऊस परत
बोलू लागतात रे मूक वेदना,
अद्न्याताच्या अंधाराने भयभीत डोळे
सुकत चाललेल्या जखमा उसवत,
दबल्या आठवणींना चालवत.
जड जातं रे सावरायला
आपलं उखडलेपण रोवायला
अवघड जातं रे मित्रा, खरंच अवघड जातं
शीळ घालतं रानपाखरू परत आत कोंडायला !